बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:43 AM2018-01-04T02:43:26+5:302018-01-04T02:43:41+5:30

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले.

Quiet calm! Turning on the streets, shutting down the market for weeks | बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद

बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद

Next

पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले. काही ठिकाणचे आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आले. एसटी बंदचा सर्वाधिकफटका प्रवाशांना बसला. बारामतीत लातूरहून सहलीला निघालेले ९० विद्यार्थी अडकले होते.

बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व दुकाने, व्यवहार संपूर्ण दिवसभर बंद होते. शहरात निषेधसभा घेण्यात आली.
चाकण शहरात सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. कार्यकर्त्यांनी आज दुपारी पुणे-नाशिक महामार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. जुन्नर तालुक्यातील बौद्ध बांधवांच्या वतीने जुन्नर शहरात बंद, निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून हल्ला करणाºया समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला. मंचर शहरातही पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
दौैंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौैक आणि नगरमोरी चौैकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. इंदापुरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार १०० टक्के बंद होते. या बंदमधून रुग्णालये, शाळा, औषधालये वगळण्यात आली होती.

कोरेगाव भीमा येथील जनजीवन सुरळीत

कोरेगाव भीमा : येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत होत असताना अद्यापही नागरिक तणावाखालीच असल्याचे चित्र आहे. आज नागरिकांनी रस्त्यावरील जळालेली वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढली. सणसवाडीमध्येही मंदिराची साफसफाई करण्यात आली होती.
परिसरात अनेक ठिकाणी विविध पक्ष, संघटनांचे मेळावे होत असून या मेळाव्यांमध्ये बाहेरून येणाºया व्यक्ती , प्रतिनिधी प्रक्षोभक भाषणे, विचार व्यक्त करीत असल्याने येथील परिस्थिती तणावाखाली आहे. याबाबत कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक आचारसंहिता करता येईल का? याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमाचे मंडलाधिकारी कावळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पंचनामे करण्याबाबत अद्याप निर्देश दिले नसल्याचे सांगितले. तहसीलदार रणजित
भोसले यांनी उद्यापासुन पंचानामे करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

जमावबंदी आज संपणार
कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात १ जानेवारीपासून जमावबंदी घोषित करण्यात आली होती. दरम्यान येथील परिस्थिती आज नियंत्रणात आली असल्याने रात्री १२ पासून जमावबंदी उठवणार असल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

आठवडे बाजार बंद राहणार
कोरेगाव भीमाची परिस्थिती
जरी नियंत्रणात आली
असली व जमावबंदी उठवणार असले तरी कोरेगाव भीमाचा
उद्या (दि. ४) असणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी सांगितले.

दंगलीत स्थानिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाईबाबत तसेच घडलेल्या दुर्घटनेबाबत स्थानिकांची असणारी बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. याबाबत प्रतिबंधात्मक आचारसंहिता करता येईल का? याचीही चर्चा करणार आहे. - बाबूराव पाचर्णे, आमदार, शिरूर-हवेली

कोरेगाव भीमाची घटना म्हणजे राजकारण : आढळराव

मंचर : कोरेगाव भीमाची घटना ही मराठा समाज आणि दलित समाजात भांडणे लावण्यासाठीचे राजकारण असल्याचा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज लोकसभेत केला. सर्व नागरिकांनीकुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी, असे आवाहन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. कोेरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. आज लोकसभेत यावरून विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी आढळराव पाटील यांनी या प्रकरणाचा दलित किंवा मराठा समाजाचा संबंध नसून केवळ राजकारणासाठीहे सगळे चालले असल्याचा आरोप केला. आढळराव पाटील म्हणाले, की कोरेगाव भीमा लढाईला २०० वर्षांचा इतिहास आहे. हा भाग शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी गेल्या ९० वर्षांपासून विजयस्तंभ अभिवादन दिन साजरा केला जातो. यावर्षी १ जानेवारीला इथे हिंसाचार झाला. काहीजण जाणूनबुजून दलित आणि काही मराठी समाजात भांडणे लावण्याचा या मार्गाने प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या सूचना महाराष्ट्र शासनाला कराव्यात. हिंसाचार रोखण्यात महाराष्ट्र पोलीस कमी पडले.

Web Title: Quiet calm! Turning on the streets, shutting down the market for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.