दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पाऊस
By Admin | Published: September 1, 2014 01:02 AM2014-09-01T01:02:50+5:302014-09-01T01:08:45+5:30
लातूर : गणेश आगमनाच्या दिवशी वरुणराजाचे आगमन लातूर शहर व जिल्ह्यात झाले असून नदी, नाले व ओढ्यांना पाणी आले आहे़ गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे़
लातूर : गणेश आगमनाच्या दिवशी वरुणराजाचे आगमन लातूर शहर व जिल्ह्यात झाले असून नदी, नाले व ओढ्यांना पाणी आले आहे़ गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे़ शुक्रवारपासून पावसाला प्रारंभ झाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शनही नाही़
लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातही वाढ झाली आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लघु, मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत़ आता प्रकल्पात पाणी येत आहे़ देवर्जन, साकोळ, घरणी, रेणा आदी मध्यम प्रकल्पात पाण्याचा स्त्रोत वाढू लागला आहे़ या प्रकल्पांतील पाणी अद्याप जोत्याखाली असले तरी पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे़ शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाऊस झाल्याने पिकांनीही उभारी घेतली आहे़ या पावसाळ्यातला हा सर्वात मोठा पाऊस असून, शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील तेरणा नदीतही पाणी आले आहे़ कालपासून ही नदी दुतडी वाहू लागली आहे़ मात्र मांजरा नदी अद्याप पूर स्थिती नाही़ परंतु, नदीपात्रात थोडे पाणी वाहू लागले आहे़ रविवारीही पहाटेही जोरदार पाऊस झाला़ सकाळी १० वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र प्रकल्प आणि विहिरी पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज वर्तविली जात आहे़ गेल्या उन्हाळ्यापासून शहर व जिल्ह्यात पाणी टंचाई आहे़ शहरात तर अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो़ ग्रामीण भागातही काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे़ गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे बोर व विंधन विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आता टँकर कमी होतील असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, जळकोट, उदगीर, निलंगा, चाकूर, रेणापूर, अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, देवणी या दाही तालुक्यात गणेश आगमनाच्या दिवसापासून पाऊस पडत आहे़ यामुळे माना टाकलेली पिके आता डौलू लागली आहेत़ सोयाबीन पिकासह अन्य पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे़ भविष्यकाळातील चारा व पाण्याची टंचाई दुर होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे़ जिल्ह्यात असलेली ८ मध्यम प्रकल्प व लातूर शहराला पाणीपुरवठा करणारी मांजरा प्रकल्प, शिवाय लघु प्रकल्पात अद्याप समाधानकारक साठा नाही़ त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे़