कुठली 'पॅथी' लय भारी

By admin | Published: November 1, 2014 07:03 PM2014-11-01T19:03:13+5:302014-11-01T19:03:13+5:30

कोणती औषधोपचार पद्धती चांगली हा वाद बराच जुना आहे. आधुनिक उपचारपद्धतीच्या लोकप्रियतेमुळे त्याला आता चांगलेच धुमारे फुटले आहेत. पण असा वाद घालण्याचे खरेच काही कारण आहे का? यातून सुवर्णमध्य निघाला तर!

Which 'cache' rhythm is heavy | कुठली 'पॅथी' लय भारी

कुठली 'पॅथी' लय भारी

Next

 डॉ. पद्माकर पंडित

 
हा लेख मी केवळ औषधशास्त्रज्ञ म्हणून लिहिलेला नाही. एखाद्या सामान्य माणसाचा दृष्टिकोनही त्यात प्रतीत व्हावा, असे वाटते. अर्थात, आधुनिक औषधशास्त्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक असल्याने त्या अंगानेही काही मुद्यांचा ऊहापोह होईल. पण, मध्यवर्ती संकल्पना आहे, रुग्णाच्या भूमिकेतून विचार. तर्कशुद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने विचार करत गेलो, तर आपल्याला विभिन्न उपचारपद्धतींची (पॅथीज्) रास्त तुलना करता येईल. निष्कर्षही काढता येईल. या प्रश्नाचा परार्मष घेताना अशाप्रकारे आपण विवेचन करू, की कोणाही वाचकाला त्यातून स्वत:चा निष्कर्ष काढता येईल. अगदी माझ्याशी असहमतही होता येईल.
व्यक्ती प्रत्येक वेळी आजारी पडते, तेव्हा डॉक्टरकडे जातेच असे नाही. कारण काही आजार किरकोळ, नेहमीचे, र्मयादित स्वरूपाचे असतात. रुग्णाला त्यांचा पूर्वानुभव असतो. त्याला नसेल, तर त्याच्या आप्तेष्टांपैकी कुणाला तरी असतो. हे प्रकरण डॉक्टर वाचून, स्वत:च काहीतरी उपचार करून बरे होणारे आहे, हे त्यांना कळते. प्रत्येक वेळी हा निर्णय अचूक ठरेलच असे नसते. रुग्णाला किरकोळ वाटणारा त्रास नंतर गंभीर आजारामुळे आहे, असेही निष्पन्न होऊ शकते. पण, प्रत्येक वेळी माणसे डॉक्टरांकडे जात नाहीत, हे खरे आहे. मात्र, बहुतांश वेळा आजारी व्यक्ती कधी सोयीनुसार, तर कधी नाइलाजाने डॉक्टरकडे जाते. कुणाला तब्येत दाखवायची याचा निर्णय केवळ तज्ज्ञाच्या ‘पॅथी’वरच अवलंबून असतो, असे नाही. कुणी जवळचा, कुणी ओळखीचा, कुणी स्वस्तातला (उदा. सरकारी दवाखाना) तर कुणी विशिष्ट विषयाचा तज्ज्ञ निवडतात. या निर्णयावर रुग्णाच्या पूर्वानुभवाचा, तसेच ज्यांचे तो ऐकतो अशा आप्तेष्ट सल्लागारांच्या मतांचा खूप प्रभाव असतो. काहींना प्रसिद्ध, तर काहींना खूप गर्दी असणारे अगदी खर्चिकसुद्धा तज्ज्ञ, दवाखाने वा रुग्णालये आवडतात. पहिल्या डॉक्टरांकडून समाधान झाले नाही, वा त्यांनीच सुचवले, तरच रुग्ण दुसर्‍या तज्ज्ञाकडे जातो. मग पहिला प्रश्न असा, की किती ‘अँलो’पॅथीचे डॉक्टर रुग्णांना होमिओपथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी वा अँक्युपंक्चर इ. पर्यायी ‘पॅथी’कडे पाठवतात? की याच पॅथीज्कडून रुग्ण आधुनिक तज्ज्ञांकडे पाठवले जातात? अर्थात, काही रुग्ण आधुनिक उपचारांनी समाधान न झाल्यामुळे पर्यायी उपचारांकडे वळतातही. याचे कारण काय?
अभ्यास केला असता असे दिसून येते, की पर्यायी उपचारांची निवड जे रुग्ण करतात. त्यांचे आजार बर्‍या न होणार्‍या स्वरूपाचे असतात. एकतर ते सतत आजारी असतात किंवा आजार जात-येत असतो. कोणत्याही रुग्णाला आपला आजार असाध्य आहे, हे सहज पचनी पडत नाही. त्याला पूर्ण बरे व्हायचे असते आणि पर्यायी उपचारांनी ते होईल, अशी त्याला आशा वाटते. मात्र, अनेकदा ही आशा फोल ठरते आणि रुग्ण विविध पॅथींच्या तज्ज्ञांकडे जात राहतो. आधुनिक वैद्यक जरी शास्त्रीय संशोधनाने संपन्न होत असले, आणि ‘पुराव्यावर आधारित’ (इव्हिडन्स बेस्ड) असले, तरी त्यात काही त्रुटी आहेतच. मानवी तन-मन व त्यातील व्याधी-विकारांचे संपूर्ण आकलन अद्याप झाले नाही. अशा उपचार-पोकळीच्या अवकाशात पर्यायी पॅथींना स्थान मिळणे साहजिकच आहे. पण त्याचे कारण मानवी वृत्तीएवढेच या पर्यायी उपचारांची उपलब्धतादेखील आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे, की जगातल्या कितीतरी देशात, विशेषत: विकसित राष्ट्रात या पर्यायी पॅथींचे वा त्यातील शिक्षणाचे भारतात आहे, तेवढे प्रस्थ नाही.
थोडक्यात, आपण जर शंभर लोकांना प्रश्न विचारला, की आजारी पडल्यावर आपण कुठल्या ‘पॅथी’च्या डॉक्टरकडे जाता, तर त्यातील अधिकाधिक टक्के लोक ‘आधुनिक वैद्यक’ अर्थात ‘अँलोपॅथी’ हेच उत्तर देतील.  या ‘अँलोपॅथी’ शब्दाबद्दल थोडा खुलासा करणे आवश्यक वाटते. पाश्‍चात्य संशोधकांनी जेव्हा आधुनिक वैद्यकाचा (मॉडर्न मेडिसिन) पाया भरला. तेव्हा तत्कालीन प्रचलित उपचारपद्धतींनी त्याला विरोध केला. हे काहीतरी चुकीचे सांगतायेत, असा आरोप त्यांच्यावर झाला. अँलो म्हणजे चुकीची आणि पॅथी म्हणजे उपचार पद्धती. म्हणून त्या वेळेपासून ‘अँलोपॅथी’ हा चुकीचा शब्द रूढ झाला आहे. आता खरे तर तो वापरायलाच नको. पण तरीही तो वापरला जातो. ही उपचारपद्धती शास्त्रीय पायावर उभी आहे. सतत संशोधन चालू आहे. नवनवे प्रयोग होत असतात. त्यातून अधिकाधिक प्रभावी औषधे, अचूक चाचण्या इ. ची निर्मिती होत असते. पर्यायी पद्धतीत संशोधन व नवनिर्मितीची वानवा नाही, पण आधुनिक वैद्यकाच्या तुलनेत ते क्षुल्लक आहे. मग प्रश्न असा पडतो, की काय अधिक चांगले? काळाच्या कसोटीवर काय टिकेल? जे पुराव्याने सिद्ध होत वैज्ञानिक आधारावर विकसित होत आहे ते की पर्यायी?
