Yasin Malik: जवानांची हत्या ते गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण; जाणून घ्या यासीन मलिकच्या गुन्ह्यांची यादी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:02 PM2022-05-25T18:02:17+5:302022-05-25T18:25:49+5:30

Yasin Malik: जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक याच्यावर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

Yasin Malik: जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि प्रतिबंधित JKLF संघटनेचा नेता यासीन मलिकला टेरर फंडिंगप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. 56 वर्षीय यासीन मलिक अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये बसून भारताविरोधात कट रचत आलाय. चला जाणून घेऊया यासिन मलिकबद्दल...

यासिन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरमधील मैसुमा येथे झाला. यासीनचे वडील गुलाम कादिर मलिक हे सरकारी बस चालक होते. यासीनचे संपूर्ण शिक्षण श्रीनगरमध्ये झाले. त्याने श्री प्रताप महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासीन मलिकने जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख बनण्यापर्यंतची गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. त्यात त्याने दावा केला होता की, काश्मीरमध्ये लष्कराचे अत्याचार पाहून आपण शस्त्र उचलले. यासीनने 80 च्या दशकात 'ताला पार्टी' स्थापन केली होती, ज्याद्वारे त्याने काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या.

क्रिकेट सामन्याच्या मध्यभागी खेळपट्टी खराब करण्यासाठी गेला:- ही गोष्ट 13 ऑक्टोबर 1983 ची आहे. काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात क्रिकेट सामना सुरू होता. लंच ब्रेक दरम्यान अचानक 10-12 मुले मधल्या मैदानावर पोहोचली आणि त्यांनी खेळपट्टी खराब करण्यास सुरुवात केली. ही घटना मलिकने त्याच्या कार्यकर्त्यांसोबत पार पाडली.

शेकडो लोकांच्या जल्लोषात फटाके फोडले:- 13 जुलै 1985 रोजी काश्मीरमधील ख्वाजा बाजार येथे नॅशनल कॉन्फरन्सची रॅली होत होती. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. यादरम्यान 60 ते 70 मुले आली आणि त्यांनी मध्येच फटाके फोडले. त्यावेळी बॉम्बस्फोट सुरू झाल्याचं सगळ्यांना वाटलं. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. त्यानंतर यासिन मलिक पहिल्यांदाच पकडला गेला होता.

'ताला पार्टी'चे नाव बदलून 'आयएसएल':- 1986 मध्ये मलिकने 'ताला पार्टी'चे नाव बदलून 'इस्लामिक स्टुडंट्स लीग' (ISL) केले. यामध्ये तो फक्त काश्मीरमधील तरुणांचा समावेश करायचा. काश्मीरला भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश होता. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणणाऱ्या अशफाक मजीद वानी, जावेद मीर आणि अब्दुल हमीद शेख या दहशतवाद्यांचा आयएसएलमध्ये समावेश होता.

मकबूल भट्टच्या फाशीला विरोध:- 11 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवादी मकबूल भट्टला देशविरोधी कारवाया आणि दहशतवादी घटनांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली होती. तेव्हा यासीन मलिक आणि त्याच्या ताला पक्षाने कडाडून विरोध केला. ठिकठिकाणी मकबूल भट्ट याच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले होते. या प्रकरणी यासीनला पोलिसांनी अटक केली आणि तो चार महिने तुरुंगात होता.

राजकारणातही पाऊल ठेवले:- काश्मीरमध्ये 1980 पासून हिंदूंवर हल्ले सुरू झाले. यामध्ये यासीन मलिक आणि त्याच्या साथीदारांचे नाव येत होते. वाढत्या हिंसक घटना पाहता 7 मार्च 1986 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील गुलाम मोहम्मद शेख सरकार बरखास्त केले. राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. यानंतर काँग्रेसने फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सशी हातमिळवणी केली.

1987 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांनी मिळून नवी आघाडी स्थापन केली. यामध्ये जमात-ए-इस्लामी आणि इत्तेहादुल-उल-मुस्लिमीन यांसारख्या पक्षांनी एकत्र येऊन मुस्लिम युनायटेड फ्रंट (MUF) ची स्थापना केली. यासीन मलिक यांने या आघाडीचे उमेदवार मोहम्मद युसूफ शाह याचा प्रचार केला. नंतर याच युसूफ शाहने हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना स्थापन केली. आज युसूफ शाह हा सय्यद सलाहुद्दीन या नावाने ओळखला जातो.

निवडणुका हरल्या तर हिंसक घटना वाढल्या:- 1987 मध्ये मुस्लिम युनायटेड फ्रंट (MUF) काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून निवडणुकीत पराभूत झाले. यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये हिंसक घटना वाढल्या. यासीन मलिकने काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिले. 1988 मध्ये यासिन मलिक जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाला. तो एरिया कमांडर होता. याद्वारे यासिन मलिकने काश्मिरी तरुणांना देशाविरुद्ध भडकावण्यास सुरुवात केली.

गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण:- 1988 मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) मध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी तो पाकिस्तानला गेला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1989 मध्ये भारतात परतला. यानंतर त्याने गैर-मुस्लिमांना मारण्यास सुरुवात केली. 8 डिसेंबर 1989 रोजी देशाचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण करण्यात आले होते.

त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक घेत होते. अशफाक वाणी हा या अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता. यासीन मलिकच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. यातील सर्व दहशतवादी जेकेएलएफशी संबंधित होते. टाडा न्यायालयाने यासीन मलिक, अशफाक वानी, जावेद मीर, मोहम्मद सलीम, याकूब पंडित आणि अमानतुल्ला खान यांना या प्रकरणी आरोपी ठरवले. अशफाक वानी याचा 1990 मध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला होता.

गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण झाल्यानंतर 1990 मध्ये काश्मीरमध्ये चार हवाई दलाच्या जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात यासीन मलिकलाही आरोपी करण्यात आले होते. यासीन मलिकला ऑगस्ट 1990 मध्ये दुसऱ्यांदा अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर जेकेएलएफचे अनेक दहशतवादी सुरक्षा दलांनी मारले. पण, 1994 मध्ये त्याची सुटका झाली.

1999 मध्ये यासिन मलिकला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर तो तुरुंगात ये-जा करत राहिला. यादरम्यान त्याने देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेतली. 2005 मध्ये त्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली होती. 2017 मध्ये एनआयएने यासीन मलिकवर टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासिन मलिकला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. 19 मे 2022 रोजी कोर्टाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले.