भारताचा पहिला डाव २१५ धावांवर संपुष्टात
By admin | Published: November 25, 2015 10:31 AM2015-11-25T10:31:28+5:302015-11-25T17:18:10+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारताने ७८.२ षटकात २१५ धावा केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने ७८.२ षटकात २१५ धावा केल्या आहेत. पहिल्याच दिवशी भारताची परिस्थिती बिकट झाली असून फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. भारताचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर फलंदाजी करण्यास उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर ९ षटकात २ बाद अवघ्या ११ धावा केल्या. स्टियानला शून्य धावेवर आर. अश्विनने झेलबाद केले तर इमरान ताहिरला चार धावांवर जडेजाने बाद केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताची सुरूवात तर चांगली झाली पण १५व्या षटकांत धवन अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर मुरली विजय (४०), पुजारा (२१), कोहली (२२), रहाणे (१३), रोहित शर्मा (२) आणि जडेजा (३४) धावांवर बाद झाले. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला जोरदार धक्के बसले. शेवटच्या फळीत उतरलेला रविचंद्रन अश्विन १५ धावांवर बाद झाला तर वृद्धिमान साहा ३२ धावांवर धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताला अवघ्या ७८.२ षटकांत २१५ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे मॉर्केलने ३, हार्मरने ४ आणि रबाडा, ताहिर व एल्गरने प्रत्येकी १ बळी टिपला.
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर बंगलोर येथे दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णयीत झाला. मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने तीन दिवसांत विजय मिळवला तर बंगलोरमध्ये पहिल्या दिवसानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. त्यामुळे आफ्रिकेसाठी हा तिसरा सामना करो वा मरो असा असून भारतीय संघही दुस-या विजयासाठी उत्सुक आहे.