कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस; ‘वारणा’ धरणाचे चार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:46 AM2018-07-16T00:46:24+5:302018-07-16T00:46:29+5:30

Rainfall in Kolhapur district; Four doors of 'Varna' dam opened | कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस; ‘वारणा’ धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस; ‘वारणा’ धरणाचे चार दरवाजे उघडले

Next


कोल्हापूर/ शित्तूर-वारुण : जिल्ह्यात रविवारी धुवाधार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही संततधार सुरू असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ५ हजार ३७४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगेने ४० फुटांकडे आगेकूच केली असून, सहा राज्य तर १२ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
शनिवारी (दि. १४) कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, आजरा या तालुक्यांत पावसाचा जोर कमालीचा होता.
चांदोली ( वारणा ) धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे दरवाजे सकाळी दहा वाजता ०.५० मीटरने उचलण्यात आले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने चारही दरवाजातून सायंकाळी चार वाजता ४००० घनफूट पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. पावसाचा जोर वाढत गेला तसा सायंकाळी पाच वाजता ५३७४ घनफूट विसर्ग वाढविला आहे.
राधानगरी व कासारी १२५, दूधगंगा ९६, वारणा ६८, तर कोदे १४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. ‘राधानगरी’तून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी वाढत गेली असून पंचगंगेने ४० फुटांच्या पातळीकडे आगेकूच सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६४ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दत्त मंदिरात पुराचे पाणी
वडणगे : श्री क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. प्रयाग-चिखली येथील बाबाजी पाटील पाणंद परिसरामध्ये पुराचे पाणी आले आहे. गावासभोवती पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा दिला आहे. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी रेडेडोह येथे रस्त्याच्या कडेला पाणी आले आहे. केर्ली येथील दस्तुरी येथे कुंभार यांच्या घराजवळ पाणी आले असून, येथील जगबुडी पुलाजवळ पुराचे पाणी आले आहे.
हलकर्णी : गडहिंग्लज तालुक्यासह तळकोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांगनूर-संकेश्वर दरम्यान हिरण्यकेशी नदीवरील गोटुर बंधारा प्रथमच पाण्याखाली गेला आहे. सध्या बंधाऱ्यावरून फूटभर पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
कडगाव : भुदरगड तालुक्यातील गारगोटी-शेळोली रस्ता चोपडेवाडी दरम्यान खचल्याने या मार्गावरील वाहतूक तिसºया दिवशीही बंदच राहिली. या मार्गावरून आजरा, वेसर्डे, कडगाव या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक होते. रस्ता खचल्यामुळे दुचाकी व लहान वाहने याव्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. नद्यांना आलेल्या पुराचे पाणी स्थिर आहे. पाऊस व वादळी वाºयामुळे अणुस्कुरा घाटातील रस्त्यावर दरडी कोसळल्या.
पाच दिवस पावसाची संततधार सुरू आहे. वारणा, कडवी, कासारी, शाळी या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे कडवी, कासारी नद्यांवरचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाऊस, जोरदार वाºयामुळे अणुस्कुरा घाटातील रस्त्यावर दरड कोसळली आहे. रस्त्यावर मोठे दगड निखळून पडले आहेत. बहुतांश ठिकाणी रस्ते खचले आहेत. तालुक्याच्या आंबा, उदगिरी, येळवण जुगाई, मांजरे परिसरात लाईट गायब आहे.
गडहिंग्लज : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नांगनूर, निलजी व ऐनापूर या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
नेसरीनजीकच्या हडलगे येथे घटप्रभा नदीवर नवीन पूल झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दोन दिवस उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून पुन्हा मुसळधार सुरूवात केली आहे. या पावसामुळे दुष्काळी छायेतील गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागाला दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीवरील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. रस्त्यावर पाणी आल्यामुळे रविवारी रात्री हुपरी मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, नदीकाठावरील गणपती मंदिर, महादेव मंदिर, तसेच स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली. शनिवार (दि. १४)पेक्षा रविवारी पाण्याची पातळी एक फुटाने वाढली असून, जुन्या पुलाचे कठडेसुद्धा पाण्याखाली गेले आहेत. रविवारी रात्री उशिरा हुपरी मार्गावर माणकापूरजवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.
नवे पारगाव : वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने चिकुर्डे पुलाजवळचा धरण बंधारापूल पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रात सुरू असणाºया मुसळधार पावसाने चांदोली धरण ८० टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५ दिवस म्हणजे दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ८१० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण १३२४ मिलिमीटर इतके आहे.

Web Title: Rainfall in Kolhapur district; Four doors of 'Varna' dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.