अंबाजोगाईत पाण्याची बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:45 PM2019-04-13T23:45:39+5:302019-04-13T23:49:41+5:30

शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

Waterfall in Ambamogai | अंबाजोगाईत पाण्याची बोंब

अंबाजोगाईत पाण्याची बोंब

Next
ठळक मुद्देआठवड्याला पुरवठा : अनेक जलवाहिन्या नादुरुस्त

अंबाजोगाई : शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी पाणी भरण्यासाठी दिवस घालवावा लागत आहे.
शहरात मागील १५ वर्षांपासून आठवडयात एकदाच पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नाही. त्यामुळे ज्या दिवशी नळाला पाणी येणार त्यादिवशी पाणी येण्याची वेळही निश्चित नसते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी व पाण्याच्या प्रतीक्षेत दिवस घालवण्याची वेळ अंबाजोगाईकरांवर आली आहे.
शहरात पाणीपुरवठ्यासाठी वेळापत्रकाची आखणी प्रशासनाने अजूनही केलेली नाही. परिणामी पाणी कधी सुटणार याची माहिती घेऊनच शहरवासियांना दिनक्रम ठरवावा लागतो. आठवड्यातून एक वेळा सुटणाºया पाण्यामुळे मोठा पाणीसाठा करण्याची वेळ शहरवासियांवर येते. अवेळी पाणी आले तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. काही कारणामुळे पाण्याची वेळ चुकली तर आठवडाभर पाण्यासाठी ठणठणाट करण्याची वेळ येते. शहरातील गुरुवारपेठ, मंगळवारपेठ, भटगल्ली, चौभारा, जिरेगल्ली, रविवारपेठ, सातपुते गल्ली, खडकपुरा, कुत्तरविहिर या भागातील जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. शहरातील अनेक जलवाहिन्या नादुरुस्त आहेत. बारा वर्षांपूर्वी अंबाजोगाई नगर परिषदेला शासनाने ६५ कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेचे नवीन जलकुंभ व शहरातील जलवाहिन्याचे काम होऊनही ही पाणीपुरवठा योजना अद्यापही पूर्णत्वाकडे गेली नाही.
पाणी सोडण्याचे ठराविक वेळापत्रक तयार करा
अंबाजोगाई शहराला होणाºया अनियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरवासियांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाने पाणी सोडण्याची वेळ नागरिकांना ठरवून दिली तर गैरसोय दूर होईल, यासाठी पाणी सोडण्याचे वेळापत्रक बंधनकारक करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुलभा सोळंके यांनी केली आहे.
पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी रस्त्यावर खड्डे कायम
अंबाजोगाई शहरातील अनेक भागात अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने चांगले रस्ते करण्यात आले. या रस्त्याचे काम होते ना होते तो महिनाभरातच पाईपलाईनचे लिकेजेस व विविध कारणांमुळे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रस्ते खोदून ठेवले जात आहेत. हे खोदलेले रस्ते काम होताच माती ढकलून जैसे थे राहतात. आठवडाभरानंतरच या रस्त्यावर खड्डे पडू लागतात, अशी स्थिती शहरातील अनेक भागांमध्ये झाली आहे. रस्ते तयार करण्यापूर्वी अशी दुरूस्तीची कामे उरकून घेतली तर रस्त्याच्या तक्रारी कमी होतील, अशा प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.

Web Title: Waterfall in Ambamogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.