अबब! १० कोटींचा हप्ता ! शहरातील अतिक्रमणांच्या अर्थकारणाची उड्डाणे कोटींची  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 07:34 PM2019-03-15T19:34:58+5:302019-03-15T19:38:00+5:30

रंगारगल्ली, गुलमंडी, टिळकपथ, शहागंज, सिडको-हडको एन-१२ रोड, पैठणगेट, दिवाण देवडी, सिटीचौक, औरंगपुरा, रोशनगेट ते चंपाचौक, किराडपुरा या भागांतील रस्त्यांची अशीच अवस्था आहे. वानगीदाखल गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर या रस्त्याचे उदाहरण दिले आहे. वरील रस्त्यांवरील अतिक्रमणे ही आशीर्वादानेच आहेत. त्याचा त्रास सामन्यांना वर्षानुवर्ष होतो आहे. अतिक्रमणांच्या वादातूनच किरकोळ प्रकरणे मोठ्या हिंसक घटनांना जन्म देत आहेत. 

10 crores Hapta! Crores of rupees investment in the city's encroachment | अबब! १० कोटींचा हप्ता ! शहरातील अतिक्रमणांच्या अर्थकारणाची उड्डाणे कोटींची  

अबब! १० कोटींचा हप्ता ! शहरातील अतिक्रमणांच्या अर्थकारणाची उड्डाणे कोटींची  

googlenewsNext
ठळक मुद्देरस्ता मनपाचा, कमाई दुकानदार, हप्तेखोरांचीत्रास मात्र प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांना

- विकास राऊत 

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील अनेक रस्ते विकास आराखड्यानुसार रुंद केले खरे मात्र,  रस्त्यांवरील फुटपाथ व रुंदीकरणाची जागा हप्तेखोरांनी बळकावून स्वत:च दुकानदारी सुरू केली आहे. या अनधिकृत दुकानदारीला मनपा, पोलीस, व्यापारी, राज्यकर्त्यांनी मूक संमती दिली असून, यातून वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते आहे. 
 अतिक्रमणांमुळे रस्ते रुंद असतानाही त्यांचा श्वास गुदमरला आहे. मागील काही वर्षांत अंदाजे १० कोटी रुपयांचे ‘अंडरकरंट अर्थकारण’ गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर ते जयभवानीनगर रस्त्यावरील अतिक्रमणातून झाल्याची माहिती समोर येत आहे. 

फुटपाथ पालिकेचा आणि उत्पन्न हप्तेखोरांच्या घरात, वाहतुकीचा त्रास सर्वसामान्यांना, असे चित्र त्या रस्त्याचे आहे. गजानन महाराज मंदिरापासून पुंडलिकनगरमार्गे जयभवानीनगरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अतिक्रमित होत चालला आहे. हातगाड्या, हप्तेखोरांच्या दादागिरीमुळे सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत या रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे आहे. वाहतुकीचा खोळंबा त्या रस्त्यावर रोज होतो. डबल टी अँगलमध्ये असलेले सिग्नल धोकादायक झालेले आहेत. वळणावर हातगाड्यांची अतिक्रमणे असल्यामुळे पादचाऱ्यांना जाता येत नाही. दुचाकीस्वारांना ताटकळावे लागते. तर बीड बायपासकडे जाणारी व तिकडून येणारी मोठी वाहने वाहतूक जाम करून टाकतात. रुग्णवाहिका वाहतुकीच्या गर्दीत अडकली तर ती निघण्यासाठीदेखील रस्ता लवकर मोकळा होत नाही. या अतिक्रमणधारकांना सामान्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तर ते थेट शिवीगाळ करून हल्ला करण्यावर उतरतात. 

किती वसाहती आहेत
सारंग, परिमल, कल्पतरू, अलंकार हाऊसिंग सोसायटी, विशालनगर, गजानन कॉलनी, भारतनगर, विजयनगर, बाळकृष्णनगर, पुंडलिकनगर, हनुमाननगर, न्यायनगर, हुसैन कॉलनी, एन-३, एन-४, जयभवानीनगर, एन-२ ठाकरेनगर, विश्रांतीनगर, जिजामाता कॉलनी, मुकुंदवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, चिकलठाणा, रामनगर, विठ्ठलनगर, कामगार कॉलनी या वसाहतीतील वाहने याच रस्त्यांवरून धावतात. अंदाजे २३ वॉर्डातील वाहने गजानन मंदिरमार्गे बाबा पेट्रोलपंपाकडे जातात. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणमुक्त असणे गरजेचे आहे. 

रस्ता कुणाच्या वॉर्डातून जातो
आ.अतुल सावे यांच्या मतदारसंघातील आणि सभापती राजू वैद्य, गजानन मनगटे, मीना गायके, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे या नगरसेवकांच्या वॉर्डातून हा रस्ता जातो. सुमारे एक ते दीड लाख लोकसंख्येचा हा रोज ये-जा करण्याचा मार्ग आहे. 

