नाटकवाल्यांच्या कविता..  उत्तरार्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 06:01 AM2019-06-09T06:01:00+5:302019-06-09T06:05:02+5:30

राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित या अस्सल नाटकवाल्यांच्या कवितांविषयी. 

Atul Pethe reveals the magic of Poems by Rajiv Naik, Ravindra Lakhe and Maya Pandit.. | नाटकवाल्यांच्या कविता..  उत्तरार्ध

नाटकवाल्यांच्या कविता..  उत्तरार्ध

Next
ठळक मुद्देराजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे ज्या काळाचे प्रतिनिधी आहेत, त्या काळाचे अत्यंत जबाबदार दर्शन त्यांच्या नुकत्याच  प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहांतून दिसते. 

- अतुल पेठे

चांगल्या नाटकात जगण्याची जी क्षणिक अद्भुतता दिसते, ती तर राजीव नाईक यांच्या कवितेत दिसतेच, पण त्यांच्या कवितेत नादमय भाषेचेही भान दिसते. त्याविषयी ते कसे व्यक्त होतात पाहा.
शब्दांचे अर्थ गळून पडतात
तेव्हा आवाज शिल्लक उरतात.
नाद वेगळे :
ते असतात अर्थाच्याही आधी
स्वयंभू, आपण आपलेच.
ते हुंकारात असतात, हुंदक्यात असतात, हंबरड्यात असतात
कर्कश्य, किरट्याकिनर्‍या किंकाळीत असतात
गंभीर, गीर्रेबाज गाजत असतात
चपळचंचल पावलांत असतात
कधी अलवार बोटांत असतात
अन् कधी कधी शप्पथ तर
एखाद्या डोळ्यातही असतात 
किंवा 
प्रत्येक ध्वनी म्हणजे वाचाच होय 
असं मानलं की नादानादातून ऐकू येऊ लागतात अर्थ.
.अशा कविता वाचताना कधी आपण अंतर्मुख होतो, बहिर्मुख बनतो तर कधी व्याकुळतो. या कविता इथल्या अवतालाशी आणि भवतालाशी ममत्वाने जोडलेल्या आहेत. विचार आणि भावना यांचा सुयोग्य मिलाफ असलेल्या या कविता वाचताना आयुष्याचा पट विस्तारतो. हा पट आयुष्याचे समग्र भान देतो. 
आता आपण रवींद्र दामोदर लाखे यांच्या ‘अवस्थांतराच्या कविता’ आणि ‘संपर्क क्षेत्नाच्या बाहेर’ या दोन काव्यसंग्रहाविषयी एकत्न बोलू. 
या कविता परकेपणाच्या, पोरकेपणाच्या, विसंवादाच्या, आत्मशोधाच्या, गुंत्याच्या, देहाच्या, मन बिघडण्याच्या, आपलेपणाच्या, नैराश्याच्या, उद्वेगाच्या, गर्तेच्या, स्खलनाच्या, भीतीच्या, अपुरेपणाच्या, अलिप्ततेच्या, जगण्या-मरण्याच्या, साशंकतेच्या,  एकुटवाणेपणाच्या आणि सूक्ष्मपणाच्या आहेत. या सार्‍या कवितांत व्यक्तीची प्राणांतिक वेदना आहे. ‘ठळक’ या कवितेत ही अवस्था अशी येते :
जग पुसट होत चाललंय  ह्या भयानं थरकाप होतोय माझा.
ह्या भयाची हेडलाइन होईल का  एखाद्या वर्तमानपत्नाची?
तर अशा आजूबाजूच्या पसरलेल्या भयावह भवतालात मी कोण? हा चिरंतन प्रश्न करणार्‍या लाखेंच्या या आत्मभानाच्या कविता लखलखीत आहेत. वानगीदाखल हा छोटे तुकडे पहा -
मी माझं घर  लॉक करून जातो.  परततो.
घराची बेल वाजवतो.  दार उघडण्याची वाट पहातो.
तेव्हा मी कुठे असतो?.
किंवा
माझ्या जागी  मी रहावे.
माझ्या जागी  मला जाग यावी.
किंवा
मी वल्हवतोय  नसलेलं पाणी
न पुढे सरकत  ना मागे.
