मुंबई फायनलमध्ये, कोलकातावर 6 गडी राखून मात
By admin | Published: May 19, 2017 11:09 PM2017-05-19T23:09:21+5:302017-05-19T23:37:54+5:30
कोलकातानं दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं 6 गडी राखून 108 धावा विजय साजरा केला आहे.
बंगळुरू, दि. 19 - कोलकातानं दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं 6 गडी राखून 108 धावा करत विजय साजरा केला आहे. मुंबईनं 33 चेंडू बाकी असताना शानदार विजय मिळवत आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईचीही कामगिरी समाधानकारक नसली तरी मुंबईकडून शर्मा आणि पांड्यानं 54 धावांची भागीदारी केली आहे.
पांड्यानं नाबाद खेळीच्या जोरावर 30 चेंडूंत 8 चौकार लगावत 45 धावा केल्या आहेत. तर कर्णधार शर्मानं 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 26 धावा फडकावल्यात. पटेलनंही 14 धावांची खेळी केली आहे. सिमॉन्स 3, रायडू 6 आणि पोलार्डनं नाबाद राहत 9 धावा केल्या आहेत. कोलकाताकडून यादवनं पटेलचा बळी मिळवला. चावलानं सिमॉन्स आणि रायडू यांना घरचा रस्ता दाखवला आहे. नाइलनं शर्माला बाद करत मुंबईला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या विरोधात पहिल्यांदा फलंदाजी करणा-या कोलकातानं 18.5 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून सूर्यकुमार यानं 31 तर इशांक जग्गीनं 28 धावा बनवल्या होत्या. मुंबईकडून कर्ण शर्मानं 4 गडी, तर जसप्रीत बुमराहनं 3 बळी मिळवले होते. सहाव्या विकेटसाठी इशांक जग्गी आणि सूर्यकुमार यांनी 56 धावांची भागीदारी केली होती.
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या कोलकाताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. कोलकातानं दुस-याच षटकात पहिला बळी गमावला होता. बुमराहनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर ख्रिस लिन(4)ला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुंबईच्या कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेलनं यष्टिचीत करत सुनील नारायण(24)चा बळी मिळवला. मैदानावर आलेल्या उथप्पाला एक धावेवर समाधान मानून माघारी परतावं लागलं आहे. बुमराहनं रॉबिन उथप्पाला (1) पायचीत केलं.
सातव्या षटकांत मुंबईच्या कर्ण शर्मानं फिरकीच्या जोरावर दोन चेंडूंत दोन बळी घेऊन कोलकाताला नामोहरम केले होते. सातव्या षटकांत कर्णच्या गोलंदाजीवर गौतम गंभीर(12) हार्दिक पंड्याकरवी झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्ण शर्मानं कोलिन ग्रँडहोम याला शून्यावरच बाहेरचा रस्ता दाखवला. सहावा बळीही कर्ण शर्मानंच मिळवला. कर्णनं 15व्या षटकांत इशांक जग्गी(28)ला मिशेल जॉनसनकरवी झेलबाद केले. जग्गीनं 31 चेंडूंत 3 चौकार लगावले. अखेर कोलकाताचा पराभव करत मुंबईनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.