शिक्षकांच्या घोषणांनी शहर दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:31 PM2017-11-18T23:31:44+5:302017-11-18T23:31:49+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी बदली हवी आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी बदली हवी आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोर्चेकरी शिक्षकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते.
शनिवारी दुपारी २.३० वाजता जिल्हा परिषद मैदानावरून हा मोर्चा निघाला. औरंगपुरा, गुलमंडी, सिटीचौक, काळा दरवाजामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी शिक्षक व शिक्षिकांच्या हातात विविध घोषणांचे फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा गेल्यानंतर उपस्थित महिलांनी आपल्या व्यथा मनोगताद्वारे व्यक्त केल्या. त्यानंतर ५ महिलांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात मंगला मदने, कौसर शेख, अर्चना गोर्डे, सारिका निवारे व जयश्री लाड या शिक्षिकांचा सामावेश होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले व ग्रामविकास सचिवांकडे मोर्चेकºयांच्या भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या मोर्चास अनेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. मोर्चात हजारो शिक्षक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.