'साधुटार' आणि म्हातारबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:31 PM2018-05-28T15:31:32+5:302018-05-28T15:31:32+5:30

दहा हजार फुटांवरची ती रात्र. मिट्ट काळोख. पहाटेचे ३ वाजलेले. तडतडणारे पावसाचे थेंब आणि हाडांपर्यंत बोचणारी थंडी. अचानक हाताला ओलसर लागलं. खाड्कन जाग आली. क्षणार्धात परिस्थितीचं भान काळजीचं सावट घेऊन आलं..

sikkim to ladakh 12 thousand kilometers journey | 'साधुटार' आणि म्हातारबा

'साधुटार' आणि म्हातारबा

Next

- वसंत वसंत लिमये (vasantlimaye@gmail.com)

झोपेत उशाशी घेतलेल्या हाताला ओलसर लागल्यानं मला अचानक जाग आली. मी मिट्ट काळोखात स्लीपिंग बॅग दूर सारून उठून बसलो. तडतडणारे पावसाचे थेंब, हाडांपर्यंत बोचणारी थंडी आणि भिजलेली स्लीपिंग बॅगची कड. मला काहीच सुधरत नव्हतं. पहाटेचे ३ वाजलेले. खाड्कन माझ्या लक्षात आलं, आम्ही होतो, नेपाळातील ‘साधुटार’ या ठिकाणी. उंची ९,९८० फूट. क्षणार्धात परिस्थितीचं भान काळजीचं सावट घेऊन आलं..
कालच ‘हिमयात्रे’चा पहिला आठवडा संपून दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली होती. परवाच निर्मल खरे आणि अजित याने की बाबा देसवंडीकर मोठ्या उत्साहात आम्हाला मनेभंजांग येथे भेटले होते. आम्ही सारेच सातजण टुम्लिंग येथे गेलो होतो. टुम्लिंगहून सिंगलिला धारेवरून उतरणारा बारा किलोमीटरचा खतरनाक रस्ता अमितच्या ड्रायव्हिंग कौशल्याची परीक्षा पाहणारा होता. जणू ही पुढच्या प्रवासाची पूर्वतयारी होती. आधीची टीम बागडोगरामार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाली होती. आम्ही नवे गडी पशुपतिनगर येथे सिक्कीम-नेपाळ सीमा पार करून, चार-पाच तासात ९३ किमी मजल मारून ‘साधुटार’ या ठिकाणी पोहचलो होतो.
आदल्या आठवड्यात पावसाळी हवामानामुळे आम्ही ‘कॅम्पिंग’ केलं नव्हतं. इलाम येथे दुपारी जेवताना आम्हाला ‘साधुटार’चा पत्ता लागला होता. ‘टार’ म्हणजे गवताळ मैदान. ताप्लेजुंगला जाणारा हमरस्ता सोडून, तीन किमी अवघड मातीचा कच्चा रस्ता घेऊन आम्ही ‘साधुटार’ला दुपारी साडेचारला पोहचलो. विस्तीर्ण पसरलेल्या हिरव्यागार पाचूच्या कोंदणात बसवलेला नीलमणी भासावा असा स्वच्छ जलाशय नितांत सुंदर होता. आम्ही त्या जागेच्या प्रेमातच पडलो. आकाशात ढग होते; पण घाबरवणारे नव्हते. तिथेच एक हॉटेलवजा आठ बाय वीस फुटाची झाप माझ्यातल्या गिर्यारोहकानं लगेच हेरली होती.
नव्या आठवड्यातील पहिलीच संध्याकाळ. ‘कॅम्पिंग’ करण्याचा निर्णय घेतला. सारेच उत्साहात कामाला लागले. आम्ही स्वयंपाकाच्या तयारीस लागलो. डोंगर भटक्यांना स्वयंपाक येणं गरजेचं असतं. माझ्या गंजलेल्या कौशल्याला उजाळा मिळाला. पास्ताचा इटालियन बेत ठरला. मस्त चहा झाला, वाफाळते कप हातात, उत्तरेकडे हिमाच्छादित शिखरं दूरवर ढगांच्या पडद्याशी आट्यापाट्या खेळत होती, समोर साधुटारच्या जलाशयाच्या लाटा वाºयाशी खेळत होत्या. वातावरण स्वर्गीय होतं, मनात म्हटलं ‘और क्या भगवानसे मिलोगे?’.
