ताणतणावावर मात आपल्याच हातात : रमाकांत गाडीवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:01 AM2019-07-14T00:01:57+5:302019-07-14T00:03:12+5:30

पूर्वीचे संथ आयुष्य मागे पडून सर्वच क्षेत्रात आणि आयुष्याच्या सर्वच टप्प्यावर स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकण्यासाठी सुरू असलेली ही आयुष्याची शर्यत नकळतपणे ताणतणाव वाढवत आहे. त्याच्या जोडीने येणारे आजार, चिडचिडेपणा, राग, अनामिक, भीती यासारख्या प्रकारांचा परिणाम कुटुंबावर होत असल्याने ताणतणावापासून दूर राहा आणि मोकळेपणारने आयुष्य जगा, असा सल्ला मानसशास्त्राचे अभ्यासक आणि क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट डॉ. रमाकांत गाडीवान यांनी दिला आहे.

Tackling Stress in Your Own: Ramakant Gadivan | ताणतणावावर मात आपल्याच हातात : रमाकांत गाडीवान

ताणतणावावर मात आपल्याच हातात : रमाकांत गाडीवान

Next
ठळक मुद्देसमुपदेशन आणि क्लिनिकल हिप्नोथेरपी सुटकेचा उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वीचे संथ आयुष्य मागे पडून सर्वच क्षेत्रात आणि आयुष्याच्या सर्वच टप्प्यावर स्पर्धा वाढली आहे. त्यात टिकण्यासाठी सुरू असलेली ही आयुष्याची शर्यत नकळतपणे ताणतणाव वाढवत आहे. त्याच्या जोडीने येणारे आजार, चिडचिडेपणा, राग, अनामिक, भीती यासारख्या प्रकारांचा परिणाम कुटुंबावर होत असल्याने ताणतणावापासून दूर राहा आणि मोकळेपणारने आयुष्य जगा, असा सल्ला मानसशास्त्राचे अभ्यासक आणि क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट डॉ. रमाकांत गाडीवान यांनी दिला आहे.
ताणतणाव आणि मुक्तता या विषयावर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, बदललेल्या जीवनशैलीने हल्ली सर्वांच्याच जगण्याचा डौल बदलला आहे. ‘लवकर निजे, लवकर उठे’ हे वचन कधीचेच मागे पडलेय. विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच आयुष्याची गती आणि दिशा बदलली. बालकाश्रम, कुटुंबाश्रम आणि संन्यासाश्रम असे तीन आश्रम आपल्या संस्कृतीने घालून दिले. त्यातूनच आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर जगण्याची दिशा, नियम घालून दिले होते. मात्र बहुतेक पालक अलीकडे मुलांकडून मोठ्या अपेक्षा करायला लागले आहेत. मुलांचा कल आणि बुद्ध्यांक लक्षात न घेता अपेक्षांचे ओझे लादले जात आहे. क्षमता नसलेली मुले यात मागे पडतात. कालांतराने ती स्वत:ला कमजोर समजायला लागतात. त्यातूृन त्यांच्या मनात नैराश्य येते.
मोबाईलवरील ब्ल्यू व्हेल, पब-जी यासारख्या गेममध्ये अडकलेली मुले, दिवसभर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, यू-ट्युबमध्ये अडकून पडलेली व अभ्यासाकडे पाठ फिरविणारी मुले, हातून रिमोट काढून घेतल्यावर आक्रमक आणि हिंसक होणारी मुले ही अलीकडे उद्भवलेली मोठी समस्या आहे. मित्राकडे आहे तस्साच मोबाईल हवा, यासाठी हट्ट धरणारी ही मुले भविष्यात अतिवापरामुळे स्वत:चे नुकसान करून घेतात. त्यामुळे मोबाईल किंवा रिमोट हाती देताना सुरुवातीलाच त्यांना अटी घालणे योग्य असते. या गर्तेत फसलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाचा आधार घेणे योग्य असते. क्लिनिकल हिप्नोथेरपीमधून कसलाही औषधोपचार न करता केवळ काही दिवसात मानसिक उपचार करून यामधून बाहेर काढता येते.
