समीर २१ महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

By Admin | Published: June 20, 2017 01:10 AM2017-06-20T01:10:54+5:302017-06-20T01:10:54+5:30

पानसरे हत्याप्रकरण : कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सुटका, समर्थकांची गर्दी

Sameer out of jail after 21 months | समीर २१ महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

समीर २१ महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित, सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याची कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास कळंबा येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली.
सुमारे २१ महिने तो कारागृहाच्या भिंतीआड राहिला होता. पानसरे हत्याप्रकरणी समीरला विशेष तपास पथकाने (एसआयटी) दि. १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक केली होती. शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी त्याचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
समीरने सलग तीनवेळा जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, त्यामध्ये उच्च न्यायालयाने एकदा आणि जिल्हा सत्र न्यायालयाने दोनवेळा त्याचा अर्ज विविध कारणांस्तव
फेटाळला होता. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणीत दोन्हीही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी त्याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला होता; पण अपुऱ्या कागदपत्रांअभावी त्याची कारागृहातून मुक्तता करता आली नाही.
सोमवारी सकाळी समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी कृष्णात येडके व जगन्नाथ पाटील या दोघांच्या नावाने जामिनासंबंधीची कागदपत्रे न्यायाधीश बिले यांच्याकडे सादर केली.
त्यावेळी न्यायमूर्ती बिले यांनी दोघांही जामिनदारांना पुढे बोलावून त्यांची ओळख परेड घेतली. समीरला जामीन देताना घालून दिलेल्या अटी व शर्र्तींबाबत जामीनदारांना सूचना दिल्या. समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी त्याच्या सुटकेबाबत न्यायाधीश बिले यांना, थेट आपल्याकडेच ‘रिलीज आॅर्डर’ देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायमूर्र्तींनी कायदेशीर कागदपत्रांवर सह्यांची पूर्तता करून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ‘रिलीज आॅर्डर’ अ‍ॅड. पटवर्धन यांच्याकडे दिली.
दुपारी अडीचनंतर संबंधित समीरच्या जामिनावरील सुटकेची रिलीज आॅर्डर कळंबा कारागृहात पाठविण्यात आली. कारागृहाबाहेर असणाऱ्या पेटीत ही रिलीज आॅर्डर नियमांनुसार टाकण्यात आली. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कर्मचाऱ्याने पेटी उघडून संबंधित रिलीज आॅर्डर कारागृहात नेली.
त्यानंतर काही वेळांतच समीरचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अ‍ॅड. समीर पटवर्धन व अ‍ॅड. आनंद देशपांडे हे तिघे काही कार्यकर्त्यांसह कारागृहात गेले. तेथे कळंबा करागृह अधीक्षक शरद शेळके रितसर सर्व कागदपत्रांची छाननी केली. त्यानंतर तिघाही वकिलांना बाहेर जाण्यास सांगितले व त्यानंतर समीरची सुटका केली.
दोन जामीनदार
कृष्णात दत्तात्रय येडके (रा. वासुंबे ता. तासगांव, जि. सांगली) व जगन्नाथ धोंडिराम पाटील (रा. निमणीे नागांव, ता. तासगाव, जि. सांगली) या दोघांच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे जामीन समीर गायकवाडसाठी न्यायालयात अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी दिले.
समीरच्यावतीने न्यायालयात फक्त रेशनकार्ड सादर
समीरच्या जामिनासाठी त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी समीरचे रेशनकार्ड तसेच दोन जामिनदारांचे रेशनकार्ड व प्रतिज्ञापत्र सादर केले. तर समीरचे रेशनकार्ड व आधारकार्ड हे विशेष तपास पथकाने (एसआयटी) यापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
समीर सांगलीतच राहणार
समीरला न्यायालयीन व पोलीस कामाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात बंदी घातली आहे. तो ज्या ठिकाणी रहिवासी असेल तेथील पत्ता न्यायालयात देणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्याने वकिलांमार्फत ‘दक्षिण शिवाजीनगर, शनी मारुती मंदिर, शंभर फुटी, सांगली’ हा रहिवासी पत्ता दिला आहे.
कारागृहाबाहेर कार्यकर्ते, नागरिकांची गर्दी
समीरची सुटका होणार असल्याने कळंबा येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर समीरचे भाऊ संदीप व सचिन गायकवाड यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, विजय आरेकर, सुरेश यादव, सुधाकर सुतार, डॉ. मानसिंग शिंदे, बाळासाहेब निगवेकर, प्रीतम पवार, मोठ्या संख्येने जमा झाले होते तर त्याच्या सुटकेच्या उत्सुकतेपोटी कारागृहासमोरील रस्त्यावरही नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे या
मार्गावर वाहतूक खोळंबली होती तर समीर बाहेर आल्यानंतर त्याला तिन्हीही वकील व कार्यकर्त्यांनी सुरक्षा गराडा घालतच कारागृह आवाराच्या बाहेर आणून थेट मोटारीत (एमएच १० सीए ४६३१) बसविले. यावेळी त्या मोटारीत तीन वकिलांसह समीरचे दोघे भाऊही बसले होते. ते सर्वजण सांगलीच्या दिशेने निघून गेले.
‘देवाच्या कृपेने सुटलो’
सुमारे २१ महिन्यांच्या कारागृहातील वातावरणातून समीर सोमवारी हसतच कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आला. त्याने, ‘मी देवाच्या कृपेने सुटलो, आता वेगळे काही नाही, खूप सांगायचायं पण योग्य वेळ आली की सांगेन’ इतकेच त्याने पत्रकारांशी बोलताना
सांगितले.
हास्यमुद्रेत समीर बाहेर
गेली २१ महिने कारागृहाच्या भिंतीआड राहिलेला समीर हा सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या छोट्या प्रवेशद्वारातून हास्यमुद्रेत बाहेर आला. अंगात
भगवा शर्ट, फिकट काळ्या रंगाची
पँट असा पेहराव परिधान केलेला समीर.
हा हातात कापडांनी भरलेल्या दोन प्लास्टिक पिशव्या व एक कापडी पिशवी घेऊन बाहेर आला. त्याने प्रथम हास्यमुद्रेतच तिन्हीही पिशव्या आपल्या दोन्हीही भावांकडे दिल्या आणि विजय आरेकर याची गळाभेट घेतली. त्यानंतर त्याने तिन्हीही वकिलासह संदीप आणि सचिन या दोघा भावांना हस्तांदोलन केले. त्यावेळी एका ज्येष्ठ कार्यकर्त्यालाही त्याने हात जोडून नमस्कार केला.


