स्वाध्याय परिवाराची अनोखी जलभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:05 AM2019-07-01T01:05:03+5:302019-07-01T01:05:43+5:30

ल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झाले

 Unique water distribution of the Swadhyayas family | स्वाध्याय परिवाराची अनोखी जलभक्ती

स्वाध्याय परिवाराची अनोखी जलभक्ती

Next

नाशिक : जल हे केवळ माणसाचेच जीवन नाही, धरणी मातेचेही आहे. तहानलेल्या पृथ्वीला पाणी देणे, ते मुरवणे म्हणजे धरणी मातेला तृप्त करणेच होय. अशा भक्तिभावातून नाशिक जिल्ह्यात स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पूजनीय आठवले शास्त्री ऊर्फ दादा यांच्या प्रेरणेतून काम सुरू झाले आणि निर्मल नीर, शोष खड्डे, विहिरीचे पुनर्भरण आणि छतावरील पावसाळी पाण्याचा दैनंदिन जीवनात वापर यासाठी हजारो प्रकल्प उभे राहिले. त्या माध्यमातून लाखो लीटर पाणी मुरवले जाते आणि काही पाण्याचा पुनर्वापरदेखील होत आहे.
दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा साठा आटू लागला आणि पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले तसे निसर्गाला लहरी ठरवले गेले. मात्र, पाण्याची बचत करणे आवश्यक ठरू लागल्याने शासकीय स्तरावर कायदे होऊ लागले. तथापि, कोणत्याही कायद्याशिवाय स्वेच्छेने आणि शासकीय मदतीशिवाय जलबचत आणि संचयाचे काम नेटाने स्वाध्याय परिवाराने सुरू ठेवले आहे आणि बदलत्या काळात तीच मोठी गरज निर्माण झाली आहे.
पूजनीय दादांनी साठ वर्षांपूर्वी हा विचार मांडला. देवाने ही सृष्टी निर्माण केली, ती मानवानेच बिघडवली आणि आता ती पूर्ववत करण्याची जबाबदारी मानवाचीच आहे. अशा प्रेरणेतून बाल तरू संवर्धनापासून जल चळवळीपर्यंतचे अनेक प्रकारचे कार्य भक्तीमार्गाने करण्याची शिकवण पूजनीय आठवले शास्त्री आणि पूजनीय धनश्री दीदी यांनी दिली. त्याच मार्गावरून स्वाध्यायी चालत आहेत. ते कोणत्याही प्रसिद्धी, पुरस्काराची अपेक्षा न ठेवता !
नाशिकमध्ये स्वाध्याय परिवाराचे जलसंचयाचे काम १९९६ पासून सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये त्याआधी परिवाराच्या काही अभियंत्यांनी जलसंचयाची कामे सुरू केली होती १२ मे १९९६ रोजी. पूज्य दादांनी नाशिकच्या काही स्वाध्यायींना मुंबईत गुजरातमधील काही स्वाध्यायींकडून जलसंचयाची माहिती घेण्यासाठी बोलावले आणि त्याचदिवशी त्यांच्याकडील माहिती घेतल्यानंतर तत्काळ तेथूनच ते नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हरसूल येथे गेले. तेथील ग्रामस्थांना एकत्र करून पाण्याचे महत्त्व आणि त्यामागील भक्तिभाव समजावून सांगितला आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमभक्ती (श्रमदान) करून तलाव बांधला. हा नाशिकमधील पहिला ‘निर्मल नीर’ चा प्रयोग. त्यानंतर दिंडोरी, सटाणा, पेठ, सिन्नर यांसह सर्व जिल्ह्यांत निर्मल नीर बांधले गेले. त्याच जोडीला जमिनीची धूप थांबवून उतारावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून जाणारी माती अडवून नंतर पाणी अडवण्यासाठी चेक डॅम बांधले जाऊ लागले. त्याचदरम्यान, परिवाराने घरगुती सांडपाणी आणि अन्य वापरलेले पाणी भूगर्भात भरण्यासाठी अनोखी चळवळ चालवली आणि घरांजवळ शोषखड्डे केले. त्यातून घराबाहेर वाहणारे पाणी थांबले आणि आरोग्याचा प्रश्नही सुटला.
पंचमहाभुते आपले कर्तव्य नियमितपणे करीत असतात, त्यालाच यज्ञ असे म्हणतात अशा शिकवणीतून मग पावसाचे पाणी पडल्यावर ते वाहून जाण्यापेक्षा तहानलेल्या भूमातेला देण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम १९९६ पासूनच सुरू झाले. छतावरील पाणी हे कूपनलिकेजवळ सोडून वापरविणे किंवा भूजल पातळी वाढविण्यासाठी सोडणे हे काम सामान्यच आहे. वेगळेपण स्वाध्यायींनी दाखवून दिले आहे. नाशिक शहरातच अशाप्रकारचे पाचशे पावसाळी पाणी संचय उपक्रम राबविले आहेत.
सर्व उपक्रमांची वैशिष्ट्ये म्हणजे परिवार म्हणून ते राबविताना सर्वजण दैवी भातृभावाच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करतात. मातृसंस्थेकडून पाईप, सीमेंट वगैरे विविध प्रकारचे साहित्य नम्रपणे ‘प्रसाद’ म्हणून स्वीकारतात. नाशिक जिल्ह्यातील अशा कामांसाठी तब्बल परिवारातील चाळीस स्वाध्यायी अभियंते सहकारी ‘एकमेका सहाय्य करू..’ या उक्तीने मार्गदर्शन करतात. सरकारी कायद्यामुळे, भीतीमुळे काम होऊ शकते. परंतु प्रेरणा, भक्तिभाव आणि स्वेच्छेने काम झाले तर ते अधिक आत्मियतेने होते आणि टिकून राहाते, हेच स्वाध्याय परिवाराने दाखवून दिले आहे.
१९९६ पासून सुरू केलेल्या या कार्याची फलश्रुती मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्यात २२२ निर्मल नीर, १४ हजार ५५३ शोषखड्डे, ९ हजार ९९८४ चेक डॅम आणि ३ हजार ९३० विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणाचे उपक्रम राबविण्यात आले असून, पाचशेहून अधिक घरांवर पावसाळी पाणी साठवण आणि पुनर्वापर केला जात आहे.

Web Title:  Unique water distribution of the Swadhyayas family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.