महाराष्ट्र सदनातील वादाकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष ?
By admin | Published: July 29, 2014 09:49 AM2014-07-29T09:49:02+5:302014-07-29T09:49:02+5:30
महाराष्ट्र सदनातील चपाती राडा ५ दिवसांनी प्रसारमाध्यमांमधून कळल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असला प्रत्यक्षात घटना घडली त्याच दिवशी त्यांना माहिती देण्यात आली होती.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २९ - दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील चपाती राड्याची माहिती पाच दिवसांनी प्रसारमाध्यमांमधून कळल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असला तरी हा वाद ज्या दिवशी घडला त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी हे प्रकरण जाणूनबुजून चिघळू दिले की काय यावर चर्चा रंगली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील जेवणाचा सुमार दर्जा आणि अन्य समस्यांमुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी १७ जुलैरोजी कॅंटिनमधील मुस्लीम तरुणाला चपाती भरवून त्याचा रोजा मोडला होता. पाच दिवसांनी प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकले आणि शिवसेना खासदारांचे प्रताप जगासमोर आले. या घटनेमुळे शिवसेना खासदारांवर सर्वत्र टीकाही झाली. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वादाची काहीच माहिती नव्हती. प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आल्यावर या वादाची माहिती घेतली असा दावा केला होता. मात्र चव्हाण यांना ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी माहिती देण्यात आली होती अशी माहिती सरकारी कागदपत्रांवरुन समोर आली आहे. शिवसेना खासदारांनी केलेल्या कृत्यानंतर सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी १७ जुलैरोजी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाला गोपनीय अहवाल पाठवला होता. यानंतर बिपीन मलिक यांनी कँटिनमधील संबंधीत कर्मचारी आणि आयआरसीटीसी या दोघांचीही माफी मागितली होती. तसेच राज्याचे मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी मलिक यांना योग्य कारवाईचे आदेश दिले.
२० जुलैरोजी चव्हाण दिल्लीत गेल्यावर त्यांनी महाराष्ट्र सदनात भेट दिली होती. त्यावेळीही त्यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली होती. मात्र रमझानच्या काळात तणावपूर्ण निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आल्यावर चव्हाण यांनी राज्याचे सचिव सहारिया यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. 'महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई केली' अशा शब्दात एका वरिष्ठ सनदी अधिका-याने नाराजी व्यक्त केली. चव्हाण यांनी हा वाद चिघळावा आणि शिवसेनेची कोंडी व्हावी यासाठी या वादाकडे दुर्लक्ष केले का यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.