गोंदियात साखर विकण्याचा डाव
By admin | Published: July 3, 2014 12:49 AM2014-07-03T00:49:43+5:302014-07-03T00:49:43+5:30
सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणात तळेगाव पोलिसांनी दोन्ही ट्रकच्या चालकासह तिघांना अटक केली आहे. तपासात दुसऱ्या ट्रकमध्ये नेलेली ६१० पोती साखरेची गोंदियात परस्पर विल्हेवाट
तिघांना अटक : ट्रक जळित प्रकरणात मोठ्या घबाडाची शक्यता
तळेगाव (श्या.) जि.वर्धा : सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणात तळेगाव पोलिसांनी दोन्ही ट्रकच्या चालकासह तिघांना अटक केली आहे. तपासात दुसऱ्या ट्रकमध्ये नेलेली ६१० पोती साखरेची गोंदियात परस्पर विल्हेवाट लागण्यात येणार होती. मात्र लवकरच या कटावरुन पडदा हटल्याने डाव फसला, ही नवी माहिती तपासात पुढे आल्याची माहिती आहे.
जसवंतसिंग प्रितमसिंग गौरवा (५०), गगणदीपसिंग जसवंतसिंग गौरवा (२२) व दुसऱ्या ट्रकचा चालक बलदीपसिंग रामजितसिंग राजपूत तिघेही रा. भिलाई (म.प्र.) अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री उशिरा तिघांविरुद्ध ३७९, २०१, ४०७ अधिक ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाबाबत तळेगाव (श्या.) चे ठाणेदार दिनेश झामरे हे तपासाच्या नावावर कमालीची गुप्तता बाळगून आहे. सदर प्रकरणाला तीन दिवस लोटले असतानाही या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास टाळत आहे. एकूणच सदर प्रकरण वाटते तितके सोपी नसून यामध्ये मोठे साखर व्यापारी गुंतलेले असावे, असा संशयही पोलीस सूत्राकडून वर्तविला जात आहे. मात्र पोलीस तपास कोणत्या दिशेने होतो, यावरही या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून असल्याची माहितीही पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
साखर घेऊन जाणारा सीजी ०७ एए ७६०० हा ट्रक जळला नसून जाळल्याबी बाब उघडकीस येताच तळेगाव पोलिसांनी शिताफिने चालक जसवंतसिंग याला बोलते केले. यानंतर या प्रकरणातील एकेका रहस्यावरुन पडदा हटणे सुरू झाले. ट्रकमधील ७०० पैकी ६१० पोती साखर सीजी ०७ टी ७६०० या दुसऱ्या ट्रकने गोंदियाकडे रवाना केल्याची बाब पुढे येताच नागपूर- भंडारा-गोंदिया मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील पारडी नाका ते मौदा मार्गावरील एका ढाबा परिसरातून सदर ट्रकला पकडण्यात यश आले. (वार्ताहर)