औरंगाबादकरच बनविणार शहराला इंदूर : मनपा आयुक्तांचा विश्वास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:05 PM2018-07-31T12:05:41+5:302018-07-31T12:10:33+5:30

इंदूर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? : सध्या शहरातील अनेक वॉर्ड हळूहळू कचराकुंडीमुक्त होत आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा आशेचा किरण असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

Indore city will be built by Aurangabad: NMC Commissioner's trust | औरंगाबादकरच बनविणार शहराला इंदूर : मनपा आयुक्तांचा विश्वास 

औरंगाबादकरच बनविणार शहराला इंदूर : मनपा आयुक्तांचा विश्वास 

googlenewsNext
ठळक मुद्दे इंदूर शहर कचराकुंडीमुक्त, धूलिकणमुक्त झाले. औरंगाबादेही याची सुरुवात आम्ही करीत आहोत.शहरातील लाखो नागरिकच औरंगाबादला येणाऱ्या काही दिवसांमध्ये इंदूरपेक्षा दर्जेदार शहर बनवतील.इंदूर महापालिकेने जे केले तेच औरंगाबादेतही करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर शहर कचराकुंडीमुक्त, धूलिकणमुक्त झाले. औरंगाबादेही याची सुरुवात आम्ही करीत आहोत. शहरातील लाखो नागरिकच औरंगाबादला येणाऱ्या काही दिवसांमध्ये इंदूरपेक्षा दर्जेदार शहर बनवतील. इंदूर महापालिकेने जे केले तेच औरंगाबादेतही करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. इंदूरप्रमाणेच महापालिकाही भौतिक सोयी-सुविधा उलब्ध करून देण्याचे काम करणार आहेत. सध्या शहरातील अनेक वॉर्ड हळूहळू कचराकुंडीमुक्त होत आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा आशेचा किरण असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने इंदूर शहराचा सखोल अभ्यास करून ‘इंदूर स्वच्छ झाले, औरंगाबाद का नाही?’ या नावाने सलग सात दिवस वृत्तमालिका संपूर्ण राज्यात प्रसिद्ध केली. वृत्तमालिकेच्या शेवटच्या भागात औरंगाबादचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना ७ प्रश्न विचारण्यात आले, ते असे.

प्रश्न - मधुर वाणीच्या बळावर इंदूर मनपाने शहर स्वच्छ केले, औरंगाबादेत हे का नाही.?
आयुक्त - मी इंदूरची अलीकडेच पाहणी केली आहे. तेथील दौऱ्यात बरेच काही शिकलो. इंदूरमध्ये खरोखरच मधुर वाणीच्या बळावर नागरिकांशी मनपाने संवाद साधला. यासाठी सहा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची मनपाने मदत घेतली. या संस्थांचे कर्मचारी प्रत्येक रिक्षासोबत हजर राहत. नागरिकांशी नम्रपणे ते संवाद साधत असतात. हाच प्रयोग औरंगाबादेतही करण्यात येणार आहे. लवकरच यासंदर्भातील निविदाही काढण्यात येईल. इंदूरप्रमाणे औरंगाबादेतही सफाई कर्मचाऱ्याला ‘सफाई मित्र’ संबोधण्यात येणार आहे. दुर्गंधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल थोडीतरी नागरिकांनीही सहानभूती दाखवायला हवी.

( मधुर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदौर स्वच्छतेत देशात नं.१; ३२ लाख नागरिकांचे पाठबळ मिळविले )

प्रश्न - इंदूर शहरातील ‘सफाई मित्र’ मनापासून काम करतात. औरंगाबादेत निव्वळ पाट्या टाकतात.?
आयुक्त - इंदूरची औरंगाबादशी तुलना करणे चुकीचे आहे. तेथे ७ हजार सफाई कर्मचारी आहेत. आपल्याकडे १४०० कर्मचारी आहेत. दहा हजार नागरिकांच्या वॉर्डाला पाच ते आठ कर्मचारी आहेत. एक हजार कॉलनी आहेत. अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी बदली मजूर ठेवले आहेत. आता आपण बायोमेट्रिक पद्धत सुरू करून बदली कामगार ही संकल्पनाच संपवून टाकणार आहोत. नागरिकांमध्येही जनजागृती व्हावी म्हणून चार वेगवेगळ्या खाजगी संस्था शहरात रात्रंदिवस काम करीत आहेत. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याचे काम खाजगी एजन्सीला दिल्यावर या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका होईल. त्यानंतर कामात दर्जेदारपणा येईल.

