परभणी : आठ गाव योजनेच्या पाण्याचा मार्र्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:51 AM2019-01-10T00:51:41+5:302019-01-10T00:51:46+5:30

आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्राचा खंडित वीजपुरवठा नुकताच पूर्ववत करण्यात आल्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना दोन वर्षानंतर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Parbhani: Eighth village scheme's water supply is open | परभणी : आठ गाव योजनेच्या पाण्याचा मार्र्ग मोकळा

परभणी : आठ गाव योजनेच्या पाण्याचा मार्र्ग मोकळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्राचा खंडित वीजपुरवठा नुकताच पूर्ववत करण्यात आल्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना दोन वर्षानंतर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टंचाईच्या काळात निम्न दुधना प्रकल्पातून आठ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे कुंडी, म्हाळसापूर, देऊळगाव, आहेरबोरगाव, रवळगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, डासाळा या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु, योजनेच्या देवला येथील पंपहाऊस व रवळगावातील जलशुद्धीकरण केंद्र तसेच बोरगाव जवळच्या विद्युत पंपाचे १२ लाख रुपयांचे वीज बिल थकले होते. त्यानंतर महावितरण कंपनीने पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा तोडला होता.
यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच जमिनीतील पाणीपातळी कमी झाल्याने अनेक गावांसह योजनेतील गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करणे आवश्यक झाले होते. अगोदर थकित वीज बिलाची काही रक्कम ग्रामपंचायतीने भरण्यासाठी तयारी दर्शविली होती; परंतु, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी वीज थकबाकीची ५ टक्के रकमेचा भरणा करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर महावितरण व महसूल विभाग तसेच जीवन प्राधिकरण यांचा प्रस्ताव व अनेक किचकट बाबींची पूर्तता करण्यात काही कालावधी लागला. अखेर योजनेच्या पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्राचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने आठ गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.
पाणीपुरवठ्यास लागणार आठ दिवस
४आठ गाव पाणीपुरवठा योजनेची वीज पूर्ववत करण्यात आली असली तरी योजनेतून दोन वर्षापासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पंपहाऊसमधील विद्युत मोटारीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच गावापर्यंत पाणीपुरवठा करण्यास पाईपलाईनची तूटफूट झाली असेल तर त्याची दुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे योजनेचे पाणी प्रत्यक्ष गावापर्यंत जाण्यासाठी आठ दिवसांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती जीवन प्रााधिकरणाचे अभियंता कायंदे यांनी दिली.
विविध गावांमध्ये पाणी पोहोचविण्याचे आव्हान
४डासाळा आठ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम २० वर्षापूर्वी करण्यात आले होते. कामाचा दर्जा सुमार असल्याने योजना सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागते, वारंवार पाईप फुटतात. काही गावातील जलकुंभात पाणी जात नाही. त्यामुळे अद्यापही जिल्हा परिषदेने ही योजना जीवन प्राधिकरणाकडून हस्तांतरित केली नाही. केवळ पाणीटंचाईच्या काळात काही महिने या योनजेतून पाणीपुरवठा केला जातो. आजही तिडी पिंपळगाव व डासाळा या गावापर्यंत पाणी नेण्याचे आव्हान जीवन प्राधिकरणासमोर असणार आहे.
४आठगाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी १२ लाख रुपये महावितरणचे वीज बिल होईपर्यंत ते वीज वितरण कंपनीला अदा केले नाही. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा वीज जोडणीअभावी बंद होता; परंतु, राज्य शासनाने हे बिल भरण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Parbhani: Eighth village scheme's water supply is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.