Indian Railways: भारतात टॉयलेटविना 56 वर्षे धावली ट्रेन, एका पत्रामुळे घडला बदल; वाचा रंजक कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 05:48 PM2023-02-12T17:48:55+5:302023-02-12T17:53:43+5:30

Indian Railways Facts: भारतात ट्रेन सुरू झाल्यानंतर 56 वर्षे टॉयलेट नव्हते, एका भारतीयाच्या पत्रामुळे मोठा बदल घडला.

Indian Railways Toilet: आज भारतात 'वंदे भारत'सारखी अतिप्रगत ट्रेन धावत आहे, ज्यामुध्ये एकापेक्षा एक सुविधा मिळतात. पण, एक काळ होता, जेव्हा ट्रेनमध्ये प्रवाशांना टॉयलेटची सुविधाही नव्हती. 1853 मध्ये भारतात पहिल्यांदा ट्रेन धावली, तेव्हा त्यात शौचालये नव्हती. विशेष म्हणजे, त्यानंतर पुढील 56 वर्षे हे असेच चालू राहिले.

1909 मध्ये भारतात पहिल्यांदाच ट्रेनच्या आत स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली. हा निर्णय एका प्रवाशाच्या पत्रामुळे घ्यावा लागला. पोटदुखीने त्रस्त असलेल्या व्यक्तीने साहिबगंज विभागीय कार्यालयाला पत्र लिहून सांगितले होते की, तो शौचालयासाठी ट्रेनमधून खाली उतरला आणि त्यानंतर 2 मिनिटेही ट्रेन त्याच्यासाठी थांबली नाही.

गार्डच्या या कृतीमुळे तो संतापला आणि ट्रेनच्या मागे धावताना रुळावर पडून जखमी झाला. धोतर-लोटा धरुन त्याला रेल्वे मार्गावर धावावे लागले. या पत्रानंतर रेल्वेने मोठा बदल करत 50 मैलांपेक्षा जास्त अंतरावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था केली.

ट्रेनमधील टॉयलेटची रंजक कहाणी- अखिल चंद्र सेन यांनी पत्रात लिहिले की, मी रेल्वेने अहमदपूर रेल्वे स्थानकावर पोहोचलो. मला पोटदुखीचा त्रास होत होता. यामुळे मी शौचालयात गेलो. इतक्यात गार्डने शिट्टी वाजवली आणि ट्रेन सुरू झाली.

मग ट्रेन पकडण्यासाठी एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात धोताने सांभाळत मी रेल्वे रुळावर ट्रेनच्या दिशेने पळत सुटलो. त्यावेळी सर्वजण माझ्याकडेच पाहत होते. धावता-धावता मी तिथेच पडलो. त्यानंतरही गार्डनेट्रेन थांबवली नाही. या कृत्यासाठी गार्डला मोठा दंड ठोठावला पाहिजे. तसे झाले नाही तर ही बातमी मी वृत्तपत्रवाल्यांना देईन.

विशेष म्हणजे, अखिल चंद्र सेन यांच्यासोबत 1909 मध्ये ही घटना घडली नसती आणि त्यांनी ती गांभीर्याने घेऊन रेल्वे अधिकार्‍यांना पत्र लिहिले नसते, तर कदाचित आणखी काही दशके ट्रेनमध्ये टॉयलेटची सुविधा नसती.

मात्र, आता गाड्या वाय-फायसह सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज झाल्या आहेत. अखिल चंद्र सेन यांनी लिहिलेले पत्र दिल्लीच्या रेल्वे संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या पत्रामुळे भारतीय गाड्यांमध्ये टॉयलेटची सुविधा देण्यात आली होती. गाड्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले.