संतप्त वडूजकरांचा पाण्यासाठी ठिय्या
By admin | Published: September 22, 2014 10:07 PM2014-09-22T22:07:52+5:302014-09-23T00:10:35+5:30
लाखो लीटर पाणी वाया : चार प्रभागांमध्ये आठवड्यापासून ठणठणाट
वडूज : ‘वडूज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक, चार, पाच व सहामध्ये आठवड्यापासून ठणठणात जाणवत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला.
याबाबत माहिती अशी की, येरळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून वडूज परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे. वडूज शहरातील जलवाहिनीला आठवड्यापासून गळती लागली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईची कुऱ्हाड वडूजकरांवर कोसळली आहे, ही गळती दूर करण्यातही प्रशासनाला अपयश येत आहेत.
त्यामुळे पाण्याअभावी गृहिणींची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. २२) सकाळी वडूज ग्रामपंचायतीसमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधितांना खडेबोलही काहीनी सुनावले. ‘तांत्रिक अडचणींमुळे पाणी येत नाही,’ अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. हे लक्षात येताच सायंकाळी पाचपर्यंत पाणी येईल, असे तोंडी आश्वासन दिले.
वडूज शहराची लोकसंख्या पाहता ग्रामपंचायत सर्व सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायत सदस्य विवेक येवले यांनी यावर तातडीने तोडगा काढण्यास सांगितले. आयलॅण्ड चौक, हुतात्मा परशुराम विद्यालय, नाथ मंदिर, खडकाचा मळा परिसर आदी मुख्य ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. या गळतीला जबाबदार कोण? असा यक्षप्रश्नही जनतेतून उमटत आहे. ग्रामपंचायत करातून पन्नास लाख वसूल होत असतानाही देखभाल दुरुस्ती करताना ग्रामपंचायतीस नाकीनऊ येत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने लक्ष घालून तहानलेल्या वडूजकरांना पाणी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)