Corona Vaccination: कोरोनाची नव्हे, लसीची दहशत; ग्रामस्थांची कारणं ऐकून, तुम्हीही जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:08 PM2021-05-24T17:08:54+5:302021-05-24T17:12:55+5:30

Corona Vaccination: गल्ल्या ओस, गाव सामसूम; कोरोना लसीच्या भीतीनं २४० कुटुंबांचं स्थलांतर

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत होती. आता हाच आकडा अडीच लाखांच्या खाली आला आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी सध्या लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही शहरांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा असल्यानं नागरिक लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परतत आहेत.

दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र या ठिकाणी कोरोना लसीबद्दल पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे कोरोना लसींबद्दल विविध प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत.

मध्य प्रदेशच्या टिकमगढमधील ग्रामस्थांमध्ये कोरोना लसीची खूप मोठी दहशत आहे. त्यामुळे लसीचं नाव काढताच ग्रामस्थ चार हात लांब जातात. वैद्यकीय कर्मचारी येऊन लस टोचू नये म्हणून ग्रामस्थांनी गावं सोडून निघून जात आहेत.

टिकमगढ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता स्मशानशांतता आहे. गल्ल्या ओस पडल्या आहेत. घरांना कुलुपं लागली आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चोपरा गावातील २४० कुटुंबांनी स्थलांतर केलं आहे. या कुटुंबातील लोक महानगरांमध्ये गेले आहेत.

कोरोना लस घेतल्यावर मृत्यू होतो. लस घेतलेली व्यक्ती नपुंसक अशा अफवा गावांमध्ये पसरल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी गावं सोडली आहेत. त्यामुळे सध्या गावांमध्ये भयाण शांतता आहे.

लसीच्या भीतीनं चोपरा गावातील ८० टक्के लोकांनी स्थलांतर केलं आहे. आता गावात केवळ वृद्ध पुरुष आणि महिला आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोलीस त्रास देत असल्यानं गावातील अनेकांनी स्थलांतर केल्याचं इथले स्थानिक सांगतात.

चोपरा गावातील बहुतांश लोकसंख्या रेकवार समाजाची आहे. कोरोना लस धोकादायक असल्याच्या अफवा ऐकून त्यांनी गाव सोडून जाणं पसंत केलं आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांचा मृत्यू होतो. आमच्या गावात तशा घटना घडल्या आहेत. म्हणूनच २४० कुटुंबांनी गाव सोडल्याचं ६० वर्षांच्या पार्वती यांनी सांगितलं.

कोरोना लसीकरणाबद्दल सुरुवातीला ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. मात्र दुसरा डोस येईपर्यंत ही उत्सुकता कमी कमी होत गेली. विविध प्रकारच्या अफवा पसरल्यानं दुसरा डोस घ्यायला आलेल्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली.