खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Published: September 13, 2014 11:33 PM2014-09-13T23:33:10+5:302014-09-13T23:33:10+5:30
उस्मानाबाद : खंडणीसाठी दुकान बंद करण्याची धमकी देत दगडफेक करणाऱ्या दोघा खंडणीबहाद्दरांना शहर पोलिसांनी झोडपून काढले़ ही घटना शनिवारी सकाळी घडली
उस्मानाबाद : खंडणीसाठी दुकान बंद करण्याची धमकी देत दगडफेक करणाऱ्या दोघा खंडणीबहाद्दरांना शहर पोलिसांनी झोडपून काढले़ ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, खंडणी मागितल्याप्रकरणी तिघाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील सावरकर चौकात राहणारे श्रीनिवास पांडुरंग बांगड यांचे शालेय साहित्याची विक्रीचे दुकान आहे़ भीमनगर येथील अशोक उर्फ पिंटू चंदर गायकवाड, विकी प्रदिप झेंडे, मेसा जानराव यांनी शनिवारी सकाळी बांगड यांच्या दुकानात जावून महिन्याला २००० रूपये खंडणी द्या, नाहीतर धंदा करू देणार नाही, अशी धमकी दिली़ तसेच गल्लीतील दुकाने फोडायची आहेत, असे म्हणून दुकानात दगड मारून काच फोडल्याचे बांगड यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ यावरून वरील तिघाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोनि आदिनाथ रायकर, फौजदार सिध्दे, शाहूराज धनवडे, भारत पाठक, सुधाकर भांगे, कावळे, गणापुरे आदी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अशोक गायकवाड यास दुकानातून तर विकी झेंडे यास घरातून ताब्यात घेतले़ या दोघांना सावरकर चौक, काळा मारूती चौक, सराफ गल्ली, नेहरू चौक आदी मार्गावरून पोलिसी खाक्या दाखवित ठाण्यात आणण्यात आले़ (प्रतिनिधी)