विधानसभेसाठी ‘मनसे फॅक्टर’ दुर्लक्षिता न येणारा

By किरण अग्रवाल | Published: June 3, 2019 12:37 AM2019-06-03T00:37:14+5:302019-06-03T00:41:36+5:30

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने विचलित न होता, नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीच्या विरोधकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादीचे काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा हा त्याचाच एक भाग ठरावा. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘मनसे’ला सोबत घेण्याची तयारीही त्याचदृष्टीने महत्त्वाची व राजकीय समीकरणांची फेरमांडणी करावयास लावणारी आहे.

MNS factor ignored for assembly elections | विधानसभेसाठी ‘मनसे फॅक्टर’ दुर्लक्षिता न येणारा

विधानसभेसाठी ‘मनसे फॅक्टर’ दुर्लक्षिता न येणारा

Next
ठळक मुद्दे नाशकात विरोधकांमध्ये पराभवाची कारणमीमांसा करण्याएवढेही त्राण उरले नाही?राजकीय फेरमांडणीची गरजप्रचारात ‘व्हिडीओ साक्षी’चा नवा प्रयोग राबविणारा नेता म्हणून राज ठाकरे

सारांश
लोकसभा निवडणुकीत ‘मनसे फॅक्टर’ अपेक्षेप्रमाणे उपयोगी ठरू शकला नाही हे खरे; पण म्हणून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. किंबहुना, त्यासंबंधीची यथार्थता जाणून असल्यामुळेच काँग्रेस महाआघाडीकडून त्यांना सोबत घेण्याचे संकेतही मिळत आहे. नाशिकच्या स्थानिक राजकारणात राजकीय फेरमांडणीच्या चर्चा घडून येणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाऱ्या भाजप-शिवसेनेसाठी लाभदायक ठरल्या, तसा राज ठाकरे यांनी केलेला प्रचार काँग्रेस आघाडीकरिता उपयोगी ठरणे अपेक्षित होते. पण, तसे होऊ शकले नसले तरी राज्यात गर्दी खेचणारा (क्लाउड पुलर) व प्रचारात ‘व्हिडीओ साक्षी’चा नवा प्रयोग राबविणारा नेता म्हणून राज ठाकरे हे नाव जे अधोरेखित झाले, ते दुर्लक्षिता न येणारेच आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांची दाणादाण उडाल्याचे निकाल समोर आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची व्यूहरचना करताना ‘मनसे फॅक्टर’ला जमेत धरणे त्यामुळेही गरजेचे बनले असावे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यादृष्टीने अनुकूलता समोर आली असताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे राज यांच्या भेटीस जाऊन आल्याने, त्यांचा पक्षही याबाबत सकारात्मक राहण्याची शक्यता बळावून गेली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार उभे न करता प्रचाराच्या रिंगणात उतरलेली ‘मनसे’, विधानसभेकरिता स्वत:चे उमेदवार घेऊन आघाडीसोबत येण्याच्या शक्यतेने प्राथमिक अवस्थेतच चर्चेचे पेव फुटून गेले आहेत.
वस्तुत: लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या गर्तेतूनच अजून अनेकजण बाहेर आलेले नाहीत. केंद्र व राज्यस्तरावर बैठका होऊन पराजयाची कारणमीमांसा केली गेली असली, तरी स्थानिक पातळीवरची सामसूम ओसरलेली नाही. परंतु अशाही अवस्थेत पराभवाने खचून न जाता, पुन्हा उद्याच्या लढाईसाठी सज्ज व सिद्ध होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, ‘मनसे’ला अधिकृतपणे सोबत घेण्याची चर्चा त्यातूनच पुढे आली आहे. तसे झाले तर कधीकाळी राज ठाकरे यांचे प्रभाव क्षेत्र राहिलेल्या नाशिकमध्ये काय घडून येईल किंवा राजकीय गणितांची कशी फेरमांडणी केली जाऊ शकेल, यासंबंधीची खलबते होणे क्रमप्राप्त ठरले आहे. अर्थात, नाशिक महापालिकेची सत्ता भूषवतानाच शहरातील तीन आमदार देणाºया ‘मनसे’ची आज पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही हेही खरे, महापालिकेतील या पक्षाचे संख्याबळ कमालीचे घटले आहेच, शिवाय पक्ष-संघटनात्मक स्थितीही खूप सुखावह अगर प्रभावी आहे, अशातला भाग नाही. परंतु काहीच न करणाºया अगर सक्रिय न दिसणाºया अन्य विरोधकांपेक्षा ‘मनसे’ त्यातल्या त्यात बरी असे म्हणता यावे. या पक्षाच्या नेत्यांनी संपर्कातले सातत्य राखले व निश्चित कार्यक्रम हाती घेऊन पुढील वाटचाल सुरू केली तर निराशेचे ढग दूर सारण्याची अपेक्षा नक्कीच धरता येणारी आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आज नवी उमेद व आशा जागवून कार्यकर्त्यांना उभारी देण्याची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी त्याबाबत सुस्तच आहे. उभारीचे सोडा; पण पराभवाची कारणमीमांसादेखील त्यांच्याकडून होईनासी झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी नाशिक दौरे करून पक्ष, कार्यकर्त्यांना जनसामान्यांत जाण्याचे, त्यांचे प्रश्न हाती घेऊन सक्रियता राखण्याचे सल्ले दिले होते, मात्र तसे अपवादानेच झालेले पाहावयास मिळाले. त्यामुळे त्याच त्या नावांखेरीज व चेहऱ्यांशिवाय नवीन कुणी या पक्षात पुढे आलेलेच दिसत नाहीत. परिणामी उद्या विधानसभेची वेळ येईल तेव्हा पुन्हा तेच उमेदवार पुढे येणे क्रमप्राप्त आहे. भाजप-शिवसेनेतील विधानसभेसाठीच्या इच्छुकांनी लोकसभा लढताना स्वत:लाही प्रोजेक्ट करून घेण्याचा चाणाक्षपणा ओघाने दाखविला तसा विरोधकांमध्ये कुणी दाखवलेला दिसला नाही. त्यामुळे अमुक एका मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण, याचा विचार करायचा तर प्रबळ नावे समोर येत नाहीत. अशा स्थितीत ‘मनसे’ला नाशकातील काही जागांनी खुणावणे आश्चर्याचे वाटून घेता येऊ नये. त्यामुळेच लोकसभा निवडणूक सरली व त्यात ‘मनसे फॅक्टर’ विरोधकांच्या कामी आला नाही म्हणून त्याबाबतचे कवित्व संपले असे न होता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते नव्याने चर्चेत आले आहे.

Web Title: MNS factor ignored for assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.