पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:24 AM2024-02-13T06:24:57+5:302024-02-13T06:25:47+5:30

आधी आमदारकी, मग पत्रावर हाताने ‘माजी’ लिहून काँग्रेस पक्षही सोडला, रविवारी दिवसभर काॅंग्रेस नेत्यांसाेबत बैठका, चर्चेनंतर ‘उद्या सकाळी ११ वाजता येतो’ असे सांगून गेले अन् सोमवारी सकाळी सव्वा अकराला थेट विधानभवनात...

What next? Tells in 48 hours...; Ashok Chavan left Congress, BJP Given special responsibility on Devendra Fadnavis | पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

मुंबई : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून ४८ तासांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असे चव्हाण यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असून १५ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत भाजप प्रवेश करतील, अशी दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे, आगे देखो होता है क्या’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील इतर आमदारही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चव्हाण टिळक भवन येथे वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर राज्यसभा निवडणूक रणनीतीबाबत चर्चा झाली, त्या बैठकीलाही हजेरी लावून त्यांनी रणनीती ठरवण्यात सहभाग घेतला. सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठकीसाठी पक्ष कार्यालयात येणार, असे सांगून ते गेले. मात्र, सोमवारी पक्ष कार्यालयाऐवजी ते सकाळी ११.१५ च्या सुमारास विधानभवनात गेले आणि आमदारकीचा राजीनामा दिला. तो राजीनामा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केला. त्यानंतर लगेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय पूर्णत: वैयक्तिक आहे. कुठल्याही आमदाराशी मी याबाबत चर्चादेखील केलेली नाही. अन्य कोण काय निर्णय घेणार हे मला माहिती नाही. मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. पक्षाने मला खूप काही दिले आणि मी देखील मनापासून अनेक वर्षे पक्षाची सेवा केली आहे. - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक
चव्हाण यांचा राजीनामा आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी सर्व आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर गुरुवारी देखील पुन्हा काँग्रेस आमदारांची बैठक होऊ शकते.

फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारी
अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्याच्या दृष्टीने भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे. सूत्रांनी सांगितले की, फडणवीस आणि चव्हाण यांच्यात दोन-तीन बैठका झाल्या. २०२२ मध्ये विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल व त्यानंतरचे सत्तांतर तसेच गेल्या वर्षी अजित पवार यांनी केलेले बंड यातही फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती.

काॅंग्रेस म्हणते, साेबत काेणी जाणार नाही 

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात आणि नसीम खान यांनी पक्षाच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. चव्हाणांसाेबत इतर काेणीही पक्ष साेडून जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाला सोडून जातील असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. त्यांनी पुढची रणनीती जाहीर केली नसली तरी त्यांची दिशा निश्चित आहे. भाजपकडून सातत्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. ते आज आमच्यासोबत देखील झाले आहे. - पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री

अशोक चव्हाण यांची कारकीर्द

  • सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. १९८६ ते १९८९ या काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्षपद. 
  • १९८७ साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना हरवत ते वयाच्या तिसाव्या वर्षी खासदार. मात्र १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव. 
  • १९९२ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य. १९९३ साली ते सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री बनले.
  • १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर गेल्यावर महसूलमंत्री झाले. २००४ मध्ये पुन्हा ते कॅबिनेट मंत्री. २००८ मुख्यमंत्री बनले. 
  • २००९ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री. २०१४ मोदी लाटेतही ते लोकसभेवर निवडून गेले. २०१९ च्या लोकसभेत पराभव. विधानसभेत विजय मिळवला.

 

घाईघाईत घेतली पीडब्ल्यूडीची एनओसी 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला ‘राम-राम’ म्हणताच त्यांनी रविभवन/नाग भवनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागणी केली. १२,३०० रुपयांची थकबाकी लगेच भरली. पीडब्ल्यूडीनेही घाईघाईने सोमवारी सायंकाळीच एनओसी जारी केली. साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी रविभवनची एनओसी आवश्यक असते. उमेदवारी अर्जासोबत त्यांना येथेही एनओसी द्यावी लागेल. राज्यसभा निवडणूक २७ फेब्रुवारी राेजी होऊ घातली आहे. 

 

Web Title: What next? Tells in 48 hours...; Ashok Chavan left Congress, BJP Given special responsibility on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.