या लेखाचा उद्देश पर्यायी पद्धतींवर टीका करण्याचा नाही. ही वस्तुस्थितीच आहे, की पर्यायी उपचारांचा वापर काही लोक करतात. त्याचा त्यांना फायदाही होत असतो. पण, किती जणांना? म्हणजे वापर करणारे कमी आणि फायदा होणारे याहून कमी. वापर करणारे कमी यात मी रुग्णांसोबत पर्यायी डॉक्टर मंडळींचाही समावेश करतो आहे. कारण आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर शाखेच्या पदव्या घेतलेले बहुसंख्य डॉक्टर प्रत्यक्ष व्यवसायात आधुनिक वैद्यकाचाच वापर जास्त करतात. याचे कारण त्या उपचारपद्धतीचा प्रभाव व सुरक्षितता निर्विवाद आहे. काही आजारांचे निदान वा शमन/ दमन करण्यास आधुनिक पद्धतीही तोकडी ठरते. मात्र, तरीही त्याचा जगभर अब्जावधी रुग्णांना अपरिमित फायदा होतोय, यात शंका नाही. लसीकरण व प्रतिजैविकांसारख्या महत्त्वाच्या शोधांनी संसर्गरोग आटोक्यात आणले आहेत. अर्थात, नवनवे आजार उद्भवतात तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी संशोधक पुढे सरसावतात. मानवी आरोग्यातील हा लढा निरंतर चालूच राहणार आहे. आणि त्यात विविध उपचार पद्धतींचा उत्तम समन्वय झाला, तर अधिक चांगले. पर्यायी उपचारांकडे वळणार्‍या काहींच्या मनात आधुनिक उपचारांबद्दल एक भीती असते. शाळेतही लहानपणी आम्ही लस टोचणारी मंडळी आली, की घाबरून पळून जात असू. अनेकांना आधुनिक औषधांच्या अनुषंगिक (साईड) वा दु: (अँडव्हर्स) परिणामांबद्दल अकारण भय असते. दुसरीकडे इतर सर्व उपचारपद्धती त्यांच्यामुळे कुठलाही त्रास होत नसल्याचा दावा करीत असतात. औषधाची सुरक्षितता तर महत्त्वाची, पण त्याहूनही प्रभाव महत्त्वाचा. औषधशास्त्र असे मानते, की कोणत्याही प्रभावी औषधाचा काहीतरी इतर परिणामही असणारच. इथे हे लक्षात घेतले पाहिजे, की आधुनिक औषधांचा जास्त त्रास क्वचितच होतो. रास्त पद्धतीने औषधे वापरली गेली, तर त्यांचा धोका अगदी कमी होतो. मात्र, खेदाने असे म्हणावे लागते, की औषधशास्त्राची मूलतत्त्वे न पाळल्याने, तसेच औषधांबद्दलच्या सखोल ज्ञानाच्या अभावाने औषधे वापरली जातात. रुग्णांकडूनच नव्हे, तर डॉक्टरांकडूनही ज्या आधुनिक वैद्यकांना असे वाटते, की आपल्या ‘पॅथी’बद्दल लोकांचा वरील गैरसमज असू नये, त्यांनी औषधे वापरताना सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक आहे.
आधुनिक उपचारपद्धती व पर्यायी पद्धतीत हा एक मोठा फरक आहे. जे उपयुक्त आहे, प्रभावशाली आहे, ते त्रासदायकही असू शकते. म्हणून प्रभावी औषधे काही वेळा नको असलेले परिणामही उत्पन्न करतात. त्यांची जाण असणे, त्यांना प्रतिबंध करणे, त्यांचे शक्य तेवढय़ा लवकर निदान करणे व त्यावर उपचार करणे या सर्व बाबतीत प्रत्येक डॉक्टरला पर्याप्त ज्ञान असणे आवश्यक आहे. तसे ते असतेच असे नाही. कोणत्याही पॅथीच्या दोन-चार डॉक्टर्सकडे त्यांना कळू न देता एकच रुग्ण जाऊ देत. बघा त्यांच्या निदानात व उपचारात किती फरक पडतो ते! एका रुग्णाचा रक्तनमुना दोन-तीन प्रयोगशाळात पाठवा, पाहा चाचणीचे निष्कर्ष सारखेच येतात का? ही अचूकता जसजशी वाढत