पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 03:40 PM2023-01-26T15:40:52+5:302023-01-26T15:43:12+5:30

सुमारे ३ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. खरं तर, २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राजभवनात पहाटे पाच वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्याची त्या दिवशी महाराष्ट्रात आणि देशात एकच चर्चा झाली. आजही ती घटना अनेकदा लोकांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचाही तो खेळ असू शकतो. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती असा जयंत पाटील यांनी युक्तिवाद केला आहे.

पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असंही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी शरद पवारांनी ही युक्ती आजमावली असण्याची शक्यता आहे का? आता जयंत पाटील यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाटलांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाची सध्याची स्थिती पाहता राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांनी पक्ष सोडला मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली, हे सर्वश्रुत आहे असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

वास्तविक जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी विचारले होते की, शरद पवारांवर भाजपशी छुपे संगनमताचे आरोप केले जात आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क केले आहे. शरद पवार अप्रत्यक्षपणे भाजपासोबत असून त्यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे त्यांनी दावा केला

त्यानंतर राष्ट्रवादीनेही उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम देत ठाकरे यांनी लवकरात लवकर निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीबाबत निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करावी, असे म्हटले आहे. जेणेकरून आम्ही एकत्र बसून पुढील निर्णय लवकरात लवकर घेऊ शकू असं NCP नं सांगितले.

तर जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही. तो गौप्यस्फोट त्यावेळी का केले नाहीत. मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. कुणी काय म्हणाले याला काही अर्थ नाही असं सांगत भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.