जाणून घ्या भारताने कसा जिंकला होता पहिला विश्वचषक

By Admin | Published: June 25, 2016 05:12 AM2016-06-25T05:12:04+5:302016-06-25T05:27:05+5:30

विडिंजच्या तोफखान्यासमोर भारताचा संघ १८३ धावात गारद झाला. भारताकडून क्रिष्णमचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथने प्रत्येकी २७ आणि २६ धावा केल्या

Know how India had won the first World Cup | जाणून घ्या भारताने कसा जिंकला होता पहिला विश्वचषक

जाणून घ्या भारताने कसा जिंकला होता पहिला विश्वचषक

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ : २५ जून १९८३ हा भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस आहे. भारताच्या या विश्वचषक विजयाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. भारताने एकापेक्षा एक सरस खेळाडूंनी भरलेल्या बलाढय वेस्ट इंडिजवर विजय मिळवून जागतिक क्रिकेटमध्ये भारताला एक नवी ओळख मिळवून दिली. या विजयानंतर भारतात क्रिकेटच्या लोकप्रियतेचा जो प्रवास सुरु झाला तो आजही तसाच सुरु आहे. 
 
या विश्वचषकाने फक्त भारतीय क्रिकेटलाच कलाटणी दिली नाही तर, क्रिकेटला एक नवा जगज्जेता मिळवून दिला तसचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचे वर्चस्व कमी केले. १९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. 
 

(..याच दिवशी वेस्ट इंडिजने जिंकला होता पहिला वर्ल्डकप)

स्पर्धेचा फॉरमॅट 

या विश्वचषकातही आठ संघांनी सहभाग घेतला. चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकासारखेच या स्पर्धेचे स्वरुप होते फक्त साखळी फेरीत प्रत्येक गटातील संघांचे परस्पराविरुध्द दोन सामने झाले. याआधीच्या विश्वचषकात प्रत्येक गटातील संघ परस्पराविरुध्द एकच सामना खेळला होता. दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्यफेरीत आणि उपांत्यफेरीतील विजेते अंतिम फेरीत असे या स्पर्धेचे स्वरुप होते. 
१९८३ सालची विश्वचषक स्पर्धाही प्रुडेन्शियल अ‍ॅश्यूरन्स कंपनीने प्रायोजित केल्याने तिसरा विश्वचषकही प्रुडेन्शियल विश्वचषक म्हणून ओळखला जातो. आयसीसीने सलग तिस-यांदा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचा मान इंग्लंडला दिला होता. 
१९८३ विश्वचषक वैशिष्टये
२५ जून १९८३ या दिवशी लंडनच्या लॉडर्स मैदानावर क्रिकेटमधील सर्वात मोठया धक्कादायक निकालाची नोंद झाली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने बलाढय वेस्ट इंडिजवर ४३ धावांनी विजय मिळवला आणि भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची करामत केली. कर्णधार कपिल देव यांनी झळाळता प्रुडेन्शियल विश्वचषक उंचावला.
भारताच्या रुपाने प्रथमच उपखंडाला क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळाले.
१९८३ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या डेविड गॉवर यांनी सर्वाधिक ३८४ धावा केल्या.
भारताच्या रॉजर बिन्नी यांनी सर्वाधिक १८ गडी बाद केले.
१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार नव्हता.
                                 
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मोलाच्या ठरणा-या २६ धावा करुन, सात षटकात बारा धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करण्याची अष्टपैलू कामगिरी करणा-या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
नऊ जून १९८३ रोजी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या नवख्या झिंम्बावे संघाने बलाढय ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवून पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली.
१९८३ मध्ये पाकिस्तानने सलग दुस-यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.
सत्तरच्या दशकात एकदिवसीय सामने ६० षटकांचे होते. त्यामुळे १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामना ६० षटकांचा खेळवण्यात आला.
तिसरी विश्वचषक स्पर्धाही सर्वच संघ क्रिकेटचा पारंपारिक सफेद रंगाचा गणवेश घालून खेळले. या स्पर्धेत लाल रंगाचा चेंडू वापरण्यात आला.
या स्पर्धेत आयसीसीचे कायमस्वरुपी सदस्य सात संघ होते तर १९८२ आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून झिंम्बावे विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.
 