जाईल, तफावत जसजशी कमी होत जाईल तसतशी उपचारपद्धती विकसित होत जातील. सध्यातरी पर्यायी उपचाराच्या तुलनेत अशी वस्तुनिष्ठता आधुनिक वैद्यकात जास्त आढळते. त्यातील काही त्याच वेळी त्याच किंवा इतर आजारासाठी पर्यायी उपचार घेत असतात वा घेऊ इच्छितात. ती शंका ते आम्हाला विचारतातही, की तुमच्या औषधांसोबत हे इतर उपचारही घेतले, तर चालतील ना? या प्रश्नाला माझे उत्तर असे असते, की त्या पर्यायी उपचारपद्धतींचे मला सखोल ज्ञान नाही. तेव्हा मी काय सांगणार? काही तज्ज्ञ थोडी मवाळ भूमिका घेत म्हणतात, की एकत्रित उपचारांचा काही त्रास होत नसेल, तर घ्यायला हरकत नाही. काही जण जहाल भूमिका घेत इतर सर्व औषधे व उपचार बंद करा म्हणतात. अशीच परिस्थिती पर्यायी उपचारतज्ज्ञांची असते. त्यांच्याकडे जाणारा रुग्ण जेव्हा त्यांना आधुनिक उपचार त्यांच्या उपचारांसोबत चालतील का? असे विचारतो, तेव्हा त्यांच्याकडेही अशीच उत्तरे असतात. याचे कारण असे आहे, की विविध पद्धतींच्या एकत्रित उपचारांवर फार कमी संशोधन झाले वा होत आहे आणि त्याचे कारण असे, की फार कमी तज्ज्ञांना एकाहून अधिक पॅथींचे सखोल ज्ञान असते, कारण त्यांची शिक्षणप्रक्रिया, अभ्यासक्रमच भिन्न असतो. अर्थात, हे आधुनिक तज्ज्ञांबद्दल जास्त खरे आहे. काही व्याख्यांच्या पलीकडे त्यांना पर्यायी उपचारांबद्दल माहिती नसते. कदाचित अनेकांना तशी गरजही भासत नाही. माझ्या ६0 वर्षांच्या आयुष्यात मला फक्त एकेकदाच आयुर्वेद व होमिओपॅथीकडे जावे लागले. आयुर्वेद महाविद्यालयात तिथल्या शिक्षकांकडे गेलो ते माझ्या एम. डी.च्या संशोधन प्रकल्पासंदर्भात. कारण त्या वेळी मी काली कुटकीच्या (एक आयुर्वेदिक वनस्पती) दम्यावरील प्रभावासंबंधी प्राण्यांवर प्रयोग करत होतो. 
होमिओपॅथी उपचार एकदा माझ्या स्वरयंत्रावर आलेल्या गाठींमुळे आवाज खूपच घोगरा झाला होता. तेव्हा घेतले. अर्थात, ज्यांनी होमिओपॅथीची औषधे दिली, ते आमचे ज्येष्ठ स्नेही एमबीबीएसच होते. मात्र, ते प्रॅक्टीस होमिओपॅथीची करीत. त्या औषधांनी त्रास कमी झाला, पण नंतर पुन्हा सुरू झाला. मग असे लक्षात आले, की जठरातील आम्ल उलटे वर येऊन घशात गेल्याने तो त्रास असावा. आम्लवृद्धी आधुनिक औषधांनी आटोक्यात आल्यावर तो त्रास पूर्णपणे गेला. 
बहुसंख्य रुग्ण त्यांचे उपचारविषयक निर्णय स्वानुभवावर घेतात. सर्व उपचारपद्धतींचा रुग्णाच्या फायद्यासाठी पर्याप्त समन्वय साधावयाचा असेल, तर यासाठी अभ्यासक्रमात मूलभूत बदल करावे लागतील. आज जे चित्र दिसते ते असे आहे, की डॉक्टर व्हायचे म्हणून ज्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळत नाही, अथवा घेणे परवडत नाही, असे अनेक विद्यार्थी पर्यायी वैद्यक अभ्यासक्रमांकना प्रवेश घेतात.
शिक्षणाच्या प्रारंभीच त्यांना समजते, की वैद्यक व्यवसायासाठी आधुनिक वैद्यकाचाच अभ्यास आवश्यक आहे. मग ते विद्यार्थी अगदी पदवी प्राप्त झाल्यानंतरही जमेल तसे आधुनिक वैद्यक शिकत राहातात. आधुनिक औषधशास्त्रासाठी शिकवण्या लावतात, आधुनिक तज्ज्ञांकडे काम करतात. 