रवींद्र लाखे हे जसा मी कोण, हा प्रश्न विचारतात तसेच अस्वस्थ होऊन काठावरच उभय का हे सभोवताल? असे घुसमटून टाकणारे प्रश्न उभे करतात. आजूबाजूचं लबाड, हिंसक आणि अनैतिक भ्रष्टाचारी जग त्यांना अस्वस्थ करते. नाट्यछटाकार दिवाकरांची आठवण यावी, अशी त्यांची नाट्य (छटा)कविता देव्हारा मुळातूनच वाचावी अशी आहे. देव देव्हारा शोधत हिंडतोय कुठं कुठं. प्रत्येक देव्हार्‍यात मांजरींनी ठाण मांडलंय. हे वास्तव वाचताना काटा आणते. अशाच ध्यान, र्शाद्ध या कविता नाट्यछटेच्या अंगाने जाणार्‍या आहेत. जगण्यातील विरोधाभास आणि षड्रिपूंचे दर्शन रूपकाद्वारे उभे करण्याचे सार्मथ्य त्यात आहे. रवींद्र लाखेंच्या अशा कविता वाचताना आपल्या आजूबाजूच्या चिकटलेल्या सृष्टीचं दर्शन होतं. आपल्याला न जाणवलेल्या असंख्य गोष्टी त्यांच्या कवितेत सहज शब्दरूप होऊन येतात.
आता मी माया पंडितांच्या तल्खलीचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. या तल्खलीत आत-बाहेर जळणारा सोलीव वेदनांचा कल्लोळ आहे, दु:खाचे गहिवर आहेत आणि शोकमग्न व्याकुळता आहे. या भव्य नाटकाची नायिका आहे बाई !
अशी तिन्हीसांजेची आलीस बाई  या कालिंदीच्या काठी
सार्‍याच येतात इथे  कुणाची गोष्ट मोठी तर कोणाची खोटी
आलीच आहेस तर ठेव उतरवून
आणवलेले चंद्रबळ, हृदयातले सारे सल
हरेक हाडातली चरचरती कळ
किंवा
उपेक्षेचे सल गाड समंजस ओळींमधून, समांतर हो.
मान झुकवून सामोरी जा दु:खाला, होऊन पारदर्शी संपूर्ण सोलीव.
पेरून घे अंगभर, अधीन हो दु:खाच्या.
अशा कवितांतून बाईच्या दु:खाच्या अनेक पातळीवरील उसवणार्‍या अनेक परींच्या वेदना आहेत. जे वाट्याला पडेल ते बाई गच्च पांघरूण बसते अशा पराकोटीच्या भावनेने टाके उसवून उघडे पडते तिच्या जगण्याचे विरूप सणंग असे कवितेतली बाई जगू पाहते. या बाईचे दु:ख गहिरे आहे. ही बाई गावातली जशी आहे तशी शहरातलीही आहे. ती कुठल्याही जातीपाती आणि धर्मातली आहे. या बाईचा लढा फक्त पुरुषाशी नाही तर एकूण जगण्याशीच आहे. या अस्वस्थतेतून ती बंड करत आहे. 
कोणता मुखवटा घालायचाय आहे मला?
कोणता घातलेला मी आवडेल त्यांना?
पर्यायांच्या कोणत्या पडद्यात लपावे
आणि कोणत्या फूटपट्टीने मोजावेत
कमतरतांचे अंगभूत व्यास? वर्तुळातल्या
कोणत्या बंद दारापुढे रहावे उभे
कोणत्या कडी-कोयंड्यांचा घ्यावा  उघडायला ध्यास?
किंवा
धमन्या मांस रक्तपेशी नसाशिरात पक्के
जात मारी बिन दोर्‍याचे बेमालूम टाके
संस्कृतींच्या चिरगुटांना जात मारी गाठी
गळ्याभवती फास टाकते वर्णाची मिजासी.
माया पंडित यांची ही कविता अतिशय उत्कट आहे. तल्खली म्हणजे होरपळून टाकणारा दाह आहे. त्याचे चटके आपल्याला बसत असताना आपल्याला बाई उमगली का हा प्रश्न छळतो आणि आपण एकुणातच  बाईमाणसावर घनघोर अन्याय केला आहे याची कबुली द्यावी लागते.
तर असे हे तीन नाटकवाले कवी आणि त्यांच्या अस्सल मराठीपणातून उगवलेल्या सशक्त कविता !                                          
कविताबिविता - मौज प्रकाशन, तल्खली - शब्द प्रकाशन
संपर्क क्षेत्नाच्या बाहेर,  अवस्थांतराच्या कविता -  कॉपर कॉइन प्रकाशन

atulpethe50@gmail.com
(लेखक प्रयोगशील रंगकर्मी आहेत.)

Web Title: Atul Pethe reveals the magic of Poems by Rajiv Naik, Ravindra Lakhe and Maya Pandit..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.