पहिला साखळी सामना भारत विरुध्द वेस्ट इंडिज
१९८३ विश्वचषक स्पर्धेत आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. भारतीय संघ ह्यबह्ण गटात होता. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, झिम्बांबे हे संघ भारताच्या गटात होता. नऊ जूनला वेस्टइंडिज विरुध्द भारताचा पहिला सामना होता. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. ६० षटकांच्या या सामन्यात भारताने २६२ धावा केल्या. भारतातर्फे यशपाल शर्माने १२० चेंडूत सर्वाधिक ८९ धावा केल्या. भारताच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सर्वबाद २२८ धावा केल्या. भारताने ३४ धावांनी हा सामना जिंकला. सामनावीर - यशपाल शर्मा

(..याच दिवशी वेस्ट इंडिजने जिंकला होता पहिला विश्वचषक )
 
दुसरा साखळी सामना भारत विरुध्द झिंबाब्वे
११ जूनरोजी झिंबाब्वे विरुध्दच्या दुस-या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने झिंबाब्वेला १५५ धावांवर रोखले. भारताने पाच विकेट आणि १३५ चेंडू राखून आरामात हे आव्हान पार केले. दहा षटकात २७ धावा देऊन तीन बळी घेणा-या मदनलालला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामनावीर - मदनलाल
                    
तिसरा साखळी सामना भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया
१३ जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुध्द भारताचा तिसरा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ६० षटकात ३२० धावा केल्या. भारताने या धावसंख्येचा पाठलाग करताना १५८ धावात नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने १६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सर्वाधिक ११० धावा करणा-या टीएम चॅपलला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.
सामनावीर - टीएम चॅपल
 
चौथा साखळी सामना भारत विरुध्द वेस्ट इंडिज
साखळी गटातील लढतीत वेस्ट इंडिज विरुध्द भारताचा हा दुसरा सामना होता. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने साठ षटकात २८२ धावा केल्या. बदल्यात भारताला फक्त २१६ धावा करता आल्या. वेस्ट इंडिजने ६६ धावांनी विजय मिळवला. भारताविरुध्द ११९ धावांची खेळी करणा-या व्हिव्हियन रिचडर्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
सामनावीर - व्हिव्हियन रिचडर्स
पाचवा साखळी सामना भारत विरुध्द झिंम्बाबे
विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठण्यासाठी झिंम्बाबे विरुध्दच्या सामन्यात भारताला विजय अत्यावश्यक होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण अवघ्या १७ धावात भारताचे पाच गडी तंबुत परतले होते. भारताचा पराभव अटळ दिसत होता. पण या निर्णयाक क्षण कपिल देवने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि सामन्याचा नूरच पालटून टाकला. कपिलने १३८ चेंडूत नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. या खेळीत कपिलने १६ चौकार आणि सहा षटकार लगावले. कपिलच्या शतकाच्या जोरावर भारताने झिंम्बाबेसमोर २६७ धावांचे आव्हान ठेवले. झिंम्बाबेचा डाव २३५ धावात संपुष्टात आला.
सामनावीर - कपिल देव
 
सहावा साखळी सामना भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया विरुध्दचा अखेरचा साखळी सामना भारताने ११८ धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने २४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव १२९ धावात गडगडला. ऑस्ट्रेलियाचे चार विकेट घेणारा रॉजर बिन्नी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
सामनावीर - रॉजर बिन्नी
 