 इतर उपचारपद्धतींचे स्वतंत्र अस्तित्व र्मयादित स्वरुपाचे आहे. त्यांचे अभ्यासक्रम ठरवतानाही आधुनिक वैद्यकाची नक्कल केल्याचे दिसून येते. अभ्यासक्रमाचा कालावधी, त्याचे भाग, त्यातील शिकवायचे विषयही तसेच असतात. बहुसंख्य विद्यार्थी आधुनिक वैद्यकाचीच पुस्तके वापरीत असतात. थोडक्यात इतर उपचारपद्धतींचे फार कमी तज्ज्ञ फक्त त्याच औषधांचा, उपचारांचा वापर करताना दिसतात. एक प्रकारे हा आधुनिक वैद्यक व्यवसायात मागील दाराने प्रवेश ठरतो. 
अर्थात, आपल्या देशात लोकसंख्या व रोगराईचे प्रमाण लक्षात घेता ही व्यवस्था काही प्रमाणात जनतेच्या फायद्याचीच आहे. कारण त्यामुळे बरेच डॉक्टर्स उपलब्ध होतात. विशेषत: ग्रामीण भागात व शहरातील गरीब वस्त्यांतून असे डॉक्टर्स रुग्णांना सेवा पुरवतात. शैक्षणिक पद्धतीत, अभ्यासक्रमात काही बदल झाले, तर अधिक तज्ज्ञ फक्त आपापल्याच उपचारपद्धतीचा अवलंब आपल्या रुग्णांसाठी करु शकतील.
आणखी दोन मुद्यांना स्पर्श करणे आवश्यक आहे. रुग्णाला जर एकाच वेळी त्याच किंवा दुसर्‍या आजारासाठी संमिश्र अथवा एकत्रित उपचार हवे असतील, तर त्यासाठी एकाच तज्ञाला त्या सर्व पॅथींचे ज्ञान असायला हवे. तशी व्यवस्था आजच्या शिक्षणात नाही. तुम्ही एका वेळी एकच पॅथी अधिकृतरित्या शिकू शकता वा त्याची प्रॅक्टिस करु शकता. यासाठी मी एक कल्पना मांडतो आहे. त्यावर जरूर विचारमंथन व्हावे. आधुनिक वैद्यकाच्या पदवीनंतर (एमबीबीएस) जर विद्यार्थ्यांना पर्यायी उपचारपद्धतीत आवड व उपलब्धतेप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण घेता आले तर? त्यांचा पाया वैज्ञानिक असेल व त्याच्याशी पर्यायी उपचारांची सांगड ते घालू शकतील. टप्प्याटप्प्याने पर्यायी महाविद्यालयांचे आधुनिक वैद्यकात रुपांतर करता येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र त्याच पॅथीचा असेल. आणि तो अभ्यास एमबीबीएस झालेले विद्यार्थी करतील. ही एक ढोबळ कल्पना आहे. जरुरीपुरतेच पर्यायी वैद्यक तयार होतील आणि कुणालाही बेकायदेशीरपणे इतर पॅथीच्या उपचारांचा वापर करावा लागणार नाही.
दुसरा मुद्दा आग्रही भूमिका सोडण्याचा आहे.  चांगला डॉक्टर मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार 
असला पाहिजे. रुग्णांना दज्रेदार सेवा देणे आपले कर्तव्यच आहे, पॅथी कुठलीही असो, अशा विचाराने जर वैद्यक व्यवसाय सतत प्रेरित राहिला, तर ते समाजाचे भाग्य. त्यासाठी आपापल्या पॅथीचा दुराग्रह सोडून जिथे आवश्यक तिथे पर्यायी उपचार स्वीकारायला हरकत नाही. मात्र, ते संशोधनाने, पुराव्याने सिद्ध झालेले असावेत.
(लेखक बी. जे. महाविद्यालयात
औषधशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
 

Web Title: Which 'cache' rhythm is heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.