महाजनकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:51 PM2018-04-14T17:51:45+5:302018-04-14T17:51:45+5:30

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे.

Mahajanki | महाजनकी

महाजनकी

Next

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची तालुक्यावर आणि त्यातील संस्थांवर मजबूत पकड आहे. परंतु २०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत महाजन हे कार्यकर्त्यांवर विसंबून राहिल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. अडीच वर्षांनंतर पालिकेत सत्तापालट करुन महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष बनविले. मंत्रिपदाचा उपयोग करीत वेगवेगळ्या खात्यांचा मोठा निधी जामनेर शहरात आणला. अडीच वर्षात विकास कामांना गती आणत असतानाच राजकीय पातळीवर चातुर्याने रणनीती आखत प्रतिस्पर्धी पक्षाच्या मातब्बरांना भाजपात ओढले. ‘शतप्रतिशत’ विजयामागील ही रणनिती यशस्वी ठरली, त्या रणनितीबद्दल महाजन यांना गुण द्यावेच लागतील. कॉंग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली आणि त्यांनी हालचाली सुरु केल्या. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीवरुन शेवटच्या दिवसापर्यंत घोळ सुरु होता. जिल्हा पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यापर्यंत कार्यकर्त्यांचा असंतोष पोहोचला होता. सेनेचा सर्व जागा लढविण्याचा निर्धार हवेत विरला आणि केवळ एक उमेदवार रिंगणात उतरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांचा गट महाजन यांना उघडपणे मदत करीत होता. राजकारण आणि युध्दात सर्व क्षम्य असते म्हणतात, त्याप्रमाणे महाजन यांनी खेळी केली आणि ती तडीस नेली. दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हे केवळ धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांच्या संयुक्त सभेला व्यासपीठावर हजेरी लावण्यापुरता आले. उर्वरित काळात प्रचाराची धुरा सांभाळण्यापासून तर रॅलीत सहभागापर्यंत कुणाचाही सहभाग दिसून आला नाही, याचा अर्थ महाजन यांचा विजय आघाडीने गृहित धरला होता काय? मंत्रिपदाचा गैरवापर, पैशांचा महापूर, प्रशासनाची दडपशाही असे आरोप आता विरोधकांकडून होतील, पण निवडणुकीनंतरच्या आरोपांमध्ये तथ्य कमी आणि वैफल्य जास्त असते, हे सगळ्यांना ठावूक आहे. वर्षभरावर आलेली लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहे. ‘संकटमोचक’ म्हणून महाजन अलिकडे ओळखले जाऊ लागले आहेत. किसान मोर्चा, अण्णा हजारे यांचे उपोषण या दोन्ही घटनांमध्ये महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे. तो महाजन यांनी सार्थ ठरविला. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे नाराज असताना सरकार व पक्ष महाजन यांना बळ देत आहे, आणि त्यातून महाजन अधिक बलवान होत आहे, हादेखील निकालाचा अर्थ आहे.

Web Title: Mahajanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.