OBC Reservation: "तर ही वेळच आली नसती... हे पाप कोणाचं?"; Devendra Fadnavis यांचा Ajit Pawar यांना स्पष्ट शब्दांत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:34 PM2022-07-20T17:34:54+5:302022-07-20T17:39:20+5:30

"ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांना घेऊ द्या, आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की.."

Devendra Fadnavis Ajit Pawar, OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला दिलासा देणारा एक निर्णय आज जाहीर केला. बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारसी मान्य करत राज्यात निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला. आमचं सरकार येताच हा निर्णय झाल्याचा आनंद असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. 'राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा विजय आहे', असं मत अजितदादांनी मांडलं.

ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरून चढाओढ पाहायला मिळणं स्वाभाविकच होतं. पण याच मुद्द्यावरून फडणवीसांनी मात्र अजितदादांना कात्रीत पकडणारा सवाल केला.

"ओबीसी आरक्षणाला मान्यता हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा विजय आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार तसेच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली", असा दावा अजित पवार यांनी केला.

अजितदादांच्या दाव्यावर फडणवीसांनी तिरकस शब्दांत सवाल केला आणि अजित पवारांना खोचक टोलाही लगावला. "महाविकास आघाडीचे लोक आता श्रेय घेत आहेत. पण हेच शहाणपण जर मविआ च्या लोकांना १३ डिसेंबर २०१९ ला आलं असतं तर दोन वर्षांत ओबीसी आरक्षणाविना ज्या निवडणुका झाल्या, तसं घडलं नसतं", असे फडणवीस म्हणाले.

"आम्हाला यात अजिबात श्रेय घ्यायचं नाही. ज्यांना ज्या गोष्टींचे श्रेय हवं असेल त्यांनी खुशाल या गोष्टींचे श्रेय घ्यावे. पण जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर काही निवडणुका या दोन वर्षांत ओबीसी आरक्षणाविना झाल्या. हे शहाणपण योग्य वेळी केलं असतं तर ही वेळच आली नसती. हे पाप कोणाचं?", असे अतिशय स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सवाल केला.