पोलीस काय करतात
वाहतूक पोलिसांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच पुंडलिकनगर पोलीस ठाणे, मुकुं दवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालताना रस्त्यांवर बिनधास्त उभ्या असणाऱ्या वाहनांना अभय देतात. नागरिकांनी रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा निवेदने दिली आहेत. गजानन मंदिर सिग्नलवर तैनात करण्यात आलेले पोलीस सिग्नल तोडणाऱ्यांना ‘तोडतात.’ मात्र वाहतूक सुरळीत करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष असते. पुंडलिकनगरमधील गल्लीच्या तोंडावर असलेल्या पानटपऱ्या, गजानन महाराज मंदिर परिसर, जयभवानीनगर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण, वाळूचे डेपो, अनधिकृत गॅरेज, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी चारचाकी वाहने, रिक्षा दिवसभर उभ्या असतात. पोलिसांनी याकडे कानाडोळा करण्यामागील कारण काय असू शकते. 

अशी चालते हप्तेखोरी
२०११ ते आजपर्यंत पालिकेने त्या रस्त्यावरील अतिक्र मणे वारंवार थातूरमातूरपणे काढली. सकाळी काढली तरी संध्याकाळी पुन्हा त्या रस्त्यावर अतिक्रमणे दिसतातच. वॉर्ड कार्यालयातील जवान, बीट मार्शल हातगाडीचालकांकडून हप्ते गोळा करतात, तर रस्त्याच्या दुतफर् ा असलेले काही दुकानदार २०० रुपये रोज घेऊन हातगाडी उभी क रू देतात. दुभाजकांवरील विक्रेत्यांकडून मनपाची हप्तेखोर मंडळी पैसे उकळतात. वर्षभर हा रस्ता अतिक्रमणांनी गजबजलेला असतो.

हप्त्याचे अर्थचक्र असे
गजानन मंदिर ते जयभवानीनगर या रस्त्यावर हातगाड्यांची सुमारे ३०० अतिक्रमणे आहेत. मंदिर ते जयभवानीनगरचा चौक हा रस्ता पूर्णत: अतिक्रमित झाला आहे. मनपा वॉर्ड कर्मचारी, दुकानदार, परिसरात राजकीय दादा मंडळी व पोलीस हातगाडी लावण्यासाठी रोज १०० रुपये घेत असल्याचे बोलले जाते. मात्र उघडपणे कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. ३० हजार रुपये रोज त्यातून मिळतो.९ लाख रुपये महिन्यातून गोळा केले जातात. या आकडेवारीनुसार वर्षाला अंदाजे १ कोटी, १० लाख रुपये मागील ९ वर्षांत ९ कोटी ९० लाख रुपये हातगाडीचालकांकडून उखळले गेल्याचा आकडा समोर येतो.

रस्त्याची एकूण रुंदी : २४ मीटर (८० फूट)
सध्या शिल्लक रस्ता : २० फूट
हातगाड्यांची दुतर्फा अतिक्रमणे : ३००
रस्त्यावर काय आहे : १५ हॉटेल्स, ८ हॉस्पिटल, ६ दारूची दुकाने, १६ टपऱ्या, ६ वाहन वर्कशॉप, ४ शैक्षणिक संस्था, २ वाळू डेपो, १ भाजी मंडई 

अतिक्रमण हटाव विभागाच्या प्रमुखांना थेट प्रश्न
अतिक्रमण विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख यांना संपर्क साधून अतिक्रमणाबाबत काही थेट प्रश्न करण्यात आले. 

प्रश्न : शहरातील मुख्य रस्त्यांवरच अतिक्रमण का होत आहेत.
उत्तर : कायद्याने बांधकाम होत नाही. शिवाय यंत्रणा म्हणून कुणाचा धाक राहिला नसल्यामुळे हा प्रकार होतो आहे. पूर्ण विभागातच अतिक्रमणाची समस्या वाढते आहे. कायद्याने बांधकाम करण्याची जाणीवच नाही. नोटरीवर जागेची खरेदी आहे. 

प्रश्न : राजकीय दबावामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहेत का?
उत्तर : राजकीय दबाव म्हणून नाही. परंतु कायद्याची काही बाजू आहे की नाही. नियोजन प्राधिकरण म्हणून काम कसे पाहणार हा प्रश्न आहे. विकास आराखडा चार वर्षांपासून रखडला आहे. त्याचे काही परिणाम शहर नियोजनावर होत असतात. हर्सूल, चिकलठाणा, नारेगाव, ब्रिजवाडी परिसरातील येलो झोन केव्हाच संपला आहे. राजकीय दबावाच्या पलीकडे हा मुद्दा गेला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही.

प्रश्न : पालिकेकडून थातूरमातूर कारवाई होते काय?
उत्तर : महापालिकेची यंत्रणा पर्यायी म्हणून काम पाहते. थातूरमातूर कारवाईचा मुद्दाच नाही. अतिक्र मण काढणे ही एकट्या मनपाच्या यंत्रणेची जबाबदारी नाही. त्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

Web Title: 10 crores Hapta! Crores of rupees investment in the city's encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.