अंधारी नदीचे पात्र कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:53 PM2019-02-25T22:53:25+5:302019-02-25T22:53:44+5:30
अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत अंधारी नदीचे पात्रातून नळाद्वारे पाणी दिले जाते. गावात व जवळच्या परिसरात पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने मार्च-एप्रिल महिन्यातच हॅन्डपंप व विहिरी कोरड्या पडत असतात. दरवर्षी अंधारी नदीचे पाणी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पुरत होते. परंतु, यावर्षी अंधारी नदी फेब्रुवारी महिन्यातच कोरडी पडली असल्याने देवाडा खुर्द वासियांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरापास्त होणार चिन्हे दिसून येत असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दरवषी येथील नागरिक शेतशिवारातील विहिर व तलावाचे पाणी बैलबंडीद्वारे किंवा दोर- बादलीच्या सहय्याने खोलवर विहिरीचे पाणी काढून तहाण भागवावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरीवर पाण्यासाठी गर्दी होत असते. अनेक महिला तर रात्रीच्या वेळी झोपमोळ करुन पाणी भरत असतात. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती होत असूनही कुठलीच पर्यायी व्यवस्था होत नसल्याने नागरिकांत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यान लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
पाण्यासाठी बंधाऱ्याचा वापर
देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत अंधारी नदीच्या पात्रात सिमेंट पिशवीद्वारे बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्यातील पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. हे पाणी काही दिवसातच संपणार असल्याचे बोलले जात आहे.