आव्हान बदलत्या गुन्हेगारी स्वरूपाचे, हॅकर्सची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:27 AM2018-01-01T07:27:12+5:302018-01-01T07:27:22+5:30

बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालल्याने स्मार्ट गुन्हेगारी ही जागतिक समस्या बनली आहे. वेबसाइट हॅक करून, लॉटरी लागल्याच्या इमेलद्वारे, अथवा बनावट एटीएम तयार करून आर्थिक फसवणुका होत आहेत.

 Challenge of changing criminal nature, fear of hackers | आव्हान बदलत्या गुन्हेगारी स्वरूपाचे, हॅकर्सची भीती

आव्हान बदलत्या गुन्हेगारी स्वरूपाचे, हॅकर्सची भीती

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालल्याने स्मार्ट गुन्हेगारी ही जागतिक समस्या बनली आहे. वेबसाइट हॅक करून, लॉटरी लागल्याच्या इमेलद्वारे, अथवा बनावट एटीएम तयार करून आर्थिक फसवणुका होत आहेत. अशा गुन्ह्यांमागे देश-विदेशातील आयटी क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान येत्या काळात पोलिसांपुढे राहणार आहे.
स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत, मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट बनली आहे. काही वर्षांपूर्वी ठरावीक उद्देशाने मारामारी, हत्या, जबरी चोरी असे गुन्हे घडायचे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांत इंटरनेटद्वारे घडणाºया गुन्हेगारी पद्धतीने शहरात डोके वर काढले आहे; परंतु अशा गुन्ह्यांचा सूत्रधार देश-विदेशातील कोणत्या कोपºयात लपला आहे, हे इंटरनेटच्या जाळ्यातून शोधून काढणे सहज शक्य नसल्याने भविष्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. त्याकरिता पोलिसांचा सायबर सेलही तितकाच सक्षम करणे, ही काळाची गरज बनली आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा सायबर हल्ला जून महिन्यात जेएनपीटीच्या सर्व्हरवर झाला होता. त्या ठिकाणी देश-विदेशातील सुमारे ३ ते ४ हजार कंटेनरची प्रतिदिन आवक-जावक सुरू असते. ही यंत्रणा पूर्णपणे संगणकाद्वारे हाताळली जात असून, नेमका त्याच सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाला होता. अज्ञात हॅकर्सने तिथले अडीचशेहून अधिक संगणक ठप्प करून, ते व्हायरसमुक्त करण्यासाठी ३०० डॉलर्स बिटकॉइन खंडणी मागितली होती. आयटी क्षेत्राने भरलेल्या नवी मुंबई सारख्या स्मार्ट सिटीला येत्या काळातील गुन्हेगारी पद्धतीपासून सतर्क करणारा हा सायबर गुन्हा होता; परंतु यानंतरही बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपाचे पोलीस व नागरिकांकडून फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नायझेरियन स्कॅम, आॅनलाइन फसवणूक अशा घटना सुरूच आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांची उकल पोलिसांच्या सायबर सेलने करून गुन्हेगारांना अटकही केलेली आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांत माहीर असलेल्यांपर्यंत पोलिसांचे हात अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांसाठी पुढील काही वर्षे तरी सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
व्यापार क्षेत्रातली व्याप्ती विदेशापर्यंत पोहोचल्याने त्यांच्यातील व्यवहार इमेलद्वारे होतात. अशा व्यवहारांवर लक्ष ठेवून संबंधित कंपनीचा बनावट इमेल तयार करून व्यवहाराची रक्कम वेगळ्याच खात्यात जमा करून घेतली जात आहे. तर फेसबुक, मॅट्रिमोनीअल वेबसाइटवरील बनावट खात्याद्वारे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, बलात्कारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. तर तरुणींचे खासगी फोटो व्हायरल करून त्यांना ब्लॅकमेल केले जाते.

सायबर गुन्ह्यांचा बळी पडण्यापासून वाचण्यासाठी मोबाइलवर इंटरनेट व संगणकाच्या वापरकर्त्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक इमेलद्वारे दाखवलेल्या प्रलोभनापासून दूर राहणे गरजेचे आहे. तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती अनोळख्या व्यक्तीला देण्याचे टाळले पाहिजे, तरच अशा गुन्हेगारी घटनांना आळा बसणे शक्य आहे.

जेएनपीटीवरील सायबर हल्ल्यानंतर भविष्यातली गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत समोर आली आहे. जुलै महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांची माहिती चोरून स्वत:च्या फायद्यासाठी ती संकेतस्थळावर टाकल्याचा प्रकार घडला होता.
हॅकर्सकडून गोपनीय माहिती चोरून संबंधिताला खंडणीसाठी धमकावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ब्लू व्हेल गेमच्या माध्यमातून तरुणांना आत्महत्येला भाग पाडणे, हासुद्धा सायबर गुन्ह्याचाच प्रकार आहे. यासंदर्भात सर्वसामान्यांना जागरुक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नायजेरीयन स्कॅमचा धोका

सायबर गुन्हे करणाºयांकडून गुन्हा करण्यासाठी बनावट इंटरनेट आयपीचा वापर केला जातो, असे आयपी बदलणारे सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत. यामुळे इंटरनेच्या जगभर पसरलेल्या जाळ्यामधून त्या आयपीचा नेमका वापर कुठून झाला, हे शोधणे तितके सहज शक्य नाही. याकरिता पोलिसांकडेही आयटी तज्ज्ञांची आवश्यकता आहे; परंतु याबाबत शासनाने अद्याप फारसे गांभीर्य घेतलेले नसल्याने नवी मुंबई पोलिसांचेच संकेतस्थळ दोनदा हॅक झाले होते.
लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाºया नायजेरीयन टोळ्यांनी आंतरराष्टÑीय स्तरावर जाळे पसरवले आहे. त्यामुळे अशा गुन्ह्याला नायजेरीयन स्कॅम अशी ओळख मिळाली आहे. एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागल्याचा इमेल पाठवून प्राथमिक स्वरूपात त्याच्याकडून बँकेची माहिती मिळवली जाते.
लॉटरी लागलेली रक्कम मिळवण्यासाठी ठरावीक रकमेची मागणी करून ती दिल्यास संपर्क तोडला जातो. अथवा ग्राहकाने दिलेल्या बँकेच्या माहिती आधारे त्याच्या खात्यातून रक्कम लुटली जाते.

Web Title:  Challenge of changing criminal nature, fear of hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.