लोकसभा सर्व्हे: महाराष्ट्रात शिंदे-अजितदादा गटाचा 'गेम' होणार, देशभरात कोणाला फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 08:24 PM2023-07-29T20:24:23+5:302023-07-29T20:57:18+5:30

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनिअन पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी, महाराष्ट्रातल्या दोनाचे चार केल्याचा भाजपाला फायदा होणार की तोटा... देशात काय परिस्थिती...

लोकसभा निवडणूक आठ-नऊ महिन्यांवर आली आहे. यामुळे भाजपा राज्या राज्यांत विरोधी पक्षांना सुरुंग लावण्यात व्यस्त झाली आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात भाजपाने दोन विरोधी पक्षांचा खेळ केला आहे. हा खेळ भाजपाच्या नाही तर शिवसेना घेऊन गेलेले शिंदे आणि राष्ट्रवादी घेऊन गेलेल्या अजित पवार गटाला मोठे नुकसान करणारा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनिअन पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी आली आहे. महत्वाचे म्हणजे एनडीए वि. विरोधकांची इंडिया आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या राजकीय भुकंपानंतरचा हा सर्व्हे आहे. गेल्या काही दिवसांपासून असे सर्व्हे येत आहेत. परंतू, ते या दोन्ही राजकीय घडामोडींपूर्वीचे होते. यामुळे आता पारडे बदलल्याचे दिसत आहे.

आता जर लोकसभा निवडणूक लागली तर भाजपा सर्वाधिक जागा जिंकताना दिसत आहे. ओपिनियन पोलमध्ये 543 पैकी 463 मतदारसंघांची आकडेवारी सांगण्यात आली आहे. यामध्ये एनडीएला 245 तर I.N.D.I.A ला 168 आणि अन्य पक्षांना ५० जागा मिळताना दिसत आहेत.

यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्यासाठी राजकारणासाठी महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत दोनाचे चार झालेले पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि शरद पवार यांची ताकद किती आहे, हे देशाला समजणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपाला २० जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच गेल्या निवडणुकीपेक्षा तीन जागांवर भाजपाला नुकसान होणार आहे. काँग्रेसला ९ जागा मिळणार आहेत. म्हणजेच काँग्रेसला पाच जागांचा फायदा होताना दिसत आहे.

भाजपासोबत गेलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला दोनच जागा मिळताना दिसत आहेत. सध्या शिंदेंसोबत शिवसेनेचे १२ खासदार आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला ११ जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच ओपिनिअन पोलनुसार गेल्या वेळपेक्षा शिवसेनेला पाच जागांचे नुकसान होणार आहे. तर शिंदे गटावर ठाकरे गट वरचढ ठरणार आहे.

महाराष्ट्रात आणखी एक मोठी लढाई राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये होणार आहे. शरद पवार गटाला ४ जागा आणि अजित पवार गटाला दोन जागा जिंकता येणार आहेत. एकंदरीत एनसीपीला दोन जागांचा फायदा होणार आहे. तर अजित पवारांपेक्षा काका पवारच वरचढ ठरताना दिसत आहेत. ही जरी आताची आकडेवारी असली तरी येत्या काळात काय राजकीय घडामोडी होतात त्यावर या जागांचे कल बदलण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला १२ जागाच मिळताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला टीएमसीला 29 आणि काँग्रेसला केवळ एक जागा मिळताना दिसत आहे.

गेल्यावेळी नितीशकुमार भाजपासोबत होते. आता त्यांनीच भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बिहारमध्ये भाजपाला ४० पैकी २० जागा मिळताना दिसत आहेत. तर नितीशकुमारांच्या जेडीयूला सात, लालूंच्या पक्षाला सात जागा मिळताना दिसत आहेत. एलजेपी २, आरएलजेपी १ आणि काँग्रेसच्या खात्यात १ जागा जाताना दिसत आहे.