कॉर्पोरेट क्षेत्रात ताणतणावाची समस्या मोठी आहे. नोकरीसाठी क्षेत्र निवडताना स्वत:च्या क्षमता ओळखल्या नाही तर पुढे नैराश्य येते. नोकरी करताना कामात आनंद मिळत असेल तर कसलाही थकवा येत नाही. मात्र कामात आनंद नसेल तर नैराश्य आणि ताणतणाव येतो. कॉर्पोरेट क्षेत्रात अलीकडे हे प्रमाण अधिक वाढले आहे.
एकदा नोकरी सुरू केली; वय वाढले; कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या की त्यातून बाहेर पडता येत नाही. अशा वेळी कामाबद्दल आवड वाढवून घ्यावी. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार केले तर कामाच्या ठिकाणावरचा ताण हलका होतो. बॉसकडून होणारे डॉमिनेटिंग अशा काळात अधिक कष्टदायक असते. त्यामुळे जुळवून घेणेच महत्त्वाचे असते. नेमका ताण कशामुळे येतो हे लक्षात घेऊन अंतर्गत व्यवस्थापन करून घ्यावे. मेडिटेशनमधून यावर मात करता येते. तिसºया टप्प्यात हिप्नोथेरपीचा वापर केल्यास फायदा होतो.
निवृत्तीनंतरच्या काळातील येणारे ताणतणाव वेगळे, मात्र फारसे गंभीर नसतात. नोकरीच्या काळातील संपूर्ण आयुष्यच टार्गेटच्यामागे धावण्यात घालविल्यामुळे निवृत्तीनंतरचा रिकामा वेळ अनेकांना अस्वस्थ करतो. दिवस संपता संपत नाही. अशा वेळी स्वत:ला सुरुवातीपासूनच एखाद्या छंदामध्ये गुंतविणे गरजेचे असते. नोकरी करताना किमान तीन महिन्यांतून एकदा १० दिवस स्वत:ला स्विच आॅफ करून कुटुंबासोबत निवांतपणा अनुभवण्याची सवय लावली तर पुढचे दिवस सुखकर जातील.
आक्रमकता वाढल्यास स्वत:च्या रागाचे निरीक्षण करा
आक्रमकता वाढली, प्रचंड राग आला की स्वत:सोबत इतरांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी राग आला की जागा सोडून दुसरीकडे जा. किमान दहा मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घ्या. स्वत:च्या रागाकडे शांतपणे बघा. निरीक्षण करा. राग का आला हे समजून घेतले तर हळूहळू नक्कीच सुधारणा घडेल.
क्लिनिकल हिप्नोथेरपी ट्रिटमेंट
कोणताही औषधोपचार न घेता केवळ चेतन आणि अचेतन मनाला आदेश देऊन तणाव, भीती, नैराश्य, ताणतणाव दूर करण्याची ही पद्धत आहे. यात संगीत,  ऱ्हिदम  आणि आवाजाच्या पातळीचा वापर करून रुग्णावर उपचार केले जातात. रोज केवळ एक तास असे किमान आठवडाभर केलेल्या उपचारातूनही सकारात्मक परिणाम घडल्याची उदाहरणे आहेत.

काही टिप्स
* स्वत:ला कामात व्यस्त ठेवा
* कामाच्या ठिकाणी व्यक्तिगत मैत्री जोपासा.
* कामावरून परतल्यावर स्वत:ला विसरून मुलांना आणि कुटुंबाला वेळ द्या.
* स्वत:च्या स्वत:कडून अपेक्षा मर्यादित ठेवा.
* परिस्थितीचा स्वीकार करा.
* सॉल्टबाथचा प्रयोग आठवड्यातून किमान एकदा करा.

Web Title: Tackling Stress in Your Own: Ramakant Gadivan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.