‘..तर भारताला अंधाराचे दिवस दिसतील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:05 AM2017-09-11T01:05:44+5:302017-09-11T01:06:14+5:30

भारतात होत असलेल्या पत्रकारांच्या व उदारमतवाद्यांच्या हत्यांची वाढती संख्या पाहता या देशातील लोकशाही अंधाराच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे असे म्हटले पाहिजे.’ न्यूयॉर्क टाइम्स या जगाच्या मानसिकतेवर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध अमेरिकन देैनिकाचा हा संपादकीय अभिप्राय आहे.

 'India will see dark days' | ‘..तर भारताला अंधाराचे दिवस दिसतील’

‘..तर भारताला अंधाराचे दिवस दिसतील’

Next

भारतात होत असलेल्या पत्रकारांच्या व उदारमतवाद्यांच्या हत्यांची वाढती संख्या पाहता या देशातील लोकशाही अंधाराच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे असे म्हटले पाहिजे.’ न्यूयॉर्क टाइम्स या जगाच्या मानसिकतेवर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध अमेरिकन देैनिकाचा हा संपादकीय अभिप्राय आहे. गौरी लंकेश या महिला पत्रकाराच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर या वृत्तपत्राने त्या घटनेची घेतलेली दखल अशी आहे. १९९२ पासून आतापर्यंत भारतात २७ पत्रकारांच्या हत्या झाल्या. त्यातल्या केवळ एका हत्येतील आरोपींना अटक करण्यात सरकारला यश आले आहे. या सगळ्या हत्या उजव्या विचारसरणीच्या (बहुसंख्यवादी वा कडव्या हिंदुत्ववादी) लोकांनी केल्या असून त्यात मृत्यू पावणाऱ्यात उदारमतवादी व अपक्ष पत्रकारांचा समावेश मोठा आहे. सरकार नावाच्या यंत्रणेला लोकशाही व्यवस्थेत टीका सहन करण्याची व तिच्याकडे सूचनावजा म्हणून पाहाण्याची सवय असावी लागते. टीकाकार म्हणजे जे सरकारविरोधकच नाही तर देशविरोधक, देशाचे शत्रू, पाकिस्तानवादी वा देशद्रोही असण्याचे सांगणे व तसे त्यांचे चित्रण करणे ही आपल्या राजकारणाची सध्याची तºहा लोकशाही स्वातंत्र्याची विरोधक व देशाला अंधाºया मार्गावर नेणारी आहे. असे न्यूयॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे. ज्ञानाचा स्फोट व दळणवळणाची जलद गती साधणे यामुळे जग लहान तर झालेच, शिवाय त्यातल्या कोणत्याही भागात घडणाºया बºयावाईट घटनाही आता जागतिक माहितीच्या होऊ लागल्या आहेत. भारतातील उदारमतवाद्यांची व विचारवंतांची हत्या आणि ज्ञानवंत माणसांची शासनाकडून होणारी अवहेलना या गोष्टी आता निव्वळ देशालाच ठाऊक आहेत असे नाही, त्या जगाच्या व्यासपीठावरही चर्चेला आलेल्या आहेत. काश्मिरातील हत्याकांड, म्यानमारमधील रोहिंग्या आदिवासींची कत्तल या घटना मध्यपूर्वेत सुरु असलेल्या अतिरेक्यांच्या हिंसाचाराएवढ्याच आता सीएनएन,बीबीसी आणि अल जझिरा यासारख्या जागतिक वाहिन्यांवर व अमेरिकेपासून जपानपर्यंतच्या वर्तमान जगातही ठळकपणे उमटू लागल्या आहेत. न्यूयॉर्क शहरात मोदींनी भरविलेली जाहीर सभा तेथील वृत्तपत्रांनी जेवढ्या ठळकपणे घेतली नाही तेवढी गौरीच्या हत्येची घटना त्यांनी चर्चेत आणली आहे. एकट्या गौरीचीच हत्या त्यांनी प्रकाशित केली असे नाही. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या सुधारणावादी लोकांच्या झालेल्या हत्यांचीही त्यांनी तशीच दखल घेतली आहे. त्यामुळे आपली दुष्कृत्ये आता देशाच्या सीमेएवढीच मर्यादित राहतील असे कुणी समजण्याचे कारण नाही. ती जगभर जातील आणि सरकार व देशाचीही जगात अप्रतिष्ठा करतील हे सगळ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. ‘ गौरीची हत्या हा केवळ टीका करणाऱ्या पत्रकारांना दिलेलाच संदेश नाही. ती सगळ्या लोकशाहीवादी प्रवाहांना दिलेली धमकी आहे.’ असे नोंदवून न्यूयॉर्क टाइम्स म्हणते की, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पाठीराख्या लोकांना व हस्तकांना आपल्या टीकाकारांना कायमची दहशत बसविण्याचा परवानाच दिला असावा असे भारताचे सध्याचे चित्र आहे. त्यांच्या ताब्यातील सोशल मीडियाही हेच काम सातत्याने करीत आहे. उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांचे व व्यक्तींचे अतिशय विकृत चित्रण करणे, त्यांच्याविषयी कमालीच्या खोट्या व विषारी बातम्या पेरणे हे उद्योग त्यांच्या ताब्यातील माध्यमेही नित्यनेमाने करीत आहेत. परिणामी भारतात बहुसंख्यक आणि अल्पसंख्यक यांच्यातील दुरीच केवळ वाढत नाही तर स्वत:ला कर्मठ म्हणविणारे वर्ग आणि देशातील उदारमतवादी यांच्यातील दरीही रुंदावत आहे. अल्पसंख्यकांना जाचाचे ठरतील असे नियम लादले जाणे, वृत्तपत्रांच्या संचालकांवर दबाव आणणे आणि ज्यांच्यावर तो आणता येत नाही त्यांना ठार मारणे अशी ही लोकशाहीकडूृन एकाधिकारशाहीकडे होणारी वाटचाल आहे. पंतप्रधान मोदी त्याविषयी केवळ वरवर बोलतात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठाम कृती होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अतिरेकी हस्तक जास्तीचे चेकाळत आहेत. या स्थितीला तात्काळ आवर घातला गेला नाही तर ती अराजकाकडे जाईल आणि भारतीय लोकशाहीला अंधाराचे दिवस पाहावे लागतील. देशातील वृत्तपत्रे आणि माध्यमे या वास्तवाचे चित्र रंगवून आता थकली किंवा त्याचा काही एक परिणाम होताना न दिसल्याने थांबली. त्यातली अनेक मोदीशरणही झाली. आता जगातली माध्यमे हेच सांगत असतील तर देशाच्या प्रतिमेखातर का होईना सरकारने त्याची दखल घेणे गरजेचे आहे. कोणतीही संघटित शक्ती मग ती वैचारिक असेल वा धार्मिक तिला कालांतराने कडवे स्वरूप प्राप्त होते. हे कडवेपण लोकशाही व उदारमतवाद यांना नेहमीच विरोध करते. खून आणि हिंसाचार हे ही या टोकाच्या कडवेपणाची परिणती असते. या आधीही अशी परिणती तत्त्वज्ञांच्या आणि महात्म्यांच्या वाट्याला आली. आताच्या जगात ती मानवतावाद्यांच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या गौरीसारख्या साध्या पत्रकार महिलेवर आली आहे. अभिमान याचा की गौरीच्या निषेधार्ह हत्येची दखल जगभरच्या सगळ्या प्रमुख माध्यमांनी अतिशय गंभीरपणे घेतली आहे.

Web Title:  'India will see dark days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.