पहिली उपांत्यफेरी भारत विरुध्द इंग्लंड
ऑल्ड ट्रॅफडवर झालेल्या उपांत्यफेरीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला ६० षटकात २१३ धावांवर रोखले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फ्लॉवरने सर्वाधिक ३३ धावा केल्या. भारताकडून कपिलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारताने चार विकेट गमावत हे आव्हान सहज पार केले आणि सामना सहा विकेटने जिंकला. भारताकडून यशपाल शर्माने आणि संदीप पाटीलने अर्धशतके झळकवली. ४६ धावा करुन दोन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले.
सामनावीर- मोहिंदर अमरनाथ
 
दुसरी उपांत्यफेरी पाकिस्तान विरुध्द वेस्ट इंडिज
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज सलग दुस-यांदा विश्वचषक स्पर्धेत उपांत्यफेरीत समोरासमोर आले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजीला निमंत्रित केले. विडिंजच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानला १८४ धावांवर रोखले. पाकिस्तानकडून मोहसीन खानने एकाकी लढत देत विडिंजच्या तोफखान्याचा समर्थपणे सामना केला. मोहसीन खानच्या १७६ चेंडूतील ७० धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. माल्कम मार्शलने तीन, अँडी रॉबर्टसने दोन गडी बाद केले. वेस्ट इंडिजने दोन गडी गमावून सहज हे आव्हान पार केले. वेस्ट इंडिजकडून व्हिव्हियन रिचर्ड्स रिचडर्सने सर्वाधिक ९६ चेंडूत ८० धावांची खेळी केली. रिचडर्सने आपल्या खेळीत अकरा चौकार आणि एक षटकार लगावला. लॅरी गोम्सने नाबाद अर्धशतक झळकवत त्याला चांगली साथ दिली.
सामनावीर - व्हिव्हियन रिचर्ड्स
   
अंतिम सामना भारत विरुध्द वेस्ट इंडिज
लॉडर्सवर झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. रॉबर्ट, मार्शल, गार्नर, होल्डींग, हेन्स, लॉईड आणि रिचडर्स अशा एकाहून एक रथी-महारथींनी भरलेल्या वेस्ट इंडिजसंघासमोर भारताचा निभाव लागणार नाही असाच सर्वांचा समज होता. सुरुवातही तशीच झाली होती. भारत नाणेफेकिचा कौल हरला होता. वेस्ट इंडिजने भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.
 
विडिंजच्या तोफखान्यासमोर भारताचा संघ १८३ धावात गारद झाला. भारताकडून क्रिष्णमचारी श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथने प्रत्येकी २७ आणि २६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. विजयासाठी १८४ धावा विंडिजसाठी अत्यंत माफक लक्ष्य होते.
वेस्टइंडिज सलग तिस-यांदा विश्वविजेतेपदाची हॅट्रीक करणार असाच सर्वांचा समज होता. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. वेस्ट इंडिजचे रथी-महारथी फलंदाज भारताच्या मध्यमगती मा-यासमोर ढेपाळत गेले.
 
मदनलालच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धोकादायक अशा व्हिव्हियन रिचडर्सचा झेल कपिलने १८ ते २० यार्ड धाव घेत टिपला आणि भारत इतिहास घडवणार हे निश्चित झाले. विडिंजकडून रिचडर्सने सर्वाधिक ३३ धावा केल्या होत्या.
 
वेस्टइंडिजचा डाव ५२ षटकात १४० धावात संपुष्टात आला आणि भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. २६ धावा आणि तीन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.
सामनावीर - मोहिंदर अमरनाथ
 
१९८३ च्या विश्वचषकातील भारतीय संघ 
 
कपिल देव (कर्णधार)
मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार)
किर्ती आझाद
रॉजर बिन्नी
सुनील गावस्कर
सय्यद किरमाणी
मदनलाल
संदीप पाटील
बलविंदर संधू
यशपाल शर्मा
रवि शास्त्री
क्रिष्णमचारी श्रीकांत
सुनील वाल्सन
दिलीप वेंगसरकर

 

Web Title: Know how India had won the first World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.