आगामी निवडणुकीत भाजप तिकीट देईल का याचा विचार करा, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

By सुधीर राणे | Published: March 13, 2023 05:01 PM2023-03-13T17:01:23+5:302023-03-13T17:02:05+5:30

मला पक्षात घ्या, म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही

Consider if BJP will give ticket in upcoming election, Satish Sawant criticizes Nitesh Rane | आगामी निवडणुकीत भाजप तिकीट देईल का याचा विचार करा, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

आगामी निवडणुकीत भाजप तिकीट देईल का याचा विचार करा, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

googlenewsNext

कणकवली: स्वत:चा स्वाभिमान पक्ष सात महिने जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांनी  शिवसेनेला जिवंत ठेवण्याची भाषा करू नये. भाजपाने तिकीट वाटपाचा अधिकार आमदार नितेश राणेंना दिलेला नाही. उलट आगामी निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळते का? ही शंका आहे. भाजपाची वरिष्ठ मंडळी त्यांना किती दिवस पक्षात जिवंत ठेवणार याचा त्यांनी आधी विचार करावा. मला पक्षात घ्या, म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी आमदार नितेश  राणे यांना लगावला आहे.

कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, ॲड. हर्षद गावडे, प्रमोद मसुरकर, गोट्या कोळसुलकर, उत्तम लोके, वैद्येही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुख सोडाच पण साधा निष्ठावान शाखाप्रमुखही आमदार नितेश राणेंच्या संपर्कात येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत अकरा आमदार होते. आज काय स्थिती आहे. त्यावेळी निवडणुका आल्यावर आघाडीची सत्ता येणार याची चाहूल लागताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काँग्रेसची सत्ता जाणार हे समजताच भाजपात प्रवेश केला. 

आमदार नितेश राणे केवळ स्टंटबाजीशिवाय काहीच करत नाहीत. उलट आमदार वैभव नाईक कुडाळ मालवण मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. राणेंनी निधीची केलेली घोषणा ही कागदावरची आहे. त्यामुळे जूनमध्ये समजेल त्यापैकी  किती कामे झाली आहेत. घाट रस्त्यासाठी  ४०० कोटीचा निधी आला असल्याचे ते सांगत आहेत, पण गगनबावडा रस्त्याची स्थिती  काय आहे? ठेकेदार भेटायला यावेत व कार्यकर्ते आपल्याबरोबरच थांबावेत यासाठी २ हजार कोटीचा निधी मंजूर केला असे सांगून  त्यांची धडपड चालू ठेवली आहे.

गद्दारीनंतरही जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही खेडमधील जी सभा झाली, ती विरोधकांना धडकी भरविणारी होती. जनता आमच्यासोबत असून आगामी निवडणुकीत मतदारच विरोधकांना चपराक देतील व सिंधुदुर्गातील तीनही आमदार व खासदार आमचेच असतील असेही सतीश सावंत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाप्रमुख म्हणून संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, वैभव नाईक, अरूण दुधवडकर, गौरीशंकर खोत यांना आपण धन्यवाद देतो. पक्षप्रमुखांना अपेक्षीत असलेले काम आपण या मतदारसंघात करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पक्षबांधणी करण्यात येणार आहे. तालुका व विभाग निहाय बैठका, आवश्यकतेनुसार वरिष्ठांशी चर्चा करून नविन नियुक्त्या, बुथ सक्षम करणे आदी कामे केली जातील.कोणत्याही स्थितीत पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील सर्वांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील असे सतीश सावंत यावेळी म्हणाले.

Web Title: Consider if BJP will give ticket in upcoming election, Satish Sawant criticizes Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.