Maharashtra Politics: शरद पवारांनी १५ मिनिटांत केला करेक्ट कार्यक्रम! जयंत पाटलांची नाराजी दूर? अजितदादांशी मनोमिलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 03:52 PM2022-09-20T15:52:19+5:302022-09-20T15:56:51+5:30

Maharashtra News: जयंत पाटील आणि अजित पवारांमधील मतभेद अनेकदा समोर आले असून, अखेर शरद पवारांनी मध्यस्थी केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-भाजप युतीचे नवे सरकार आले. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस अधिक प्रकर्षाने चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली. याला कारणही तसेच होते.

महाविकास आघाडीचे नेते विरोधी बाकांवर बसल्यानंतर विधिमंडळाच्या विधानसभेत विरोधी पक्षनेत्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच खडाजंगी झाल्याचे वृत्त समोर आले होते. विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या झालेल्या निवडीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) नाराज असल्याचे सांगितले जात होते.

केवळ शिवसेनेमध्येच नाराजीचे सत्र असे नाही, तर राष्ट्रवादीमध्येही पक्षांतर्गत नाराजी सुरुच आहे. पण, शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत नसले तरी गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्य जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामधील मतभेद हे लपून राहिलेले नव्हते.

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तर ते अधिक ठळकपणे जाणवले होते. त्यामुळे हे मतभेद मिटणार की वाद वाढणार, असा सवाल उपस्थित होत होता. अखेर शरद पवार यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक घेऊन त्यांचे मनोमिलन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत काय आणि बाहेरील प्रश्न काय? शरद पवारांसमोर गेल्यावर मार्ग हा निघणारच हेच यातून अधिरोखित झाल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठक सुरु होण्यापूर्वी शरद पवार यांनी जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची एक बैठक घेतली. यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद दूर केल्याची चर्चा आहे. १५ मिनिट ही बैठक सुरु होती.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी कॉंग्रेसची दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद पार पडली. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलू देण्याची संधीच मिळाली नाही. यावरुन ते नाराज असल्याची चर्चा होती. तर त्यावेळी जयंत पाटील यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

राष्ट्रीय परिषद असल्याने यामध्ये आपण मनोगत व्यक्त करणे हे काही बरोबर नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. तर पक्षात अंतर्गत मतभेद नसल्याचेही ते म्हणाले होते. पण जयंत पाटील आणि अजित पवारामध्ये विरोधी पक्षनेते पद आणि इतर कारणांवरुन मतभेद होते.

गेल्या महिन्यातही शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. अजित पवार यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेता केल्यामुळे जयंत पाटील हे नाराज होते, अशी चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात होती.

या बैठकीत शरद पवार यांनी या वादात मध्यस्थी करत जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करून दोन्ही नेत्यांना एकमेकांसोबत चांगले काम करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आता पुण्यातील बैठकीनंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे सांगितले जात असून, खरेच मनोमिलन झाले आहे का, हे येणाऱ्या काळात दिसून येईल, असे सांगितले जात आहे.