महिला हॉकी संघाला ‘रियो’चे तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2015 02:39 AM2015-08-30T02:39:17+5:302015-08-30T02:39:17+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्रता गाठली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताला स्थान मिळेल. लंडनमध्ये सुरू असलेल्या
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्रता गाठली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताला स्थान मिळेल. लंडनमध्ये सुरू असलेल्या युरो हॉकी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्थान निश्चित करताच भारताला आॅलिम्पिकमध्येही जागा मिळाली. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी ही देशाला मिळालेली अनोखी भेट असल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
उपांत्य सामन्यात काल इंग्लंडने स्पेनचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हॉलंडने जर्मनीवर विजय मिळविला. इंग्लंड आणि स्पेन अंतिम सामना खेळणार असल्याने एक स्थान मोकळे झाले. हे दोन्ही संघ आधीच पात्र ठरले आहेत. भारतीय महिला हॉकी संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्याच्या वृत्तास आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानेही दुजोरा दिला.
भारताचा संघ विश्व हॉकी लीगची उपांत्य फेरी गाठू शकला नव्हता पण रँकिंग उत्कृष्ट असल्याने स्थान मिळाले. आॅलिम्पिकमध्ये पहिल्या दहा संघांत भारतासह द. कोरिया, अर्जेंटिना, ब्रिटन, चीन, जर्मनी, हॉलंड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका हे दहा संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. पुढील दोन संघांचा निर्णय आफ्रिका नेशन्स आणि ओसियाना कप या स्पर्धेमधून होईल.
भारताचा महिला हॉकी संघाने याआधी १९८० मध्ये मॉस्को आॅलिम्पिकमध्ये पात्रता मिळविली होती. त्या वेळी भारत चौथ्या स्थानावर राहिला. हॉकी इंडियाने महिला हॉकी संघाच्या या कामगिरीचे अभिनंदन केले. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, ‘‘आम्ही गेली ३६ वर्षे या क्षणाची प्रतीक्षा करीत होतो. ही कामगिरी अलीकडच्या काही कामगिरीपेक्षा सर्वांत अविस्मरणीय ठरली.’’ हॉकी इंडियाने खेळाडू आणि कोचिंग स्टाफची पाठदेखील थोपटली. (वृत्तसंस्था)
३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर देशाला गौरव आहे. पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ रियोमध्ये खेळतील आणि पदक जिंकून देशाचा सन्मान उंचावतील, यात शंका नाही. खेळ व खेळभावनेचा देशात सतत सन्मान होत राहील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
भारतीय महिला संघाला आॅलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणे ही ध्यानचंद यांना राष्ट्रीय क्रीडादिनी खरी श्रद्धांजली आहे. देशाच्या क्रीडाविकासासाठी आम्हा सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. देशात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, पण त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रोत्साहन आवश्यक आहे.
- सर्वानंद सोनोवाल, केंद्र्रीय क्रीडामंत्री
भारतीय महिला हॉकी संघाने रियोसाठी पात्रता मिळविणे खरोखर गौरवशाली क्षण आहे. महिला खेळाडूंच्या कडव्या संघर्षाचा हा परिणाम आहे. आम्हाला पुन्हा एकदा विश्व हॉकीवर अधिराज्य गाजवायचे झाल्यास एकत्रितपणे सामूहिक प्रयत्न करावे लागतील.
- जगबीरसिंग, माजी आॅलिम्पियन हॉकीपटू.