शिफारसप्राप्त कापूस वाणांचीच करा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:21 PM2018-05-28T23:21:28+5:302018-05-28T23:21:28+5:30
जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाखालील क्षेत्र मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात कापूस लागवड होवू लागल्याने बोगस बियाणे विक्रीचा धोका आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या हंगामात शिफारसप्राप्त कापूस बियाणे वाणांचीच खरेदी करावी. बोगस बियाण्यांची विक्री सुरू आल्यास तक्रार करण्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाखालील क्षेत्र मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात कापूस लागवड होवू लागल्याने बोगस बियाणे विक्रीचा धोका आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या हंगामात शिफारसप्राप्त कापूस बियाणे वाणांचीच खरेदी करावी. बोगस बियाण्यांची विक्री सुरू आल्यास तक्रार करण्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
२००६ पासून जनुकीय परावर्तीत तंत्रज्ञानावर आधारीत बियाणांचा म्हणजेच बोंड अळीला प्रतिकारक अशा बीटी बियाणांचा वापर होत आहे. बीटी वाणाखालील कापूस क्षेत्र जिल्ह्यात दरवर्षी वाढत आहे. एकूण जमिनीच्या तुलनेत कापूस क्षेत्राच्या लागवडीचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. या बीटी वाणांना केंद्रीय पर्यावरण विभागाअंतर्गत जी.ई.ए.सी. या समितीमार्फत मान्यता दिली जाते. अशा परवानगीप्राप्त व महाराष्ट्र राज्याकरिता शिफारस असलेल्या कापूस वाणांनाच राज्यात विक्रीस परवानगी दिली जाते. मागील वर्षांपर्यंत जी.ई.ए.सी. मान्यताप्राप्त वाणांच्या मूळ उत्पादक कंपनीबरोबरच विपणन कराराद्वारे को-मार्केटिंग करणाऱ्या इतर कंपन्यादेखील विक्री करीत होत्या. अशा को-मार्केटिंग कराराद्वारे विक्री करताना जी.ई.ए.सी.ने मंजूर केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर वेगवेगळे ब्रँडनेम टाकून एकच वाण अनेक ब्रँडच्या नावाने विक्री करण्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. विविध कंपनीच्या ४०२ वाणांची गतवर्षी एकूण ६२४ वेगवेगळ्या नावाने राज्य व जिल्ह्यात विक्री करण्यात येत होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होऊन प्रसंगी फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे २०१८ च्या खरीप हंगामापासून जी.ई.ए.सी. ने मंजूर केलेल्या नावानेच विक्री करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. मूळ उत्पादक कंपनीने कापूस बियाणांचे पॅकींग करताना जी.ई.ए.सी. मान्यताप्राप्त नाव ठळकपणे दिसेल अशा स्वपात पॅकींग व लेबलिंग करण्याचे निर्देश दिले. सदर कंपनी त्या नावाव्यतिरिक्त स्वत:चा ब्रँडनेम टाकू शकतील. मात्र एका वाणाकरिता एकच ब्रँडनेम निश्चिम करावा लागेल.
मूळ उत्पादकांच्या मंजूर वाणांची को-मार्केटिंगद्वारे इतर कंपनीस विक्री करावयाचे असल्यास मूळ उत्पादकांच्या पॅकिंग व लेबल प्रमाणेच विक्री करण्याचे निर्देश देण्या आले आहे़ त्यामुळे राज्यात एका वाणांची एकाच ब्रँडनेमद्वारे विक्री होईल. बी.टी. कापूस वाणांमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतीकार करण्याची क्षमता तयार झाल्याने गतवर्षी शेंदरी बोंड अळीच्या प्रार्दूभाव वाढृून कापूस उत्पादनात मोठी घट आली होती़
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने कमी व मध्यम कालावधीच्या (१८० दिवस) वाणांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे यंदा १८० दिवसांपेक्षा जास्त दिवसांतील वाणा विक्रीला मंजुरी देण्यात आली नाही. खरीप २०१८ करिता ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांनाच विक्री परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
३७० कापूस वाणांचे बियाणे बाजारात
यंदाच्या खरीप हंगामासाठी १८० दिवसांपेक्षा जास्त दिवसांतील वाणा विक्रीला मंजुरी देण्यात आली नाही. केवळ ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांच्या विक्रीला परवानगी मिळाली. हे बियाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे. या वाणांव्यतीरिक्त इतर वाण विक्री होताना आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.