पराटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:06 AM2019-05-12T06:06:00+5:302019-05-12T06:10:02+5:30

महाराष्ट्रातल्या गावांचे घसे कोरडे पडलेत. इथली माणसं थेंब थेंब पाण्यासाठी आसुसलेली आहेत. माणसं दुष्काळाशी लढतात, झगडतात,   जगण्यासाठी निमूटपणे जनावरांसह स्थलांतर करतात.  ओली बाळंतीण लेकराला पाजत ट्रॅक्टरवर बसून  निमूटपणे दुसर्‍या गावाकडे निघते.  दुष्काळाचे वळ उमटलेलं शरीर आणि मन घेऊन जगणारी ही माणसं.. केवळ व्यवस्थेवर खापर फोडून शांत बसतात का?  ..अजिबात नाही !

Fighting with the drought.. | पराटी

पराटी

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळ आणि उन्हाच्या झळांनी बेजार झालेला ग्रामीण महाराष्ट्र पुन्हा एकदा रिचार्ज होताना..

- नम्रता भिंगार्डे

कडुनिंबाची सावली खूप गार असते, बाहेर कितीही उन्हाळा तापत असला तरी कडुनिंबाच्या झाडाखाली गार वाटतं. कडुनिंबावर कोणत्याही प्रकारचे किडे, रोग आक्र मण करत नाहीत. त्याच्या सावलीलाही फिरकत नाहीत. ‘पानी फाउण्डेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गावाखेड्यांतून फिरताना कडुनिंबासारख्याच निरोगी मनाच्या माणसांनी मला सावलीत घेतलं.
कोणी सोबत जेवायला बसवलं तर कोणी जात्यावरची ओवी ऐकवली. पाणी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आमच्या बोलण्यात यायचा. तुटपुंजा पाऊस, दुष्काळ, चारा नाही म्हणून घरातलं एकतरी जनावर विकावं लागलेली घरं, टॅँकरच्या पाण्यासाठी हंडे सावरत धावणारी बायका-पोरं.. माणसं.. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या विभागांमधली दुष्काळग्रस्त गावांची ही स्थिती पाहत असताना एक जाणीव मात्र प्रकर्षाने झाली. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी महाराष्ट्रातली माणसं ही पराटीसारखी चिवटपणे तगून राहतात.
पाणीटंचाईत निमूटपणे दिवसाचे कित्येक तास पाणी भरण्यात घालवतात. पाणी कमीत कमी वापरत दिवस ढकलत असतात. शेतात काही पिकलं नाही तर जगण्यासाठी निमूटपणे जनावरांसह स्थलांतर करतात. ऊसतोड कामगार म्हणून गेलेली ओली बाळंतीण लेकराला पाजत ट्रॅक्टरवर बसून निमूटपणे दुसर्‍या गावाकडे निघते. दुष्काळाचे वळ उमटलेलं शरीर आणि मन घेऊन जगणारी ही माणसं.. प्रशासन, कृषी अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, सरपंच यांना दोष देण्यात वेळ न घालवता स्वत:पुरता, कुटुंबापुरता विचार करून निर्णय घेतात आणि परिस्थितीशी लढत राहतात.
नेमेचि येतो दुष्काळ असं म्हणत यंदाही महाराष्ट्रातल्या माध्यमांनी दुष्काळामुळे पिचलेली, हतबल झालेली माणसं दाखवायला सुरुवात केली. कोरड्या विहिरी, भेगा पडलेल्या जमिनी, हवालदिल झालेले शेतकरी, टँकरवर पाण्यासाठी उडालेली झुंबड, सायकलींवरून हंडे घेऊन जाणारे सगळ्या वयोगटातले लोकं, चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी स्थलांतरित झालेले शेतकरी असा दुष्काळ स्पेशल स्टोरीजचा मारा वर्तमानपत्र, न्यूज चॅनल, सोशल मीडिया असा चहूबाजूंनी होतोय. 
पण ग्रामीण महाराष्ट्र दाखवला जातो तसाच दु:खी, निराश आणि वैफल्यग्रस्त आहे का? दुष्काळाच्या परिस्थितीवर गावांकडे काहीच उपाय नाही का? गावं, शेतकरी ही आपल्यासारखंच केवळ व्यवस्थेवर खापर फोडून शांत बसतात का? ..अजिबात नाही! 
मुळात दुष्काळ हा केवळ पाण्याचाच असतो असा सर्वसामान्य समज आहे. प्रत्यक्षात माती, शेती, पाणी या तिन्ही आघाड्यांवर झालेल्या दुर्लक्षातून आणि ओरबाडण्याच्या प्रवृत्तीतून दुष्काळ नावाचा रोग अक्राळविक्राळ पद्धतीने हातपाय पसरत चालला आहे.  गावागावांमध्ये असे अनेक एकांडे शिलेदार आहेत जे स्वत:च्या कुवतीप्रमाणे दुष्काळाच्या एकेका लक्षणाचा अभ्यास करून त्यावर इलाज शोधण्यासाठी धडपडत आहेत. एम.एस्सी. अँग्री केलेले अनेक तरुण-तरुणी, जुने जाणते शेतकरी, महाराष्ट्राच्या कृषी विभागातले संवेदनशील अधिकारी, जिल्हाधिकारी, सरपंच, अंगणवाडीसेविका, शाळकरी मुलं असे कोणी ना कोणी प्रत्येक गावात आहेत जे शांत बसलेले नाहीत. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलाय.
दुष्काळाशी एकाकी लढणार्‍या याच गावकर्‍यांना एकत्र आणून या लढाईला युद्धाचं स्वरूप देण्यासाठी पानी फाउण्डेशनने डावपेच आखले. जलसंधारणाचं विज्ञान तळागाळात पोहोचविणारं ट्रेनिंग आणि गावकर्‍यांनी मिळालेल्या ट्रेनिंगचा स्वत:च्या गावात कसा उपयोग केला हे तपासण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेची कसोटी!
शासकीय भाषेत अडकून पडलेलं जलसंधारणाचं ज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी पानी फाउण्डेशनने प्रत्येक पाणलोट उपचारांचे ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे व्हिडीओ बनवले आहेत. त्यामुळे यू-ट्यूबवर व्हिडीओ बघून एखादा पदार्थ शिजवावा त्याचपद्धतीने गावकरी हे व्हिडीओ पाहून स्वत: प्रयोग करू लागले आहेत. पानी फाउण्डेशनच्या चार दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये जलसंधारणाच्या विज्ञानाचे धडे गिरवत आणि माळरानावर प्रत्यक्ष काम करून प्रॅक्टिकली प्रत्येक गावकरी ‘पाणलोट विकास’ या सं™ोच्या जवळ जावा हा प्रयत्न पानी फाउण्डेशनच्या संपूर्ण टीमचा राहिलेला आहे.
ज्ञान ही गुरुकिल्ली आहे असं म्हणतात ते काही उगीच नाही. ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या जलसंधारणाच्या ज्ञानाच्या या किल्लीने माणसामाणसांतले, माणूस आणि निसर्गातले, माणूस आणि माती, पाणी यांच्यातले अनेक दरवाजे उघडले गेले आहेत. ज्याचा प्रत्यय 2016 पासून हळूहळू येत आहे.  कोणतं गाव पाणलोट विकासाची कामं गुणवत्तापूर्वक करतंय याची चढाओढ गावकर्‍यांमध्ये लागते आणि सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या 45 दिवसांत अक्षरश: गावंच्या गावं माळरानात काम करायला लोटतात. केवळ ऐकून किंवा वाचून नाही तर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर विश्वास बसतो. ग्रामीण महाराष्ट्रातली दुष्काळाची उदासीन स्थिती ढवळून काढत एक सळसळता उत्साह घेऊन गावकरी जोमानं कामाला लागतात. प्लॅनिंग करतात, टेक्नॉलॉजीचा वापर करतात, गावाचा गूगल मॅप बघून कुठे काय काम गरजेचं आहे हे ठरवतात आणि स्वत: ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी हातात कुदळ-फावडं घेतात. 
ही माणसं कोण आहेत?..
ना कोणी इंजिनिअर असतं, ना भूतज्ज्ञ.. ना कोणी कृषीची डिग्री घेतलेले, ना शेतीचे अभ्यासक.. 
‘मी हे काम करू शकते/शकतो’ हा आत्मविश्वास असलेले हे सगळे सर्वसामान्य शेतकरी, मजूर, अंगणवाडीसेविका, विद्यार्थी असे कोणत्याही गटांत मोडणारे आणि गावाचा एक जबाबदार सदस्य असलेले एकजुटीने कार्यरत होतात. 
मी स्वत: पानी फाउण्डेशनच्या चळवळीसोबत 2017 पासून जोडले गेले. पानी फाउण्डेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पाण्याविषयीच्या ह्युमन इंटरेस्ट व्हिडीओ स्टोरीज करणे आणि सोशल मीडियावरून महाराष्ट्रातील भूमिपुत्र आता स्वत: पुढाकार घेऊन दुष्काळाविरोधात शड्ड ठोकत असल्याची माहिती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे हे माझ्या कामाचं स्वरूप आहे. 
गेल्या वर्षभरात मी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील जवळपास 50 गावांना प्रत्यक्ष भेट दिली. सोशल मीडिया सांभाळत असल्याने वॉटरकप स्पर्धेत सहभागी होणार्‍या उर्वरित शेकडो गावांशी फोन, व्हॉट्सअँप, व्हिडीओज यांच्या माध्यमातून व्हच्र्युअली मी कनेक्टेड असते. स्टोरीज करण्याच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर भटकत असते. पायाला भिंगरी लावून कधी मुंबई ते अमरावती, कधी मुंबई ते नंदुरबार तर कधी मुंबई ते सांगली तर कधी मुंबई ते नांदेड असा चारी दिशांनी प्रवास करते आहे. दुष्काळ  आणि ऊन यांच्या झळांनी बेजार झालेला ग्रामीण महाराष्ट्र सूर्यास्तानंतरच्या गारव्यासोबत पुन्हा एकदा रिचार्ज होताना पाहिला. 
पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत स्थलांतरित झालेले मात्र निवृत्तीनंतर गावातच राहण्याचा निर्णय घेतलेले माण तालुक्यातल्या अनभुलेवाडी गावचे झुओलॉजीचे प्राध्यापक संपतराव इंगळे, अवघ्या 25व्या वर्षी गावाचा विश्वास जिंकून सरपंच झालेले प्रसाद बागल, दिवसा कॉलेजचे पेपर आटपून कुदळ फावडं घेऊन आपापल्या टू व्हीलरवर गावात पोहोचलेले आटपाडी तालुक्यातल्या बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे पन्नासेक प्राध्यापक, गावात जमिनीचा एकही तुकडा नावावर नसताना ग्रामसेविकेच्या मदतीने गावातल्या सर्वांची मनरेगासाठीची कागदपत्रं गोळा करणारा 28 वर्षांचा विश्वंभर ढवळे, पाणी या विषयाला शाळेतल्या निबंधापासून ते वक्तृत्व स्पर्धेत अग्रक्र म देणारी अमरावतीची रश्मी गडलिंग.. उदाहरणं सांगावीत तितकी कमी ! 
उन्हाने आणि दुष्काळाने शुष्क पडलेल्या महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये अशी ओलावा टिकून राहिलेली अनेक माणसं भेटली. पावसाने गावाकडे पाठ फिरवली तरीही अनेक धडपडे तरु ण/तरु णी गावात पाय घट्ट रोवून उभी आहेत. 
 ज्या ज्या गावांना जाते तिथे पाणी या विषयावरून गप्पांची सुरुवात होत होती; पण त्या गप्पा केवळ पाण्यापुरत्या कधीच र्मयादित राहिल्या नाहीत. गावं, पिकं, संस्कृती, जत्रा, शिक्षण, शहरं, भाषा, वासरं, ग्रामसभा, मनरेगा.. अशी विषयांची ही यादी वाढत जाईल.  रुपयाएवढं कुंकू लावलेली आजी, पांढर्‍या धोतर जोडीतले नाना, शाळेत जाणारी खोडकर मुलं, उच्चशिक्षण घेऊनही शेती करण्याचाच निश्चय करून गावात राहिलेली तरु ण मुलं.. सकारात्मक ऊर्जेने भरलेली आणि भारलेली, सुपाएवढय़ा काळजाची, हळव्या मनाची, हसर्‍या चेहर्‍यांची ही मी अनुभवलेली माणसं तुमच्यापर्यंत पोहोचावीत. तुम्हीही कडुनिंबाच्या गार सावलीचा अनुभव घ्यावा यासाठी हा लेखप्रपंच !
(लेखिका पानी फाऊंडेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर आहेत.)
namrata@paanifoundation.in

Web Title: Fighting with the drought..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.