अहिंसा तत्त्वाची कालसापेक्षता!

By किरण अग्रवाल | Published: October 25, 2018 09:28 AM2018-10-25T09:28:43+5:302018-10-25T09:29:22+5:30

आदर्शांचे अगर तत्त्वांचेही काळाच्या कसोटीवर पुनरावलोकन करणे गरजेचेच असते, कारण त्यामागील विचारांची, भूमिकांची प्रासंगिकता जपली गेली तर परिणामकारकता व ...

The Time relativity of ahimsa | अहिंसा तत्त्वाची कालसापेक्षता!

अहिंसा तत्त्वाची कालसापेक्षता!

Next

आदर्शांचे अगर तत्त्वांचेही काळाच्या कसोटीवर पुनरावलोकन करणे गरजेचेच असते, कारण त्यामागील विचारांची, भूमिकांची प्रासंगिकता जपली गेली तर परिणामकारकता व उपयोगिताही वाढून जाते. विशेषत: नव्या संदर्भातून त्याकडे पाहिले गेले तर खऱ्या अर्थाने आदर्शाची जपणूक घडून येऊन अपेक्षित उद्दिष्टेही साध्य होतात. मानवी व्यवहाराच्या केंद्रस्थानी असलेल्या अहिंसा तत्त्वाला निसर्गाशी जोडण्याचा विचार असाच नवी दृष्टी देणारा आहे. दिगंबर जैन तीर्थक्षेत्र ऋषभदेवपुरम (मांगीतुंगी) येथे होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनात खुद्द राष्ट्रपती व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याबाबतचा जागर घडून आला, त्यामुळे या तत्त्वाला नवे परिमाण लाभून गेल्याचे म्हणता यावे.


आपल्याकडेच नव्हे, तर एकूणच जगाच्या पाठीवर वाढत्या हिंसेबद्दल चिंतेचे वातावरण आहे. ही हिंसा फार काही मोठ्या वादातून अगर कारणातून घडून येते असेही नाही, कुठे तरी कुणी माथेफिरू हाती बंदूक घेऊन शाळेत शिरतो आणि निष्पाप मुलांना यमसदनी धाडतो, असेही प्रकार घडून येत असतात. हे टाळण्यासाठी अहिंसेचा विचार मनामनांत रुजवणे गरजेचे आहे. जैन परंपरेने अहिंसा परमो धर्म:चा सिद्धांत प्रतिष्ठित केला असून, अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता व विश्वात शांती नांदण्यासाठी अहिंसेचाच मार्ग उपयोगी ठरणारा आहे. जैन तीर्थंकर भगवान महावीर यांनी मनुष्य जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी व विश्वशांतीसाठी जी त्रिसूत्री दिली, त्यात अपरिग्रह व अनेकांत दर्शनाखेरीज अहिंसा तत्त्व प्रथमस्थानी आहे. भगवान बुद्धांच्या पंचशीलातही अहिंसा तत्त्व अग्रस्थानी आहे. विश्वबंधुत्वाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी दया, क्षमा, करुणेसह अहिंसेचा विचार त्यांनी प्रतिपादिला. आज वाढत्या हिंसेच्या काळात तोच प्रासंगिक असल्याने आद्य तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्रमी १०८ फूट उंच मूर्तिनिर्माण कमिटीने नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मांगीतुंगी तथा श्री ऋषभदेवपुरम येथे जैन साध्वी गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणेतून विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन केले, ज्याद्वारे अहिंसेच्या अंगीकाराचा जागर तर घडून आलाच, शिवाय त्याच्या निसर्गाशी संबंधाचे पदरही अधोरेखित होऊन गेले. अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षात हा जागर घडून आला हे विशेष.

हिंसा ही व्यक्ती वा केवळ प्राणिमात्राशीच संबंधित बाब नाही, तर निसर्गाचीही हिंसा नको, अशी अत्यंत समयोचित भूमिका या संमेलनाचे उद्घाटन करताना महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मांडली. आज आपल्या गरजांसाठी मनुष्य निसर्गाला ओरबाडत आहे. निसर्गाने दिलेल्या साधन-संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेताना निसर्गाचीही हत्या घडून येत असून, पर्यावरणाला हानी पोहोचत आहे याकडे लक्ष वेधत राष्ट्रपतींनी मनुष्य व प्राणिमात्रांशीच नव्हे, तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता बोलून दाखविली. थोरांनी दिलेला व परंपरेने जपलेला अहिंसेचा विचार कालमानानुरूप किती व कसा पुढे नेता येऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. मानवाच्या प्रति करुणावान आणि संवेदनशील राहणे हाच धर्म होय हे खरेच; परंतु ही करुणा व संवेदना निसर्गाच्याही बाबतीत जपली जाण्याची विचारधारा यातून प्रगाढ होणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातही नेमका हाच धागा होता. जगावर ओढावलेल्या वैश्विक तपमानवाढीला मनुष्याचा हव्यास कारणीभूत असून, त्यापोटी निसर्गाशी छेडछाड केली जात आहे. त्यामुळे जैन धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे निसर्गाप्रतिची हिंसादेखील वर्ज्य मानण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भोगवृत्ती बाजूला सारून त्याग करण्याचे सल्ले सारेच देतात, मुख्यमंत्र्यांनीही ते सांगितले; परंतु निसर्गाचा अनिर्बंध उपभोग घेण्याच्या मानसिकतेशी हा भोगवाद जोडून त्यांनी निसर्गाची हिंसा त्यागण्याचे अध्यात्म मांडले ते विशेष व आजच्या काळाशी आणि स्थितीशी अनुरूपतेचे नाते सांगणारे आहे. अहिंसा तत्त्वाचे नव्या संदर्भातील हे विस्तृतीकरण म्हणूनच नवी दिशा देणारे ठरावे.

एकुणात, मांगीतुंगीतील विश्वशांती अहिंसा संमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांची उपस्थिती लाभून गेल्याने अहिंसेच्या जागराची परिणामकारकता वाढून जाणे तर स्वाभाविक ठरावेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या मन, वाचा, शरीर व आचरणातून घडून येणाºया हिंसेबरोबरच निसर्गाची हिंसा होत असल्याचाही मुद्दा यात निदर्शनास आणून दिला गेल्याने त्याअनुषंगाने जाणीव जागृती घडून येणे अपेक्षित आहे. नैसर्गिक साधन-संपत्ती, नदी-नाले यांचा ऱ्हास हा समस्त मानवजातीससाठी संकटाची चाहूल देणारा असून, निसर्गाची हिंसा रोखण्याचा विचार या संमेलनातून अधिक जोरकसपणे मांडला गेल्याने त्यासंबंधी सम्यक व्यवहार व आचरणाच्या वाटा प्रशस्त व्हाव्यात, इतकेच यानिमित्ताने.

Web Title: The Time relativity of ahimsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.