साडेपाचच्या सुमारास अंधारून आलं. तलम ढग उतरून आला. त्या स्वप्नवत वातावरणात पास्ताचा आस्वाद घेत जेवणं झाली आणि आठच्या सुमारास आम्ही तंबूत झोपायला गेलो. डोंगरात, विशेषत: हिमालयात दिवस लवकर संपतो आणि गावागावात देखील आठपर्यंत सामसूम होते. मला लगेच झोप लागली, नंतर माझ्या तंबूतील अमित म्हणाला की, साडेनऊला हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर संततधार लागली असावी. पहाटे ३ला मला जाग आल्यावर, टॉर्चच्या उजेडात तंबूत पाणी झिरपत असल्याचं लक्षात आलं. आमचे तंबू ‘रेन सेफ’ आहेत; पण अशा पावसात त्यांचा टिकाव लागणं अवघड. परिस्थिती बिकट होती. मला शेजारच्या तंबूतही हालचाल जाणवली. ‘सारं सामान तंबूच्यामध्ये ठेवा आणि आपण शेजारच्या झापात हलूया!’ मी आणि अमित पटकन आवरून झापात शिरलो. दहाच मिन्टात निर्मलही झापात आला; पण बाबा कोरडा असल्यानं डाराडूर होता. थंडी मी म्हणत होती. कागदाचे बोळे आणि काटक्या यांच्या मदतीनं शेकोटी झट्कन चेतली. आम्ही सारेच डोंगरी असल्यानं हे सवयीचं होतं. लाल पिवळ्या निळ्या ज्वाळांनी उसळी घेतली. हळूहळू गार पडलेल्या हातापायांना ऊब जाणवू लागली. खरंच सूर्यानंतर, अग्नी हे आपल्याला मिळालेलं फार महत्त्वाचं वरदान आहे हे अशा वेळेस प्रकर्षानं जाणवतं. पाऊस असाच राहिला तर आपण इथेच अडकू, दिवस फुकट जाईल, उघडीप मिळाली तरी इतक्या पावसानंतर कच्च्या रस्त्यावर गाडीचं काय होईल, अशा प्रश्नांची भुतं मला सतावत होती. या साºयांच शक्यतातील धोके मला भेडसावत होते.
कालचा स्वर्गीय आसमंत या वेगळ्याच हवामानामुळे आता भेडसावत होता. अनेक वर्षांपूर्वी, १९७९ साली गढवालमधील ‘जोगीन’ मोहिमेवर असताना आम्ही सात दिवस हिमवादळात अडकलो होतो. आठव्या दिवशी उघडीप मिळाली. कॅम्प तीनहून घाईघाईत आमचे आठ सदस्य खाली येण्यास निघाले. तंबू आवरताना, तंबूच्या गोठलेल्या दोºया कापून तंबू पॅक करून ते निघाले. भुसभुशीत हिमामुळे त्यांना खालचा कॅम्प गाठता आला नाही आणि ती रात्र त्यांना बाहेरच काढावी लागली. दोºया कापल्यामुळे तंबूही धड लावता आला नाही. त्या भीषण रात्रीमुळे तिघांना चांगलाच ‘हिमदंश’ (फ्रोस्ट बाइट) झाला. ती आठवणही अंगावर काटा आणणारी होती. अर्थात ‘साधुटार’ला परिस्थिती एवढी गंभीर नव्हती; पण हिमालयात साध्या सोप्या गोष्टी अचानक वेगळंच रूप धारण करतात हे खरं! लहरी निसर्गानं आम्हाला एक झटका दिला होता. ११ वाजता पाऊस थांबला, पंधराच मिन्टात स्वच्छ ऊन पडलं आणि ‘साधुटार’ हसू लागलं.
‘त्या ‘ओल्या’ रात्रीनंतर, सोमवारी आम्ही ‘कांचनजंगा शिखराच्या पायथ्याशी असलेल्या ताप्लेजुंगच्या वाटेवर थर्पू येथे छोट्या हॉटेलात ‘कोरडा’ मुक्काम केला. मंगळवारी आमचा बेत होता तामाफोक मार्गे फाप्लू येथे जाण्याचा. गूगलवरील नकाशाच्या भरोशावर आणि स्थानिक माहितीनुसार आम्ही मँगलुंग येथे निघालो. खडतर कच्च्या रस्त्यावरून चार तास प्रवास करून आम्ही एका खोल दरीत उतरलो तर आणखी एक संकट दत्त म्हणून आमच्या