( शहर साफसफाईसाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिले झोकून )

प्रश्न - इंदूर मनपा दरवर्षी स्वच्छतेवर १५२ कोटी खर्च करते, औरंगाबादमध्ये ६५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करून उपयोग काय?
आयुक्त - घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होणाऱ्या निधीची जबाबदारीही निश्चित होणे आवश्यक आहे. महापालिका ६५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करते, ही वस्तुस्थिती आहे. त्यातील ४२ कोटी रुपये निव्वळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात. उर्वरित २० ते २२ कोटी रुपये कंत्राटी पद्धत, डिझेल, पावडर खरेदीवर होतात. घरोघरी जाऊन खाजगी कंपनीने कचरा जमा करावा ही पद्धत सुरू करतोय. यामुळे सेवाही दर्जेदार मिळेल. इंदूरप्रमाणेच नागरिकांकडून सर्व्हिस चार्जही वसूल करण्यात येईल. दरवर्षी दहा कोटी रुपये यातून मिळतील, अशी अपेक्षा मी करतोय.  मोठ्या हॉटेल, व्यावसायिकदारांकडून आम्ही व्यावसायिक दरानेच वसुली करणार आहोत.  १ आॅगस्टपासून कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांना दंड आकारतोय. यासाठी माजी सैनिक, एसपीओ यांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे.

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

प्रश्न - इंदूर शहर स्वच्छ, धूळमुक्त झाल्याने दरवर्षी २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. हा चमत्कार शहरात होईल का?
आयुक्त - शहरात तुम्हाला कुठेच घाण, दुर्गंधी नसल्यास आपोआपच रोगराई थांबणार आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. साथ रोगांची लागण होणार नाही. कचराच ठिकठिकाणी नसेल तर कुत्र्यांची संख्याही कमी होईल. धूळ नष्ट करण्यासाठी इंदूर पॅटर्नप्रमाणेच स्वतंत्र मशीन खरेदी करण्यात येतील. नियोजित आराखड्यात याचा प्रामुख्याने समावेश केला आहे. घनकचरा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी अधिक कर्मचारी, अधिकारी नेमण्यात येत आहेत. शहर लवकरच स्वच्छ होणार असल्याचे स्वप्न औरंगाबादकरांनी बघायला अजिबात हरकत नाही. 

( स्वच्छतेमुळे २५ कोटींनी औषधींची विक्री घटली )

प्रश्न - इंदूरचे मनीषसिंह यांच्यासारखी दबंग अधिकाऱ्याची भूमिका आपण बजावणार का?
आयुक्त - मी प्रेमाने जग जिंकण्यावर विश्वास ठेवतो. कोणतेही काम प्रेमाने सहज होऊ शकते. त्यासाठी कायद्याचा बडगा उगारणे योग्य नाही. शहरातील रस्ते रुंद करणे, गुळगुळीत करणे हे आमच्या अजेंड्यावर आहे. अगोदर शासनाने दिलेला निधी खर्च केल्यावर प्लॅन बी शासनाला सादर करून निधीची मागणी करण्यात येईल.

( ‘दबंग’ अधिकाऱ्याने केला इंदूरचा शहराचा कायापालट )

प्रश्न - इंदूरचा कायापालट करण्यात ‘इको प्रो’या एजन्सीची मुख्य भूमिका होती. हीच एजन्सी औरंगाबादसाठी नेमली आहे. तरीही...?
आयुक्त - इको प्रो एजन्सीचे इंदूर हे स्वत:चे शहर आहे. त्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. औरंगाबादेतही ते आपल्याला खूप मदत करीत आहेत. नॉलेज लिंक, अ‍ॅक्शन फॉर बेटर सोसायटीसह आणखी दोन जण शहरात खूप चांगले काम करीत आहेत.

( इंदूर स्वच्छ झाले; कारण टक्केवारी नव्हती  )

प्रश्न - इंदूरप्रमाणे स्वच्छ नाले, बसथांबे, शौचालये, दर्जेदार पाणी या सुविधा औरंगाबादकरांना कधी मिळणार?
आयुक्त - शहरात खाजगी तत्त्वावर त्यातही महिला शौचालयांची संख्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अत्याधुनिक बसथांबे लवकरच पाहायला मिळतील. शहरातील दूषित पाणी नाल्यांमध्ये जाणार नाही, याचा आढावा घेण्यात येत आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकणे, त्यावरील अतिक्रमणे काढणे हा मोठा विषय आहे. येणाऱ्या वर्षभरात पाण्यासह अनेक दर्जेदार सोयीसुविधा मिळतील.

( वाहता नाला झाला नदीसारखा आरस्पानी )

Web Title: Indore city will be built by Aurangabad: NMC Commissioner's trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.