एकनाथ शिंदेंना तडकाफडकी गटनेतेपदावरुन हटवलं, भुजबळांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 04:41 PM2022-06-21T16:41:15+5:302022-06-21T16:52:43+5:30

अनेकवेळा एखाद्या पक्षाचा नेता निवडणुकीत पडतो किंवा निवडून येतो. त्यामुळे, सरकार पडेल किंवा सरकारला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे सगळे आमदार रिचेबल आहेत, राष्ट्रवादीचेही रिचेबल आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्या आले आहे. आता, शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असं आवाहन करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेतील या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला असून आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवलं आहे. तर, शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत.

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवल्यानंतर यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घडलेल्या घडामोडीवर आणि गटनेते निवडीवर अनुभवातून राजकारण सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यामुळे सगळ्या आमदारांना सांभाळण्यासाठी, त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी, बैठकीचं नियोजन करण्यासाठी अशावेळेस एखाद्या गटनेत्याची आवश्यकता असते.

त्यामुळेच शिवसेनेकडून नवीन गटनेत्याची नियुक्ती केली असेल, असं राजकारण छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच, भुजबळ यांनी महाविकास आघाडीला सरकारला धोका नसून लवकरच हे बंड शमेल, असेही म्हटले.

अनेकवेळा एखाद्या पक्षाचा नेता निवडणुकीत पडतो किंवा निवडून येतो. त्यामुळे, सरकार पडेल किंवा सरकारला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे सगळे आमदार रिचेबल आहेत, राष्ट्रवादीचेही रिचेबल आहेत.

शिवसेनेचे अर्धे नॉट रिचेबल आहेत, तेही हळुहळु रिचेबल होतील. शिवसेनेचे नेते नाराजांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे, हे बंड लवकरच शमेल, असेही छगन भुजबळ यांनी म्हटलंय.