प्रवेश अर्जाच्या नावाखाली पालकांची लूट
By admin | Published: July 17, 2017 01:29 AM2017-07-17T01:29:46+5:302017-07-17T01:29:46+5:30
अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाला सुरुवात झाली. यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांकडून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाला सुरुवात झाली. यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांकडून नेरुळमधील तेरणा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रवेश अर्जाकरिता हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याने पालकांनी तक्रार केली आहे. इतर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश अर्ज शुल्कासाठी घेतली जाणारी रक्कम निम्म्याहून कमी असल्याने पालकांची लुबाडणूक का केली जात आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
परिसरातील समाजसेवकांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता संस्था विनाअनुदानित असल्याने ही शुल्कआकारणी योग्य असल्याचा दावा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके यांनी दिली. यावेळी शाळा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसंदर्भातील माहिती देण्यास नाकारण्यात आल्याचेही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुल्क नियंत्रण पूर्वपरवानगीशिवाय कुठल्याही विनाअनुदानित शाळांना शुल्क वाढ करता येत नसल्याचेही परंतु प्रवेश अर्ज शुल्क याद्वारे बेकायदेशीर शुल्कवसुली केली जात असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. शिक्षण विभाग व शासनाच्या वतीने सर्व महाविद्यालयात प्रवेश अर्ज शुल्काची किंमत एकसारखीच करण्यासाठी गांभीर्याने विचार व प्रयत्न करून पालकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार याकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. इतर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश अर्ज शुल्कासाठी ५० ते ५००रूपये विद्यार्थ्यांना मोजावे लागत असून तेरणा कनिष्ठ महाविद्यालयाकडून मात्र दुपटीने शुल्क आकारले जात असल्याचा असंतोष पालकांनी व्यक्त केला आहे.