समीर घरी परतला
सांगली : पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाड सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सांगलीतील स्वत:च्या घरी परतला. त्याच्यासोबत वकील व ‘सनातन’चे साधक होते. शंभरफुटी रस्त्यावरील मोती चौकाजवळील शनी मंदिराजवळ त्याचे ‘भावेश्वरी छाया’ नावाचे घर आहे. समीर घरी आला तेव्हा घरी त्याची आई, भाऊ होते. त्याला भेटण्यासाठी आलेल्या साधकांची वर्दळ दिसत होती. समीर आणि त्याच्या घराला कोणताही पोलीस बंदोबस्त पुरविलेला नाही.



समीरला न्यायालयाने जामीन मंजूरसाठी घातलेले निर्बंध
प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कोल्हापुरातील कार्यालयात हजेरी द्यावी.
तपास अधिकाऱ्यांकडे हजेरी आणि न्यायालयीन कामांव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात त्यास प्रवेश करता येणार नाही.

जामीन मिळाल्यानंतर तो राहणार असणारा पत्ता त्याने द्यावा, तसेच पासपोर्ट असल्यास न्यायालयाकडे जमा करावा.
सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करण्याचा अगर साक्षीदारांवर दबाव आणण्याचा समीरने प्रयत्न करू नये.
महाराष्ट्र सोडून कुठेही बाहेर जाऊ नये.
त्याच्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी.


सुटकेबाबतच्या घडामोडी

१६ जानेवारी २०१६ : समीरच्या वकिलांकडून जामिनासाठी पहिला अर्ज दाखल.
२८ जानेवारी : जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी समीरचा जामीन अर्ज फेटाळला.
२३ मार्च : समीरचा जामिनासाठी दुसऱ्यांदा अर्ज.
दुसरा जामीन अर्जही फेटाळला.
आॅगस्ट : उच्च न्यायालयात समीरचा जामीन अर्ज दाखल.
७ सप्टेंबर : उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला.
२७ एप्रिल २०१७ : तिसऱ्यांदा जिल्हा सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे जामीन अर्ज दाखल.
१७ जून : जामीन मंजूर
१९ जून : सकाळी ११ ते १ वा. जामिनाबाबतची कागदपत्रे जिल्हा न्यायालयात वकिलामार्फत सादर. सुटकेची रिलीज आॅर्डर मिळाली
दुपारी २.३० वाजता कारागहाबाहेर पेटीत नियमानुसार‘रिलीज आॅर्डर’ टाकली.
दुपारी ४.३० वाजता : कारागृहाबाहेर पेटी उघडून ‘रिलीज आॅर्डर’कर्मचाऱ्याकडून ताब्यात
सायंकाळी ४.४५ वाजता : अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर व अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी कारागृहात जाऊन अधीक्षक शरद शेळके यांच्याशी चर्चा
सायंकाळी ५ वाजता : कारागृह अधीक्षक शेळके यांच्याकडून सर्व कागदपत्रांची तपासणी, संशयितांचे नाव व कलमांची तपासणी करून समीरला अटी व शर्र्तींची आठवण करून दिली.
सायंकाळी ५.१५ वा : समीर एकटाच हास्यमुद्रेने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येऊन सहकाऱ्यांना भेटला.

Web Title: Sameer out of jail after 21 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.