जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा
By admin | Published: June 8, 2014 11:48 PM2014-06-08T23:48:35+5:302014-06-08T23:48:35+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी शहरातील खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. यात आर्थिक तथा शारीरिक ताण सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी शहरातील खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. यात आर्थिक तथा शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. प्रदूषण आणि इतर कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत दिवेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांची संख्याही मोठी आहे. मात्र त्या तुलनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेठीत रक्ताचा साठा कमी पडत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिर तसेच रक्तदात्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुडवडा आहे. अतीगंभीर, सिकलसेल तसेच अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे रुग्णालयातील रक्तपेठीमध्ये काही प्रमाणात रक्ताचा साठा आहे. मात्र साठा कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना नाईलाजाने खासगी रक्तपेठीकडे धाव घ्यावी लागत आहे. हिच संधी साधत खासगी रक्तपेठी संचालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम वसुल करीत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. अपघात, सिकलसेल, प्रसूती तसेच इतर आजारी रुग्णांना तत्काळ रक्त पुरवठा करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
सामाजिक संस्था, विद्यार्थी तसेच तरुणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, अशी विनंती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ( नगर प्रतिनिधी)