ग्रामीण भागातील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 06:46 PM2019-06-04T18:46:32+5:302019-06-04T18:46:51+5:30
मानोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मुखेड फाटा-पिंपळगाव लेप या चार किलोमीटर आणि मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक तसेच जळगाव नेऊर ते पाटोदा या रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली असून या रस्त्याने ये-जा करताना वाहनचालकांंची दमछाक होत असून रस्त्यांची चाळण होऊन वाट खडतर झाली आहे.
या रस्त्यांवर ठिकठिकाणी तयार झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या चार किलोमीटर रस्त्याने प्रवास करताना काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडलेले आणि काही रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. हा चार किलोमीटर अंतराचा रस्ता पार करण्यासाठी जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर वाहनचालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा या रस्त्याने प्रवास करताना चार चाकी वाहनाचे पाटे तुटणे, नट बोल्ट गळून पडणे, वाहनांमध्ये बिघाड होणे, असे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मणक्याचे , पाठीचे आजार देखील उद्भवले असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. येवला येथील तालुकास्तरीय कामकाज, कांदा बाजार आदी शासकीय कामासाठी येवल्याला जाण्यासाठी तसेच मुखेड फाट्याला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. परंतु रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे मोटारसायकलींमध्ये बिघाड होणे, वाहनाचे नुकसान होणे आदी प्रकार घडत आहेत. त्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपांनी साइड पट्ट्या व्यापलेल्या असल्याने दोन मोठ्या वाहनांना शेजारून जाताना अडथळा निर्माण होत आहे.
मागील काही महिन्यांपासून मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांना बाजारात सफेद एलईडी बल्ब बेकायदेशीरपणे बसवून मिळत असल्याने अनेक वाहनचालक आपल्या वाहनाचा मुख्य बल्ब न वापरता सफेद एलईडी बल्ब वापरत असल्याने ग्रामीण भागात रस्त्याच्या अरु ंद स्थितीमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना समोरून सफेद एलईडी बल्बचा तीव्र प्रकाश वाहनचालकांच्या डोळ्यावर येत असल्याने दुसऱ्या वाहनचालकाला वाहन बाजूला घेण्यासाठी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक थेट काटेरी झुडपात जाऊन पडत आहे. यासाठी वाहनांवर सफेद एलईडी बल्ब लावणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच जळगाव नेऊर-पिंपळगाव लेप,देशमाने -पिंपळगाव लेप,शिरसगांव लौकी-पिंपळगाव लेप,पाटोदा-पिंपळगाव लेप,आदी भागातील रस्ते खिळखिळे झालेली आहेत.अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दूरवस्था झाल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करून या मुखेड फाटा ते पिंपळगांव लेप , मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक आणि जळगाव नेऊर ते पाटोदा या रस्त्याचे डांबरीकरण आणि रु ंदीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.