सर्वच जीवांना न्याय हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:37 AM2018-05-22T07:37:44+5:302018-05-22T07:37:44+5:30

ऊसतोडणी करताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतात अगदी सहज दिसणारा हा लहानसा वैशिष्ट्यपूर्ण जीव आता बघायलाही मिळत नाही.

All the beings should judge! | सर्वच जीवांना न्याय हवा!

सर्वच जीवांना न्याय हवा!

Next

काही वर्षांपूर्वी मध्य भारतासह अनेक ठिकाणी सहजतेने आढळणारे खवले मांजर (पँगोलीन) आज बेसुमार शिकारीमुळे जणू नष्टप्राय झाले आहे. ऊसतोडणी करताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतात अगदी सहज दिसणारा हा लहानसा वैशिष्ट्यपूर्ण जीव आता बघायलाही मिळत नाही. कुठे गेला हा जीव? काय मिळत होते त्याच्यापासून? या प्रश्नांची उत्तरे मग या प्राण्यांच्या शरीरावर असणाऱ्या खवल्यांवर येऊन थांबतात. मध्य भारतातील काही शहरांत जेव्हा पोत्यांनी या प्राण्यांची खवले जप्त झाली त्यावेळी मोठा उलगडा झाला. हे खवले पद्धतशीरपणे परदेशात वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले. हा व्यापार इतका सुरळीत सुरू होता की, हे प्रकरण समोर येईपर्यंत हा प्राणी संकटग्रस्तांच्या यादीत येऊन ठेपला आहे. हे असे एकाच प्राण्याच्या बाबतीत घडले असे नाही. वाघ, बिबटसारख्या लोकप्रिय व प्रसिद्ध प्राण्यांच्या बातम्यांना नेहमीच जागा मिळते, पण पाणमांजर, खवले मांजर यासह अनेक कमी माहीत असलेल्या जीवांना मात्र नष्ट होण्याची वेळ येऊन ठेपते. हे काही फक्त प्राण्यांनाच लागू नाही. पक्ष्यांवरही हीच वेळ आल्याचे आपल्याला दिसून येईल. माळढोक पक्षी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
किती टक्के जंगल वाढले, किती टक्के कमी झाले याची साग्रसंगीत आकडेवारी प्रसिद्ध होते. मग आपले राज्यकर्ते पाठ थोपटून घेण्यात चढाओढ करताना दिसतात. वस्तुस्थिती आणि परिस्थिती बघितल्यावर वेगळेच चित्र डोळ्यासमोर येते. जंगलांना दुभागून अनेक महामार्ग आरपार जात आहेत. उद्योगांची प्रचंड साखळी सागर किनाºयांवर उभी राहत आहे. मोठी धरणे जंगलांच्या अतिसंरक्षित क्षेत्रापर्यंत विस्तारत आहेत. शिकार-चोरांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याच्या सूचना येत आहेत. ही यादी न संपणारी आहे. पर्यायाने निसर्गचक्रातील प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याचा फटका बसत आहे. जैवविविधता दिनाच्या निमित्ताने फक्त या बाबींचा ऊहापोह करायचा की आपल्या गळ्यापर्यंत आलेल्या या प्रकाराचा गंभीर विचार करून तोडगा काढायचा, हा कळीचा प्रश्न आहे.
देशाच्या एकूण भूभागापैकी केवळ चार टक्के भूभाग संरक्षित क्षेत्राखाली येतो. पाचशेहून अधिक संरक्षित क्षेत्रांमध्ये देशातील साडेतीनशे सस्तन प्रजातींचे घर आहे. केवळ आकाराने मोठे व प्रसिद्ध असणारे वाघ, हत्ती, बिबट, सिंह यासारखे महत्त्वपूर्ण प्राणी सातत्याने प्रकाशझोतात राहतात. कच्छच्या रणमध्ये जंगली गाढव, मणिपुरातील मणिपुरी हरिण, ईशान्येकडील जंगलात दिसणाºया अनेक दुर्लभ प्रजाती महत्त्वाच्या आहेत. जैवविविधतेचे आर्थिक मूल्य अथवा परिस्थितीकीय मूल्यांचा अभ्यास करूनही, केवळ ते कागदावरच राहिल्याचे आता वारंवार घडत आहे. विकासाची चढाओढ कुठल्या थराला जाऊन संपेल हे काळच ठरवेल. देशाची स्थिती आणि महाराष्टÑाची स्थिती यात वेगळा काही फरक नाही. घाटमाथ्यांना जोडणाºया अद्वितीय, अजोड जंगलांमधून जाणाºया रस्त्यांचे जाळे वाढतच आहे. मध्य भारतातील प्रसिद्ध अशा व्याघ्र प्रकल्पांना या सर्व गतीचा फटका बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रस्ते अपघातात प्राणी मरत असल्याचे चित्र आहे. गवताळ प्रदेशाच्या परिसंस्थेत झाडे लावण्याची चढाओढ सुरू आहे आणि खारफुटींच्या वनांनाही विकास कामांचा फटका बसत आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा, वन कायदा, वन्यजीव कायदे अत्यंत कठोरपणे अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. जैवविविधता सांभाळताना, त्यात वृद्धी करताना प्रत्येक घटकाचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. काही राज्यांनी वन्यजीवांच्या अधिवासाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभ्यास करून वन्यजीवांचे पुनर्वसन केले आहे. महाराष्टÑानेही क्षेत्रालगतच्या गावांसाठी श्यामाप्रसाद जनवन योजना अमलात आणली आहे. स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून या योजना जोरकसपणे राबविण्याची गरज आहे. अशा योजनांसाठी पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
निसर्ग संवर्धनाचा हा टप्पा प्रदीर्घ आहे. यात सातत्य, चिकाटी, पारदर्शकता येण्याची नितांत गरज आहे. वनविभागाने यात अधिक पुढाकार घेण्याची गरज आहे. फक्त वाघावरच लक्ष केंद्रित न करता जैवसाखळीतील प्रत्येक घटकाचा सांगोपांग विचार करून शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे, तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून सामान्य जनेतपर्यंत या सर्व जीवांचे महत्त्व या क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांमार्फत नेण्याची आवश्यकता आहे.


१२० सस्तन प्राणी प्रजाती नष्ट
नैसर्गिक संसाधनांच्या बेसुमार वापराचे परिणाम सातत्याने जाणवत आहेत. अमाप लोकसंख्या वाढीने पाणी, वनांवरील ताण प्रचंड वाढला आहे. जीवन पद्धतीत वाढता उपभोगवादही जैवविविधतेच्या ºहासाला कारणीभूत ठरत आहे. १७ व्या शतकापासून जगभरातील जवळपास १२० सस्तन प्राणी आणि १५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आता नष्ट होण्याचा वेग अधिक वाढू लागला आहे. यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.

- संजय करकरे
सहसंचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नागपूर

 

Web Title: All the beings should judge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.