शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी शिल्पे दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:38 AM2019-03-14T00:38:04+5:302019-03-14T00:38:08+5:30

देखभालीसाठी यंत्रणाच नाही; सिडकोसह महानगरपालिकेची कंजुषी; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

The city's beauty-enhancing sculptures are notorious | शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी शिल्पे दुर्लक्षितच

शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी शिल्पे दुर्लक्षितच

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : सिडकोसह नवी मुंबई महानगरपालिकेने शहर सुशोभीकरणासाठी अनेक ठिकाणी शिल्पे उभारली आहेत. रेल्वे स्टेशन, बसस्थानकासह उद्यानांमध्ये कारंजे व कृत्रिम धबधबेही तयार केले आहेत; परंतु त्यांची देखभाल करण्यासाठी यंत्रणाही उभी केली नाही व खर्च करण्यातही कंजुषी केली जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

देशातील सातव्या व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेनेही वाटचाल सुरू झाली आहे. प्रथम सिडको व नंतर महानगरपालिकेने शहरातील विकासकामे करण्याबरोबर शहर सुशोभीकरणावरही लक्ष दिले आहे. २००५ मध्ये सिडकोने विशेष कार्यशाळेचे आयोजन करून नवी मुंबईच्या वैभवात भर टाकतील अशी शिल्पे तयार करून घेतली होती. कार्यशाळेतून तयार झालेली शिल्पे महामार्ग, रेल्वे स्टेशन व इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आली. १३ वर्षांमध्ये या कलाकृतींचे नक्की काय झाले याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. दुर्लक्षित स्थितीमध्ये ही शिल्पे असून त्यांच्या सभोवती कचरा पडला आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढली आहेत. प्रशासन काहीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिल्पे तयार करताना व बसविताना शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या कलाकृती अडगळीत पडल्या आहेत. वाशी रेल्वे स्टेशनची इमारत आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क म्हणून ओळखली जाते. रेल्वे स्टेशनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे यासाठी समोरील बाजूला भव्य कारंजे उभारण्यात आले होते; परंतु १५ वर्षांपासून ते बंद अवस्थेमध्ये असून त्याची देखभाल करण्याकडे लक्ष दिले जात नाही.

सिडकोने जुईनगर व नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही कारंजे बसविले होते. नेरूळमध्ये दगडांचा वापर करून आकर्षक शिल्प तयार केले होते. शहराची निर्मिती असे त्याचे स्वरूप होते; परंतु सद्यस्थितीमध्ये त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून शहराचे शिल्पकार म्हणविणारे त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. खारघर पुलाखाली असलेले शिल्पही दुर्लक्षित असून त्याची देखभाल केली जात नाही.
महानगरपालिकेनेही अडीच दशकांच्या वाटचालीमध्ये सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वाशीतील शिवाजी चौक, सेक्टर १७, नेरूळ पश्चिमेकडील बसस्थानक व इतर अनेक ठिकाणी शिल्पे व कारंजे तयार केली आहेत; पण त्यांची देखभाल केली जात नाही. अनेक ठिकाणी कारंजे बंद अवस्थेमध्येच आहेत. प्रत्येक वर्षी स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करायचे व अभियान संपताच पुन्हा शहर अस्वच्छतेमध्ये भर टाकायची असे प्रकार सुरू आहेत.

शहराची प्रतिमा मलीन
महानगरपालिका व सिडको सुशोभीकरणावर प्रचंड खर्च करते. शिल्प, कारंजे तयार केले जातात; परंतु त्यांची देखभाल करण्यासाठी खर्च करताना कंजुषी केली जाते. नागरिकांनी आवाज उठविला की तात्पुरती दुरुस्ती केली जाते. सद्यस्थितीमध्ये अडगळीत पडलेली शिल्पे व बंद कारंजामुळे शहराची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे.

‘फिफा’साठीचा खर्चही व्यर्थ
‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नेरुळमध्ये खेळविण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महापालिकेने शहर सुशोभीकरणासाठी प्रचंड खर्च केला. पामबीच रोडवर वाशीमध्ये व उरण फाटा ते मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर वंडर्स पार्कजवळ फुटबॉलची प्रतिकृती तयार करून परिसरात हिरवळ लावली होती. यामधील वाशीतील हिरवळ कधीच गायब झाली असून तेथे झुडपे वाढली आहेत. फुटबॉलवर धूळ साचली आहे. नेरुळमधील हिरवळीचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.

उत्सव चौकाप्रमाणे देखभाल हवी
सिडकोने खारघरमध्ये भव्य उत्सव चौक उभारला आहे. नुकतीच त्याची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. तेथील शिल्प पाहून शहरवासी व बाहेरून येणाऱ्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून, याच धर्तीवर नवी मुंबई व पनवेल परिसरामधील इतर शिल्प व चौकांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: The city's beauty-enhancing sculptures are notorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.