बालविकासचे प्रशासन ढेपाळले
By Admin | Published: February 11, 2016 01:37 AM2016-02-11T01:37:43+5:302016-02-11T01:37:43+5:30
तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्पाचे प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रभारावर सुरू आहे.
अनेक पदे रिक्त : कार्यालय चालते पर्यवेक्षकांच्या भरवशावर
सिंदेवाही : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्पाचे प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रभारावर सुरू आहे. प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लिपीक ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचा भार पर्यवेक्षकांच्या भरवशावर सुरू असल्याने या कार्यालयाची अवस्था ढेपाळली आहे. या प्रकल्पात जवळपास ८० ते ९० आंगणवाड्या आहेत. आंगणवाड्यात शुन्य वयोगटातील मुले, लाभार्थी, स्तन माता लाभार्थी, गरोदर माता, लाभाची कामे विभागणी अंतर्गत केली जातात. या आंगणवाड्याचे नियंत्रण देखरेख व मार्गदर्शनासाठी प्रत्येक सर्कलसाठी प्रत्येकी एक प्रमाणे चार स्वतंत्र पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. यातील एका पर्यवेक्षिकाकडे प्रकल्प अधिकाऱ्याचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्या सर्कलला त्या आधी वेळ देणार? असा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे कुणीही मुख्यालयी राहत नसल्याने सर्वत्र आनंदी-आनंद आहे. मासीक सभा घेणे, अहवाल गोळा करणे, वरिष्ठांना पाठविणे हे कागदी घोडेच सर्वत्र नाचताना दिसतात. अंगणवाडी केंद्रातून अनौपचारिक शिक्षण बेपत्ता झाले आहे. आंगणवाडी केंद्र केवळ पोषण आहार वाटप केंद्र बनली आहेत. प्राथमिक शाळेप्रमाणे आंगणवाड्याची पटसंख्यासुद्धा रोडावली आहे. अनेक आंगणवाडी केंद्राना इमारती नाहीत. शौचालय बेपत्ता झाली आहे. आंगणवाड्यांना कुणी भेट देत नाही. तेथे सर्व आॅलवेल सुरू आहे. केंद्राच्या मासिक सभेमध्ये भेटीचे रजिस्टर बोलावून भेटीच्या नोंदी घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे वृत्त आहे. अनेक आंगणवाड्यातील वजन काटे बंद असल्याने बालकांचे वजन सुद्धा बरोबर घेतले जात नाही. कुपोषीत बालकांचा सॅम, मॅमच्या नोंदी वस्तुनिष्ठ न होता कुपोषण लपविण्याचा प्रकार काही आंगणवाड्यामध्ये सुरू आहे. कुपोषण टाळण्यासाठी गरोदर स्तनदा मातांना २५ रुपयात चौरस आहार या योजनेतुन जेवण ए.पी.जे. कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दिले जाते का? याची तपासणी करण्यासाठी पर्यवेक्षिका दौरे करणार काय? अशी अनेक प्रकारचे उत्तर प्रभावी पर्यवेक्षिकाकडे नाहीत. त्यामुळे कार्यालयीन रिक्त पदे त्वरीत भरून पर्यवेक्षिकांना त्यांची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)