भाजपानं आखला २०२४ चा विजयी प्लॅन; विरोधकांना शह देण्यासाठी काय आहे रणनीती? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 02:28 PM2022-09-08T14:28:22+5:302022-09-08T14:31:04+5:30

काँग्रेसनं 'भारत जोडो' यात्रेच्या माध्यमातून २०२४ च्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनीही भाजपाविरोधात वातावरण निर्मिती सुरूवात केली आहे.

विरोधकांच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनेही तयारी सुरू केली आहे. भाजपाची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती आखली आहे. येणाऱ्या काळात भाजपा काय प्लॅन लागू करणार आहे? याबाबत भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याने खुलासा केला आहे.

भाजपानं म्हटलं की, विरोधी पक्षाकडे सरकारविरोधात कुठलाही मुद्दा नाही. याआधीही विरोधकांनी भाजपाविरोधात एकजूट केली परंतु त्याचा फायदा झाला नाही. यावेळीही विरोधकांचे प्रयत्न अयशस्वी ठरतील. २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपानेही रणनीती आखली आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

५४३ सदस्य असणाऱ्या लोकसभेत भाजपाचे सध्या ३०३ खासदार आहेत. त्यातील जवळपास १५० जागा अशा आहेत ज्याठिकाणी भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या नंबरवर होती. आता पक्षाने या १५० मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे.

या मतदारसंघात मागील निवडणुकीत ज्या कारणांमुळे पराभव पत्करावा लागला ती कारण वेळ असताना दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांना ग्राऊंड लेव्हलवर काम करण्यास सांगितले आहे. या मतदारसंघातील जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपाचा सुरू आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, संघटनमंत्री बीएल संतोष यांच्यासोबत बैठक घेतली. त्यात ज्या ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे तिथे संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पूर्ण सन्मान राखावा अशा सूचना दिल्या आहेत. कार्यकर्ता आणि संघटनेपेक्षा सरकार मोठे नाही हे दाखवून द्या.

कार्यकर्ता आणि संघटनेच्या जीवावर सरकार बनवलं जाऊ शकते. हे भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना माहिती असावं. कार्यकर्त्यांपेक्षा मंत्री मोठे नाहीत. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न मंत्र्यांनी आणि नेत्यांना करायला हवा असं शाह यांनी म्हटलं.

भाजपानं पराभव झालेल्या मतदारसंघात लक्ष देऊन तेथील परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाला मजबूत करण्यासाठी जबाबदारी केंद्र सरकारने मंत्री आणि भाजपाशासित राज्यातील मंत्र्यांवर सोपवली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या मंत्र्यांचा सातत्याने कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात कार्यक्रम राबवण्यात येईल. जेणेकरून मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट राहता येऊ शकते. त्याशिवाय मंत्र्यांना गावागावात थांबून तेथीत मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्यास सांगितले आहे.

केंद्र आणि भाजपशासित राज्यांमध्ये सरकारी योजनांची जास्तीत जास्त प्रसिद्धी झाली पाहिजे. योजनांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संघटनेच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर टाकण्यात येत आहे. या योजनांचा लाभ पात्र लोकांना मिळवून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत अशा सूचना नेतृत्वाने दिल्या आहेत.

दलित-ओबीसी वर्गावर लक्ष केंद्रित करण्याची भाजपाने योजना आखली आहे. भाजपानं पहिल्यांदा दलित आणि आदिवासी समाजातील राष्ट्रपती देशाला दिले हे तळागाळापर्यंत सांगण्यास म्हटलं आहे. याशिवाय दलित आणि ओबीसी खासदार, पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख करून भाजपमध्येच गरीब, मागास आणि वंचित घटकांची काळजी घेतली जाते याचा उल्लेख करण्यास सांगितले आहे. लवकरच भाजपाही अशी यादी जाहीर करू शकते, जेणेकरून भाजपाने जास्तीत जास्त दलित, मागासवर्गीय खासदार, मंत्री आणि आमदार केले आहेत. विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी भाजपा प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज आहे. कारण २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपा पाऊलं उचलत आहे.