गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन
By Admin | Published: December 17, 2014 05:37 AM2014-12-17T05:37:57+5:302014-12-17T05:37:57+5:30
गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्हे तालुक्यातच पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन झाल्यास गुजवणी धरणात पा
पुणे: गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्हे तालुक्यातच पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन झाल्यास गुजवणी धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, यामुळे पुरंदरचा पाण्याचा प्रश्नदेखील सुटण्यास मदत होणार आहे.
पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरणारे गुंजवणी धरण बांधून चार वर्षे पूर्ण झाले तरी अद्याप धरणांमध्ये पाणी साठविण्यात आलेले नाही. धरणांमध्ये पाणी साठविल्यास पाण्याच्या फुगावड्यामुळे काही घरे पाण्याखाली येतात. यामुळे प्रथम या लोकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने येथील सुमारे ८५ प्रकल्पग्रस्तांना शिरुर आणि दौंड तालुक्यात जमिनी देऊ केल्या आहेत, पण प्रकल्पग्रस्तांनी या जमिनी घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी वेल्हे तालुक्यातच आपले पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात येथील ८५ प्रकल्पग्रस्तांना गुंजवणी धरणाच्या खालील बाजूस घरांसाठी प्लॉट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रकल्पा पासून आठ किलोमीटरमध्ये शेतीसाठीची जमीन देण्यात येणार आहे. या लोकांचे पुनर्वसन झाल्यास धरणांमध्ये पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, धरणामध्ये तीन टीएमसी पाणी साठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.
धरणातील कालव्यामुळे वेल्हे तालुक्यातील १८ गावातील १३०२ हेक्टर व भोर तालुक्यातील ३७ गावातील १३८७५ हेक्टर अशी १५ हजार १७७ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. वेल्हे तालुक्यातील १८ गावांना तर भोर तालुक्यातील ३७ गावांना लाभीमळणार आहे. . मात्र कालव्याची कामे कधी पुर्ण होणार आणि लोकांना पाणी कधी मिळणार. (प्रतिनिधी)