समोर ठाकलं. रविवारच्या पावसामुळे गोया खोला येथील पुलाजवळचा रस्ता पूर्ण खचला होता. परत फिरण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पुनश्च तोच खडतर चढा प्रवास करून आम्ही इलामचा रस्ता धरला. एव्हाना आमचे दोन दिवस वाया गेले होते आणि आम्ही पश्चिमेकडे फारसे सरकलो नव्हतो. आधीचा प्लॅन बदलून आम्ही दक्षिणेकडील समतल प्रदेशातील हायवे पकडून इटहरीमार्गे फाप्लू येथे पोहचलो. इथे विमानतळ आहे. ‘मकालू’सारख्या मातब्बर शिखराकडे जाणाºया मोहिमा इथून निघतात. ढगाळ हवामानाने आमचा पाठलाग सुरूच ठेवला. ‘मकालू’चं पुसट दर्शन झालं. हिमाच्छादित शिखरं आमच्यावर रुसली असली तरी नेपाळचं जवळून घडणारं दर्शन सुखावणारं होतं.
नेपाळ तसा गरीब देश. थोडी शेती; पण अर्थव्यवस्थेची बहुतांश मदार पर्यटन व्यवसायावर. २००२ नंतरच्या राजकीय स्थित्यंतरानंतर देश अजूनही सावरतो आहे. एकीकडे मॉडर्न ‘छानछोकी’चं आक्र मण, तर दुसरीकडे मूलभूत सुविधांचा अभाव असा विरोधाभास आढळतो. शहरी बाजारूपणापासून दूर छोट्या गावांमध्ये आजही प्रेमळ आदरातिथ्य आढळतं. दोन-चार हायवे सोडता बाकी रस्ते दुर्लक्षित, त्यामुळे ठरावीक पर्यटन स्थळांवर चिक्कार गर्दी आणि बकालपणाचं राज्य. नेपाळचा हिमालय भव्य आहे. गर्द जंगलांनी नटलेले उतार, सुनकोशी, सोलू खोला अशा खळाळत्या नद्या, एकाच दृष्टिक्षेपात सात हजार फुटांची उंची अथवा खोली हे माझ्यासाठी अप्रूप होतं. ओळखीच्या गाढवाल, सिक्कीम हिमालयापेक्षा हा हिमालय वेगळा आहे.
या आठवड्यात वारंवार बेत बदलावे लागले, अनेक साहसांना सामोरं जावं लागलं; पण त्यात मजा आली. आपल्या आधुनिक शहरी मनाला सुनिश्चिततेचं आकर्षण असतं, नव्हे तो आपला आग्रह असतो. या यात्रेत बदलतं हवामान, बिकट रस्ते, नव्या जागा, नवी माणसं अशी अनिश्चितता हा स्थायिभाव होता. इथली माणसं या साºयाला रूळलेली असतात. त्यात आपल्याला साहस आढळतं. कितीही नियोजन केलं, खूप माहिती गोळा केली तरीही समोर येणाºया परिस्थितीचा मान राखणं महत्त्वाचं! हिमालय तुम्हाला नम्र करतो.
संध्याकाळ होत आली होती. गाडी संथ गतीनं सुनकोशी नदीच्या पुलाकडे निघाली होती. समोरून कष्टानं पावलं उचलत, काठी टेकत, खुरडत एक जख्ख म्हातारा दोन किलोमीटर मागे सोडलेल्या गावाकडे निघाला होता. सोबत गुरं, मेंढ्या कोणीच नव्हतं. हा कुठून येत असावा, असं आश्चर्य मनात उमटतं तोच थोड्याच अंतरावर, साकळत येणाºया काळोखात रस्त्याच्या कडेला रचलेल्या दगडांच्या छोट्या देवडीतील दिवा नजरेत ठसला. काळोख, थंडी वारा याची तमा न बाळगता हा म्हातारा हे नित्यनेमानं करत असणार. कुठलेही हिशोब नाहीत, कुठलीही अपेक्षा नाही अशी त्या म्हतारबाची श्रद्धा, सभोवार पसरलेला भव्य हिमालय, माझं सूक्ष्म अस्तित्व आणि संधिप्रकाश, मी अंतर्मुख झालो होतो!
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)
 

Web Title: sikkim to ladakh 12 thousand kilometers journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.