'दिल'से बोलणारे दादा 'दिमाग'से बोलले; अजित पवार यांना नेमके काय हवे आहे?

By यदू जोशी | Published: June 23, 2023 09:06 AM2023-06-23T09:06:32+5:302023-06-23T09:06:53+5:30

अजितदादा पक्षविरोधी नेते आहेत अशी प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केली जाते! एरवी दादा ‘दिल’से बोलतात, यावेळी मात्र ते ‘दिमाग’से बोलले आहेत!

What exactly does Ajit Pawar want? | 'दिल'से बोलणारे दादा 'दिमाग'से बोलले; अजित पवार यांना नेमके काय हवे आहे?

'दिल'से बोलणारे दादा 'दिमाग'से बोलले; अजित पवार यांना नेमके काय हवे आहे?

googlenewsNext

- यदु जोशी
(सहयोगी संपादक, लोकमत)

अजित पवार यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोडायचे आहे. पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. ‘मी फार कडक नाही, असे काही जण म्हणतात आता काय सत्तापक्षाची गचांडी पकडायची का?’ अशी उद्विग्नताही त्यांनी बोलून दाखवली. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तो परत घेणे, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सगळा धुरळा खाली बसेल असे वाटत असतानाच अजितदादांनी अस्वस्थता मांडली. ते विरोधी पक्षनेते आहेत, पण ते पक्षविरोधी नेते आहेत आणि सत्तापक्षाशी पंगा घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा जाणिवपूर्वक तयार केली जाते. त्यामागे बाहेरच्यांपेक्षा आतलेच लोक जास्त आहेत. अजितदादांच्या बोलण्याने राष्ट्रवादीत अजूनही सगळे आलबेल नाही याचीच प्रचिती आली आहे.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला चीफ मिनिस्टर इन पाइपलाइन असे म्हटले जाते. सत्तेत नसले तरी सत्तेचा फील देणारे हे पद आहे. ते सोडावेसे अजितदादांना का वाटत असावे? सुप्रिया सुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाल्या अन् त्या महाराष्ट्राच्या प्रभारीदेखील आहेत. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. या दोघांच्या शीर्षस्थानी शरद पवार आहेतच. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा या निवडणुकांचे उमेदवार ठरवत असताना आपण विरोधी पक्षनेते पदावर असलो तर आपल्याला तेवढा वाव राहणार नाही, असे अजितदादांना वाटत असावे. प्रदेशाध्यक्षपद घेतले, तर तो वाव असतो. पुढच्या पाच वर्षांसाठी आणि पक्षावर पकड राहण्यासाठी या तिन्ही निवडणुका महत्त्वाच्या आहेत. अजितदादा प्रदेशाध्यक्ष झाले, तर राज्यभरातील राजकीय मैदानात त्यांना जोरदार बॅटिंग करता येईल. पक्षाला चांगले यश मिळवून देऊ शकले तर त्यांची उंची वाढेल. सत्तापक्षाशी जुळवून घेणारा विरोधी पक्षनेता ही प्रतिमा चिकटवली जाण्यापेक्षा मैदानात दोन हात करणे अधिक चांगले, असे अजितदादांना वाटत असावे.

प्रश्न असा आहे की, त्यांचे पंख छाटण्यासाठी आसुसलेले लोक त्यांना प्रदेशाध्यक्ष होऊ देतील का? विरोधी पक्षनेते पद सोडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याच समारंभात शरद पवार यांचे भाषण झाले, पण त्यांनी यावर काहीही निर्णय दिला नाही आणि काही बोललेदेखील नाहीत. याचा अर्थ अजितदादांच्या इच्छेचा स्वीकार साहेबांनी आजतरी केेलेला नाही. पण, दादांनी पहिल्यांदाच जाहीरपणे एखादी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ती फारकाळ टाळतादेखील येणार नाही. माहिती अशी आहे की, अजितदादा अशी काही इच्छा बोलून दाखवतील याची पुसटशीही कल्पना वरिष्ठ नेत्यांना नव्हती. पक्षसंघटनेवर दादा जाहीररीत्या बोलले.. चाळिशी पार केलेले ‘युवक’चे पदाधिकारी बदला म्हणाले.

मुंबई राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपण देऊ शकत नाही, यामागे कोणाचे इंटरेस्ट आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. जयंत पाटील पाच वर्षे दहा महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष आहेत, असा टोलाही होताच. दादा ‘दिल से’बोलतात आणि अडचणीत येतात पण त्यांचे परवाचे भाषण ‘दिमाग से’ केलेले होते. ते जे काही बोलले ते बेदखल करणे परवडणार नाही. परवा सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्याच भाषणाला होता हे नजरअंदाज करता येणार नाही. सुप्रियाताईंना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यापेक्षा प्रफुल्ल पटेल यांना ती संधी दिली असती, तर कदाचित अजितदादांनी परवाच्या भाषणात प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली नसती. सुप्रियाताई दिल्लीत अन् अजितदादा मुंबईत हे अलिखित समीकरण आजवर राहत आले आहे, पण ते कुठेतरी बिघडल्याने गडबड झाली आहे. 

अस्वस्थता सगळीकडेच
अस्वस्थता केवळ राष्ट्रवादीतच आहे असे नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने भाजप व शिवसेनेतील आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. आमदार आता खासगीत जरा स्पष्टच बोलू लागले आहेत. ‘आमच्यामुळे सरकार आले अन् आम्हालाच बाजूला ठेवले’, अशी शिंदे गटाची व्यथा आहे. भाजपचे अनुभवी आमदार रिकामे आहेत. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलणार म्हणून सध्याचे बरेच अध्यक्ष निष्क्रिय झाल्याचे म्हटले जाते. नवीन नियुक्तीही होत नाही. लोकसभा, विधानसभेला जे प्रभारी नेमले तेच उमेदवार असतील, असे म्हटले जात असल्याने या प्रभारींव्यतिरिक्तच्या इच्छुकांमध्ये चलबिचल आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते यांना मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून झालेली जखम अजून बरी झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले. भाजप-शिवसेनेची समन्वय समिती बनणार होती; ती हवेत विरल्याचे दिसते.

सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांना भाजप विचारेनासा झाला असल्याची भावना आहे. विनायक मेटेंच्या पत्नी शिवसंग्राम सांभाळण्याची धडपड करत आहेत, पण भाजप पूर्वीसारखा सन्मान देत नसल्याची सल तिथेही आहे. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत ईडीच्या छाप्यांनंतर अस्वस्थता आहे. तिथे लोकसभा, विधानसभेला आपले कसे होईल ही चिंता अनेकांना सतावत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना उद्धव ठाकरे यांनी जवळ केले, पण तेच आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीचे दर्शन घ्यायला गेले. ठाकरेंवर निशाणा साधण्याची आयती संधी भाजपला मिळाली. तसेही आंबेडकर हे ठाकरेंसोबत राहतील ही शक्यता कमी होत चालली आहे. आंबेडकर यांना सांभाळणे तितके सोपे नाही. 

के.चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्राच्या दरवाजावर जोरात ठकठक करत असल्याने काही जणांची धकधक वाढली आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्यासाठी राज्यातील डझनभर नेते दिल्लीत सक्रिय झाले आहेत. युवक काँग्रेसमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला कोणता पक्ष/आघाड्या कशा सामोरे जातील याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. काही नवीन समीकरणे नक्कीच नजीकच्या काळात आकाराला येतील. काहींचे शत्रू बदलतील, काहींना नवीन मित्र मिळतील.

Web Title: What exactly does Ajit Pawar want?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.