सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाचा अटकेपार झेंडा- वजाबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 07:55 PM2018-05-05T19:55:40+5:302018-05-05T19:55:40+5:30

 Indestructible flag of Sindhudurg primary education - Wajabaki | सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाचा अटकेपार झेंडा- वजाबाकी

सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाचा अटकेपार झेंडा- वजाबाकी

Next

- महेश सरनाईक-
२१ व्या शतकात प्रगती साधायची असेल तर इंग्रजीशिवाय गत्यंतर नाही, अशी काहीशी जनभावना बनत चालली असताना मराठी माध्यमामध्ये दर्जेदार शिक्षण घेता येते आणि मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतलेला विद्यार्थी देशभरातील नामांकित असलेल्या मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो हे सिद्ध करून दाखविले मुंबई विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि माजी कुलगुरू, अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी. या दोघांच्या देदीप्यमान शैक्षणिक कामगिरीचा पाया खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षणातूनच रोवला गेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक परंपरा किती अव्वल दर्जाची होती हे या दोघांच्या रूपाने सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध पातळीवर नाचक्की झालेल्या नामांकित मुंबई विद्यापीठाच्या रक्षणार्थ सिंधुपुत्र धावला! अशा प्रकारचे गौरवोद्गार काढले जात आहेत.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून म्हणजे स्वतंत्र कोकण बोर्डाची निर्मिती झाल्यापासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात कोकणने सातत्याने प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने तर राज्यात प्रथम येण्याचा सपाटा लावला आहे. १०० टक्के शाळांच्या निकालातही सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे. मागील दहा वर्षांपूर्वी शिक्षणाच्या लातूर पॅटर्नचा राज्यात मोठा दबदबा होता. गेल्या पाच ते सहा वर्षांत शिक्षणाचा सिंधुदुर्ग पॅटर्न उदयास आला असून, त्याने लातूर पॅटर्नला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळविला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात सिंधुदुर्गची मुले मारत असलेली बाजी वाखाणण्याजोगी आहे. यामागे विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना घडविणाºया शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांकडून आवश्यक उजळणी करून घेणे, जादा तासिका घेऊन दहावी, बारावीमध्ये त्यांना १०० टक्के यश कसे मिळेल यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न होत आहेत. त्यात मग विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना संस्थाचालकांचाही मोठा हातभार लागत आहे. शाळांचे वेतनेतर अनुदान बंद असतानाही शाळेचा रहाटगाडा चालविणे तसे फार अवघड आहे, असे असतानादेखील आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे म्हणून त्यांना सर्वार्थाने सर्व सुख-सोयी कशा देता येतील याकडे लक्ष दिले जात आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेत्त वर्षागणिक कमालीची वाढ होताना दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायमच लाभली आहे. येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती मोठमोठ्या पदांवर काम करीत आहेत. सिंधुभूमीत जन्मलेल्या अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला आणि जिल्ह्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने या राष्ट्राला अनेक वीरपुरुष, साहित्यिक, शास्त्रज्ञ, स्वांतत्र्यसैनिक, क्रीडापटू, कलाकार आणि समाजसेवक दिले आहेत. कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणारे गोपुरीचे आप्पासाहेब पटवर्धन, नाटककार र. के. खाडीलकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, ग. त्र्यं. माडखोलकर, नाथ सांप्रदायाचा वारसा जपणारे संत सोहिरोबानाथ आंबिये, संत पूर्णाबाबा उपसकर, मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून देणारे वि. स. खांडेकर आणि विंदा करंदीकर, कवी मंगेश पाडगावकर, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाबूराव पराडकर, सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई, चित्रपट कलावंत हंसा वाडकर, रॉयल सर्कसचे नारायण वालावलकर अशी किती नावे घ्यावीत?

क्रीडाक्षेत्रात महनीय कामगिरी करणारे विजय मांजरेकर, पांडुरंग साळगावकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, आदी असंख्य खेळाडू येथील लाल मातीचा टिळा भाळावर लावून जगाच्या पाठीवर वावरत आहेत आणि या मुलखाच्या सांस्कृतिक अस्मितेची पताका फडकवित आहेत. शिक्षणक्षेत्रात अव्वल कामगिरी करणाºयांमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि माजी कुलगुरू अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे नावदेखील त्यात सामील झाले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा हाती घेतलेल्या डॉ. सुहास पेडणेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन हडीसारख्या ग्रामीण भागाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. डॉ. सुहास यांचा जन्म ११ सप्टेंबर १९५७ रोजी मालवण तालुक्यातील हडी गावी झाला. आई, वडील व ११ भावंडे (७ भाऊ, ४ बहिणी) असताना अतिशय गरिबीच्या व हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी दिवस काढले आहेत. त्यांच्या कुटुंबाची अगदी मर्यादित शेती आहे. दुपारी एकवेळ भात जेवणे आणि रात्रीच्या वेळी पेज घेऊन त्यांचा चरितार्थ चालत होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) हडी शाळा नं. १ व शाळा नं. २ मध्ये पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरात पूर्ण केले.
कै. तुळशिदास पेडणेकर (मुख्याध्यापक) यांचे डॉ. सुहास यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. सन १९७४-७५ च्या जुन्या ११ वी (एसएससी) मध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. १९७५ साली ज्येष्ठ बंधू रामदास पेडणेकर हे डॉ. सुहास यांना त्यांच्या आईच्या इच्छेखातर मुंबईला पुढील शिक्षणासाठी घेऊन गेले. रामदास हे त्यावेळी टाटा आॅईल कंपनीमध्ये नोकरी करीत होते. मुंबईत दहा बाय पंधराच्या खोलीमध्ये भांडूप सर्वोदयनगर येथील कौलारू चाळीत राहून डॉ. सुहास यांनी पुढील शिक्षण घेतले आहे.त्यांचे पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई-माटुंगा येथील रुईया या प्रख्यात महाविद्यालयात झाले आहे. त्यांनी बी.एस्सी., एम.एस्सी. आणि पीएच.डी. त्यांनी रुईया कॉलेजमधून पूर्ण केली. त्यांनी केवळ अडीच वर्षांत रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पूर्ण केली आहे. तसेच त्यांनी पीएच.डी.चा पहिला प्रबंध त्यांचे ज्येष्ठ बंधू रामदास यांना अर्पण केला.
डॉ. सुहास पेडणेकर यांना त्यांचे आई-वडील, भाऊ, शिक्षक आणि विशेषत: पेडणेकर सर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या आईचे नाव आनंदी. तिचे एक ब्रीदवाक्य होते, ‘दोन दिवस उपाशी राहाल तर मरणार नाहीत, परंतु एक दिवस अभ्यास नाही केलात तर उभे आयुष्य मराल.’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन डॉ. सुहास यांनी आपले करिअर घडविले आहे.

एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. सुहास यांना संजय गांधी यांच्या मुंबई येथील कॅपरी हॅन्स, इंडिया या कंपनीकडून नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले होते. मात्र, डॉ. सुहास यांना घडविणारे त्यांचे मोठे बंधू रामदास यांनी डॉ. सुहास यांच्यासमोरच त्यांना मिळालेले नियुक्तीपत्र फाडून टाकले. तसेच त्यांना पीएच.डी. करण्यास भाग पाडले. त्यांच्या आईची इच्छा होती की, आपला मुलगा हा आपल्या गावात किंवा हडी पंचक्रोशीत सर्वांत जास्त शिक्षण घेतलेला असावा. ही आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या भावाने कंपनीचे नियुक्तीपत्र फाडून टाकले.
त्यानंतर डॉ. सुहास यांनी पीएच.डी. पूर्ण करीत रुईया कॉलेजमध्ये लेक्चरर, प्राध्यापक, कॉलेजचे विज्ञानशाखा प्रमुख, उपप्राचार्य, प्राचार्य व आता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होण्यापर्यंत मजल मारली आहे. पेडणेकर यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. एक भाऊ शामसुंदर पेडणेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा समाजकल्याण अधिकारी, तर दुसरे बंधू देशातील नामांकित लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या कंपनीत व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत.
आता तर डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे मुंबई या देशातील अव्वल दर्जाच्या विद्यापीठाची धुरा आली आहे. मागील गेल्या तीन वर्षांत या ना त्या कारणाने मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर मुंबई विद्यापीठातील कुलगुरूंना शासनाला घरी बसवावे लागले होते. त्यामुळे सिंधुुदुर्गातील प्राथमिक शिक्षणाच्या खंबीर पायातून कळस गाठलेले डॉ. पेडणेकर यांच्यावर मुंबई विद्यापीठाचा कारभार सुरळीत रुळावर आणण्याची मोठी जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील यात कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचे कारण नाही.

मुंबई विद्यापीठाच्या सिंधुपुत्र दोन्ही कुलगुरूंचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळेतच!

मुंबई विद्यापीठाने अलीकडे आपल्या जिल्ह्यातील दिलेल्या दोन्ही कुलगुरूंचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतच झाले आहे.
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे देवगड तालुक्यातील मुणगे गावी सातवीपर्यंत आणि डॉ. सुहास पेडणेकर यांचे तर मालवण तालुक्यातील हडी शाळा नं. १ व २ आणि ओझर विद्यामंदिर येथे शिक्षण झाले.
या दोघांनाही कुठेही इंग्रजी माध्यम आड आले नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्व दर्जेदार शिक्षकांनी या बाबींचा अधिक प्रसार आणि प्रचार करायला हवा.
मुंबई विद्यापीठाचा घसरता शैक्षणिक डोलारा सांभाळायला अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे दर्जेदार प्राथमिक शिक्षणच धावले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही मुंबई विद्यापीठासारख्या देशातील नामांकित विद्यापीठाचा प्रमुख होण्याचा मान मिळविणे म्हणजे सिंधुदुर्गसाठी भूषणावह आहे.
यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे देवगड तालुक्यातील मुणगे गावचे

Web Title:  Indestructible flag of Sindhudurg primary education - Wajabaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.